शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 24 जुलै 2022 (10:12 IST)

नीरज चोप्रानं रचला इतिहास, अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक

Neeraj Chopra
नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अमेरिकेतील ओरगॉनमध्ये सुरू असलेल्या अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं रौप्य पदक मिळवलं आहे.अंतिम फेरीत नीरजनं 88.13 मीटर अंतराची नोंद केली.
 
अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक पटकावणारा नीरज पहिला भारतीय पुरुष आहे.
 
यापूर्वी अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत भारताला केवळ एक मेडल मिळालं होतं. अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदकाची कमाई केली होती.
 
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी झालेल्या फेरीत नीरज चोप्रानं 88.39 मीटरच्या पहिल्या थ्रोनेच फायनलमध्ये जागा निश्चित केली होती.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं भारतीयांची मान गर्वानं उंचावली होती. ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू नीरज चोप्रा बनला.
 
नीरज चोप्राचा असा आहे प्रवास
भारताला अॅथलिटिक्समध्ये पहिलं सुवर्णपदक नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवून दिलं.
 
भारत सरकारनं नीरजला 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवलं. तसंच, त्याला यापूर्वी परम विशेष सेवा मेडलही जाहीर करण्यात आलं आहे.
 
1. अकरा वर्षांपूर्वी केली भालाफेकीला सुरुवात
नीरज चोप्राचा जन्म हरयाणा जवळच्या पानिपत गावाजवच्या खंदरा खेड्यातला आहे. वडील शेतकरी आणि आई घरकाम करता करता वडिलांना शेतात मदत करणारी. घरात खेळांचं वातावरण अजिबात नव्हतं.
 
पण 2010मध्ये अकरा वर्षांचा असताना नीरजने पानिपतच्या एका मैदानात जसबीर सिंग नावाच्या एका खेळाडूला जोरात धावत येत हातातली अणकुचीदार वस्तू दूरवर फेकताना पाहिलं. हा सगळा प्रकार नीरजला नवीन होता. कुतुहल म्हणून तो तिथे रेंगाळला आणि घरी आला तो जयवीरचा मित्र होऊन तसंच भालाफेकीची जुजबी माहिती घेऊनच.
 
'खेळातला वेग, धावतानाचा तो आवेश आणि जसबीरची पिळदार शरीरयष्टी यांची त्यादिवशी मला भुरळ पडली. कुठलाही खेळ बघायला मला आवडायचं पण, यावेळी तो स्वत: खेळावासा वाटला,' नीरजने काही वर्षांपूर्वी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या होत्या.
 
2. ...तेव्हा नीरजचं वजन होतं 80 किलो!
गावा जवळच भालाफेकीचं प्रशिक्षण मिळतं हे तर कळलं. पण, नीरज शेतकऱ्याचा खाता-पिता मुलगा होता. घरातलं दूध आणि पनीर यावर वाढला होता. चोप्रा घराण्यातल्या या लाडक्या मुलाचं वजन होतं चक्क 80 किलो. किंबहुना त्याचं वजन थोडं कमी व्हावं म्हणूनच त्याच्या वडिलांनी पानिपत मैदानावर खेळाच्या मैदानावर आणलं होतं.
 
घरच्यांना सतत वाटत होतं की, त्याने कुठला तरी खेळ खेळावा, जेणेकरून त्याचं वजन आटोक्यात येईल. आणि त्यांना वाटलंही नसेल इतकी त्यांची योजना यशस्वी झाली. नीरजला भालाफेकीचा चसकाच लागला आणि हा खेळच त्याच्यासाठी सर्वकाही बनला.
सुरुवातीला पानिपतमध्ये जय चौधरी यांच्याकडे त्याने प्रशिक्षण सुरू केलं. पुढे क्रीडा प्राधिकरणाच्या पटियाळा केंद्रात जगप्रसिद्ध भालाफेकपटू उवे हॉन यांच्याकडून त्याला मार्गदर्शन मिळालं. उवे हॉन हे खेळातले असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी 100मीटरच्या वर भालाफेकीचा विक्रम केलाय. त्यांनीच नीरजमधला व्यावसायिक भालाफेकपटू घडवला.
 
पुढे नीरजने 2016मध्ये 20 वर्षांखालील वयोगटातली वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. पुढे 2018च्या कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये त्याने गोल्ड जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू. सध्या नीरज क्लाऊस बार्टोनेझ यांच्याबरोबर स्वीडनमध्ये सराव करतो.
 
3. ऑलिम्पिकपूर्वी नीरजचा उजवा हात मोडला होता
खरंतर दुखापती हा कुठल्याही खेळाच अविभाज्य भाग. पण, काही दुखापती कारकीर्दीवर परिणाम करणाऱ्या ठरतात. नीरजसाठी अशीच एक दुखापत त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच 2012मध्ये झाली. पानिपतमध्येच बास्केटबॉल खेळताना त्याच्या उजव्या हाताचं मनगटाचं हाड मोडलं.
 
ही दुखापत इतकी गंभीर होती की, नीरजला त्या वयात भीतीच वाटली आपण पुढे खेळू की नाही. पण, नशीबाने तो या दुखापतीतून बरा झाला. उजव्या हाताला जखम झाली असली तरी त्यामुळे त्याच्या खेळाच्या शैलीवर परिणाम झाला नाही. पुढे ऑलिम्पिकसाठी तयारी करत असतानाही याच हाताला परत एकदा मार बसला आणि तो 2019मध्ये तब्बल आठ महिने खेळापासून दूर होता.
 
एकतर कोव्हिडमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नव्हत्या. आणि त्यातच दुखापतीतून सावरण्याचं आव्हान. पण, आधी ऑलिम्पिक पुढे गेलं आणि मग भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने घेतलेल्या चाचणी स्पर्धेपूर्वी फिट होत नीरजने फिट होत नीरजने 83 मीटरवर भालाफेक करून कसंबसं शेवटच्या क्षणी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. पण, त्याची चिकाटी आणि आत्मविश्वास इतका दांडगा की, त्याने मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करत गोल्ड जिंकलंच.
 
त्याला दुखापत झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टोकयोची तयारी करणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधताना नीरजच्या दुखापतीची खास चौकशी केली होती.
 
4. भालाफेकीमुळे नववीतच शिक्षण सोडलं
बाराव्या वर्षी नीरजने भालाफेकीचं प्रशिक्षण सुरू केलं. त्यामुळे त्याची शाळा मात्र अर्धवट सुटली. नववीतच त्याने शालेय शिक्षण पूर्णपणे सोडलं. नंतर बाहेरून दहावी-बारावीची परीक्षा दिल्यानंतर आता तो बाहेरूनच बीएच्या परीक्षेला बसणार आहे. त्यासाठी कुरुक्षेत्र विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला आहे.
 
 
अठरा वर्षांचा झाल्यावर क्रीडा कोट्यातून त्याला भारतीय सैन्यदलात नोकरी मिळाली. पण, पदवी हातात नसल्यामुळे नायब सुभेदार पदावर त्याची वर्णी लागली. तो राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहे. आज त्याने गोल्ड जिंकल्यावर त्याला पहिल्या शुभेच्छा दिल्या त्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीच.
 
5. नीरजला आतापर्यंत मिळालेली मेडल आणि पुरस्कार
नीरज 19 वर्षांचा असताना 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्याने 86.48 मीटरचा जागतिक विक्रमही रचला. त्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नीरजचं कौतुक केलं होतं. आणि फेसबुकवर पोस्टही लिहिली होती.
 
पुढे 2018मध्ये त्याने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू. त्याचवर्षी भारत सरकारने नीरजला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केलं.