शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (11:32 IST)

विहिरीत उडी घेतलेल्या मुलीला बापाने परस्पर पुरून टाकला

औरंगाबाद- वडिलांशी वाद झाल्यानंतर एक 17 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना टाकळीवाडी येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मुलगी घरातून निघून काही तासात विहिरीत पडलेली आढळते, आणि वडील आणि भाऊ तिला बाहेर काढतात, मुलगी मृत झाल्याचे ठरवत तिला विहिरीच्या शेजारीच पुरतात. 
 
मात्र दोन दिवसानंतर पोलिसांनी आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे. मुलीच्या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणाचा तपास दौलताबाद पोलिसांकडून करण्यात येत आहे. राधा कैलास जारवाल असे मृत तरुणीचे नाव आहे.
 
हा धक्कादायक प्रकार 22 सप्टेंबर रोजी औरंगाबादमधील दौलताबाद परिसरात घडला. राधाचा मृत्यू हा ऑनरकिलिंगचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 
 
नेमकं काय घडलं? 
कैलास जारवाल हे आपल्या कुटुंबासोबत येथील गट नं १० टाकळी शिवारात राहतात. त्यांची मुलगी राधा जारवालचे चार दिवसांपूर्वी वडिलांशी काही कारणांवरून वाद झाला. संतप्त राधा घरातून निघून गेली आणि काही तासांनी ती विहिरीत पडलेली आढळली. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे काका धनसिंग जारवाल, चुलत मामा रामसिंग जनगले यांच्या मदतीने राधाचा मृतदेह बाहेर काढला व घराजवळ असलेल्या गोठयात ठेवला. नंतर काका व मामा आपल्या घरी निघून गेले. दरम्यान कैलास जारवाल यांनी मुलीच्या मृत्यूची बातमी पत्नी व मुलापासून लपवत स्वतः विहिरीच्या बाजूला खड्डा खोदून राधाचा मृतदेह परस्पर पुरून टाकला. 
 
नंतर या घटनेची कुणकुण लागताच पोलीसांनी सर्व नातेवाईकांना बोलावून घेतले. परंतु कुटुंबातील कुणीही यासंबंधी बोलायला तयार नव्हते. जारवाल यांना तीन मुली आणि दोन मुले असल्याचे कळले. पण मोठी मुलगी राधा कुठे आहे, हे विचारताच कुटुंबातील सगळेच जण शांत बसले. मात्र काही वेळाने वडिलांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
 
बहीण-भावंडांनी सांगितलं सत्य
राधा संध्याकाळी स्वयंपाक करत असताना वडिलांनी तिच्यासोबत मारहाण केली. ती घराबाहेर निघून गेली मात्र खूप वेळ परतली नाही म्हणून वडिलांनी तिची शोधाशोध सुरु केली. अखेर शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. भाऊ आणि इतर दोघांच्या मदतीने वडिलांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि परस्परच तिला पुरलं. 
 
दरम्यान, आज राधाचा पुरलेला मृतदेह पोलीस बाहेर काढणार असून तो पुढे शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल. राधाला परस्पर मृत ठरवत तिला पुरण्याचा धाडस वडिलांनी एवढ्या घाईने का घातला, या गोष्टीचा तपास केला जाता आहे.