शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (08:48 IST)

बरे झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका

uddhav eaknath shinde
मालेगावमधील अद्वय हिरे यांची चर्चा राज्यभर होत आहे. त्यामागचे कारणही तसेच काहीसे आहे. कारण राज्यातील सत्ताधारी भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी ठाकरेंच्या जहाजात उडी घेतली आहे.  मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मालेगावातील नेते अद्वेय हिरे यांना शिवबंधन बांधले असून या घडामोडीकडे राज्याने लक्ष वेधले गेले आहे. बरे झाले गद्दार गेले. त्यांच्यामुळे हिरे सापडले. असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटाचा तिखट समाचार घेतला असून हिरे यांचे स्वागत केले आहे.
 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, एक गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की, बरे झाले गद्दार गेले. त्यांच्यामुळे हिरे सापडले. आजवर त्यांना आम्ही खूप पैलू पाडले आणि हिरा म्हणून आम्ही त्यांना नाचवत होतो. पण ते दगड होते, ते गेले बुडाले.” शिंदे गटाचा असा तिखट समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
 
‘आम्ही पंचवीस तीस वर्षे भोगले. आम्ही त्यांनासुद्धा पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पण त्यांना वाटले की, आम्ही कायमचे भोई आहोत. पण आम्ही त्यांना सांगतोय की, आम्ही भाजपची नव्हे तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी आहोत.’
 
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. महिनाभरात मालेगावला सभा घेवू. मोकळ्या मैदानात बोलूया. आता निवडणुका झाल्या तर सर्वे सांगतोय की, मविआला 34 जागा मिळतील पण मी म्हणतो की आपण घट्ट राहीलो तर लोकसभेच्या 40 जागा मविआला मिळतील अशी आहे. जनतेने त्रिफळाच उडवायचे ठरवले तर ४८ जागाही शिवसेनेला मिळतील. असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor