शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:45 IST)

ही’ ठाकरे सरकारची दडपशाही, किरीट सोमय्या यांचा आरोप

आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप  करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या  यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार होतो.हे हो ऊ नये यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला आहे. माझ्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
सोमय्या यांनी हा आरोप करताना आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात की, ठाकरे सरकारची दडपशाही सुरु असून माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेशच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
 
मी मुलुंडमधील निलम नगरहून निघणार असून मी गिरगाव चौपाटीवर जाऊन गणेश विसर्जन करेन आणि तिथून संध्याकाळी सव्वा सात वाजता CSMT स्टेशनहून महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून मी कोल्हापूरला रवाना होईल, असे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देऊ नका असा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले असून तो आदेश पोलिसांनी आपल्याला दाखवला असल्याचे सांगत ही ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.