शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (19:49 IST)

निपाह व्हायरस संसर्गाची लक्षणं काय? हा व्हायरस कसा पसरतो?

मयांक भागवत
कोरोनासंसर्गाचा मुकाबला करत असलेल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच 'निपाह' व्हायरसही सापडला आहे.पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांना वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये 'निपाह' व्हायरस आढळून आलाय. NIV च्या संशोधकांनी 'जर्नल ऑफ इन्फेक्शन आणि पब्लिक हेल्थ' मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 

वटवाघुळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणतात, "निपाह व्हायरसचे धोकादायक प्रकार प्रामुख्याने मलेशियातील वटवाघुळांमध्ये आढळून येतात. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणं गरजेचं आहे."
 

वटवाघुळांपासून पसरणाऱ्या 'निपाह' व्हायरस संसर्गामुळे 2018 मध्ये केरळात 18 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात आतापर्यंत चार वेळा 'निपाह' व्हायरसचा उद्रेक झाल्याची माहिती NIV ने दिलीये.
 

महाराष्ट्रात कुठे सापडला 'निपाह' व्हायरस?

महाराष्ट्रात मार्च 2020 मध्ये NIV च्या शास्त्रज्ञांना साताऱ्यात 'निपाह' व्हायरस आढळून आला. संशोधकांनी जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार,
 
• महाबळेश्वरच्या गुहेमध्ये, भारतात सामान्यत:आढळून येणाऱ्या दोन प्रजातिची वटवाघूळं पकडली.
 
• त्यांच्या रक्ताचे आणि घशाचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.
 
• 33 वटवाघुळांमध्ये 'निपाह' व्हायरसविरोधात अॅन्टीबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं.
 
• एका वटवाघुळात 'निपाह' व्हायरस आढळून आला. याचा अर्थ हा संसर्ग नवीनच होता.
 
NIV च्या शास्त्रज्ञ डॉ. प्रग्या यादव यांनी हे संशोधन केलंय.
 
"या पूर्वी महाराष्ट्रात वटवाघुळांच्या कोणत्याच प्रजातीत 'निपाह' आढळून आला नसल्याचं," NIV चे संशोधक सांगतात.
 
डॉ. महेश गायकवाड पुढे सांगतात, "हेनिपाव्हायरस, निपाह व्हायरसमधील सर्वांत घातक मानला जातो. पण, हा विषाणू महाबळेश्वरमध्ये वटवाघुळात आढळून आलेला नाही."
 
"हेनिपाव्हायरस मलेशियातील टेरोपस व्हॅमपायरस प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये सापडतो. ही प्रजाती भारतात सापडत नाही," असं ते पुढे म्हणाले.
 
तर, भारतात पहिल्यांदाच R. lechenaulitti प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये 'निपाह' व्हायरस सापडला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.
 
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे म्हणतात, "NIV च्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचं संशोधन केलंय. आजार पसरू नयेत यासाठी अशा प्रकारची संशोधनं फार महत्त्वाची आहेत."
 

लोकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी

साताऱ्यात सापडलेल्या निपाह व्हायसनंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे."निपाह व्हायरस आढळून आला असला तरी, नागरिकांना याचा धोका नाही. त्यामुळे, लोकांनी घाबरून जाऊ नये. झाडाखाली पडलेली पक्षांनी खाल्लेली फळं खाऊ नयेत," असं साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.
 
आरोग्य विभागानेही लोकामध्ये जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये सांगतात, "वटवाघूळं असलेल्या ठिकाणी जाऊ नका अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत."
 

'निपाह' व्हायरस काय आहे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे.तज्ज्ञ सांगतात, 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता 40 ते 70 टक्के असल्याचं आढळून आलंय. WHO च्या माहितीनुसार, निपाह एक झूनॉटिक (zoonotic) व्हायरसचा प्रकार आहे.याचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र, काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
 


'निपाह' व्हायरस पसरण्याची कारणं?


जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,'निपाह' व्हायरसचा संसर्ग वटवाघूळं आणि डुकरांपासून माणसांना होतो.एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते.फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवाघूळं 'निपाह' व्हायरसचे नैसर्गिक वाहक असतात.


वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड सांगतात, "निपाह व्हायरस वटवाघुळांच्या लाळेमध्ये असतो. वटवाघुळांनी खालेल्ली उष्टी फळं माणसांनी खाल्ली, तर, व्हायरस आपल्या शरीरात जातो. त्यामुळे झाडाखाली पडलेली उष्टी फळं खाऊन नयेत."
 

तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, वटवाघूळांची लघवी किंवा लाळेने दुषित झालेली फळं किंवा फळांचे पदार्थ खाल्याने निपाह व्हायरसचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता असते.
 

'निपाह' संसर्गाची लक्षणं काय?

नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे सांगतात, "ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत."तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते.निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाचं निदान करण्यात येतं.
 


'निपाह' व्हायरसवर लस उपलब्ध आहे?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'निपाह' व्हायरसवर सद्यस्थितीत कोणतीही ठोस उपचार पद्धत किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर सपोर्टिव्ह केअरच्या मदतीने उपचार केले जातात.
 
 

भारतात 'निपाह'चा उद्रेक कुठे झाला?
 
NIV च्या माहितीनुसार,भारतात सर्वात पहिल्यांदा 'निपाह' व्हायरस संसर्गाचा उद्रेक 2001 मध्ये झाला होता.2007 मध्ये पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात तर 2018 आणि 2019 मध्ये केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात 'निपाह' व्हायरसचा संसर्ग पसरला होता
 
 

वटवाघूळ संशोधकांचं म्हणणं काय?
 
निपाह व्हायरस वटवाघुळांपासून पसरत असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होते. महाराष्ट्रातही पहिल्यांदाच निपाह व्हायरस आढळला असल्याने, आम्ही वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांच्याशी चर्चा केली.
 

महाबळेश्वरमध्ये एकालाही निपाह व्हायरचा संसर्ग झाल्याची नोंद नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. NIV ने केलेल्या संशोधनावर बोलताना डॉ. महेश सांगतात, "NIV ने महाबळेश्वरमधील स्थानिकांवर संशोधन केलं पाहिजे. जेणेकरून निपाह व्हायरसचा हा कोणता प्रकार आहे? हा प्रकार घातक आहे का? याची माहिती मिळू शकेल. "डॉ. महेश गेली 20 वर्षं वटवाघूळांवर संशोधन करत आहेत.
 
"महाबळेश्वरच्या या गुहेत 2 लाखांपेक्षा जास्त वटवाघूळं आढळतात. या प्राण्यात अनेक प्रकारचे विषाणू आढळतात," असं ते सांगतात.