शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (09:52 IST)

ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबियांविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखावं अशा आशयाची याचिका एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केली होती. परंतु त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
वानखेडेंविरोधात किंवा त्यांच्याबाबत वक्तव्य करण्यापासून नवाब मलिक यांना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून नवाब मलिक पत्रकार परिषद आणि ट्वीटरच्या माध्यमातून समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा करत आहेत. तसंच मलिकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. यापार्श्वभूमीवर ज्ञानदेव वानखेडे यांनी ही याचिका दाखल केली होती.
आपल्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी केली जात आहे असं वानखेडेंनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांनी मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीची याचिकाही दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक यांनाही काही सूचना केल्या आहेत. मलिक यांनी आपल्याकडे असलेल्या माहितीची पडताळणी करूनच वक्तव्य करावी असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच त्यांनी दोन आठवड्यांत न्यायालयाकडे आपली बाजू सादर करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. 
याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी न्यायालयाच्या या निर्देशानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्यमेव जयते' असं ट्वीट करत हा लढा असाच सुरू राहिल असंही त्यांनी म्हटलंय.