गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (21:26 IST)

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

eknath shinde
मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या गाळप हंगामाबाबत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रामधील यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
 
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, बंदरे मंत्री दादाजी भुसे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रकाश आवाडे, धनंजय महाडीक, हर्षवर्धन पाटील, श्रीराम शेटे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.
 
मागील हंगामामध्ये सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीमध्ये अभिनंदन करण्यात आले. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर असून राज्यामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामामध्ये सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
महाराष्ट्राने मागील हंगामामध्ये १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. दरम्यान, देशामध्ये सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रामध्ये ३० लाख मेट्रीक टन साठा आहे.
 
यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतामधून निर्यात केला जाणर असल्याचा अंदाज असून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे. यावेळी उस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.