Marathi Biodata Maker

आभास: उत्कृष्ट काव्यसंग्रह!

Updated: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:20 IST)
मन म्हणजे काय?
नुसता विचारांचा कल्लोळ
भूत भविष्य वर्तमानाचा
असतो सारा घोळ...
 
सोप्या, सहज परंतु अर्थयुक्त अशा कविता रचण्यात ऋचा यांचा हातखंडा आहे. 'तिला जगू द्या' या आशयगर्भ कवितेची सुरवात कवयित्री मनाला भिडणाऱ्या शब्दांतून करतात,
ती इवलीशी उमलती कळी
नाजूक डहाळीवर नटलेली
सुंदर फूल होऊ द्या न तिला..
हक्क आहे तिला पण
फांदीवर बसून डोलण्याचा
 
थोडा खोलवर विचार केला तर ही कविता थेट स्त्रीभ्रूण हत्येवर हल्ला चढवताना दिसते. यातच कवयित्रीच्या लेखणीचे यश प्रतिपादित होते.
'स्त्री' एक सृष्टी निर्माती! स्त्रीबाबत न लिहिलेला लेखक विरळाच! ऋचा यांची 'स्त्री' कविता स्त्रीची महानता, तिची कर्तव्य दक्षता सिद्ध करणारी आहे. ऋचाचे शब्द...
"स्त्री" शब्दावर कविता लिहिणे
एवढे सोपे आहे का?
कारण स्त्री मात्र एक शब्द नव्हे
तर ती आहे संपूर्ण सृष्टी!
 
आपण भारतीय वेगवेगळे सण, उत्सव आणि दिन मोठ्या हौसेने, उत्साहाने साजरे करतो. मागील काही दशकांपासून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याची पद्धत रुढ होत आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा झाली, लेखन झाले. आभास संग्रहात 'व्हॅलेंटाईन डे' यावर एक वेगळी कविता वाचकांना वाचायला मिळते. यातून एक जाणवते ते हे की, एखाद्या गंभीर विषयावर मार्मिकपणे, सहजपणे, सुलभतेने लिहिण्यात ऋचा सक्षम आहेत. एक 'प्रियकर (आजोबा)' आपल्या 'प्रेयसीला' (आजीला) म्हणतात,
बरं, मग आज तू निवांत बसून माझ्या हातचा चहा घे!
कोबीचं फूल देत म्हणाले, डार्लिंग हैप्पी 'व्हॅलेंटाईन डे'!!

असे म्हणतात की, पहिले प्रेम आणि त्या प्रेमापोटी मिळालेली पहिली भेट अविस्मरणीय असते. पहिली भेट उत्कट असा प्रेमाविष्कार असतो. आजकाल प्रेयसीला किंवा होणाऱ्या पत्नीला मोबाईल भेट देणे ही पद्धत प्रचलित आहे.  आभास या संग्रहातील 'आऊटडेटेड मोबाईल' ही कविता अशाच आशयाची आहे...
असेल तो 'आउट डेटेड' पण मी
जपून ठेवला आहे फार
कारण तोच मोबाईल आहे
माझ्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार...
 
'आठवणींची दारं' ही उत्कट, तरल भावनांनी ओतप्रोत कविता थेट हृदयाचा ठाव घेते. या भावस्पर्शी कवितेच्या काही ओळी अशा...
पुन्हा एक नवीन पहाट उगवली
पुन्हा तुझी उणीव भासली...
पुन्हा आठवले तुझे ते डोळे सखोल
तू जवळ ये आणि एक शब्द तरी बोल..
पुन्हा माझी पहाट जिवंत करुन जा
नाही तर
तुझ्या आठवणींची दारं तूच लावून जा...
 
संसार फार कमी जणांना चुकवता आला असावा! सुख-दुःखांचा खेळ म्हणजे संसार! हाच धागा पकडून कवयित्री लिहितात...
ऊन सावलीचा 
हा खेळ खेळतांना
कधी खळखळून हसणे
कधी वाट आसवांना

आजोबांचे घर ही सिमेंटच्या जंगलात तशी कविकल्पना! मात्र, ज्यांनी कधीकाळी आजोबांचे घर, तिथल्या गमतीजमती, तिथले रुसवेफुगवे अनुभवले आहेत ते सारे आठवले की, त्यांच्या भावनांना ओलावा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ऋचा यांनी आजोबाच्या घरी खूप धिंगामस्ती केली आहे म्हणून त्यांचे अनुभवाचे बोल 'माझ्या आजोबांच्या घरी' या कवितेतून आपसूकच उमटतात. त्या लिहितात...
दिस गेले वर्षे सरली
आठवणींच्या लहरी
मन जातं अजूनही
माझ्या आजोबांच्या घरी...

आबालवृद्धांना, साहित्यिकांना आवडणारा आवडणारा महिना म्हणजे श्रावण! लहानपणी ऐकलेली 'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे' य कवितेची आठवण करुन देणारी 'श्रावण' ही वाचनीय आणि सर्वांना आवडेल अशी कविता आभास संग्रहात आहे...
बरसत्या श्रावण धारा, सखी माहेरीया जाते
नारळी पोर्णिमेचा सण भावंडांचे पवित्र नाते.
 
'अंदमान' हिंदू मानवाच्या मनातील एक महत्त्वाचा भाग! अंदमान आणि वीर सावरकर हे एक अद्भुत असे नाते आहे. अंदमान म्हटले की, आठवतात वीर सावरकरांना मिळालेल्या मरणप्राय यातना! हा धागा पकडून कवयित्री व्यक्त होतात...
नर्काच्या भोगुनी यातना वीर हुतात्मे जाहले
म्हणूनी आज आम्ही येथे स्वर्गसुख अनुभवले।
 
खरेतर ऋचा कर्पे यांची प्रत्येक कविता भावस्पर्शी, हृदयाला भिडणारी आहे. काही कविता निश्चित गेय आहेत. विविध भावभावनांचे मिश्रण असलेल्या कविता साध्या, सरळ भाषेत लिहिलेल्या आहेत. ओढूनताणून आणलेले शब्द कुठेही बसवलेले नाहीत. एक उत्कृष्ट असा काव्याविष्कार वाचायला मिळाल्याचे समाधान वाचकाला निश्चितपणे मिळते. कवयित्री ऋचा कर्पे यांच्या लेखनीला विविध विषयांचा सोस आहे. महाराष्ट्राशी तसा फारसा संबंध नसतानाही त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्त्व जाणवल्याशिवाय राहत नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. ऋचा कर्पे यांच्या आगामी साहित्य लेखनास अनंत शुभेच्छा! त्यांच्या लेखनीतून अधिकाधिक साहित्य प्रसवावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शॉपिजनच्या माध्यमातून मराठी भाषा साहित्य प्रसार व्हावा ही सदिच्छा!
 
आभास :- कविता संग्रह
कवयित्री:- ऋचा दीपक कर्पे
(९९२६५७६४५५)
प्रकाशक:- शॉपिजन. इन अहमदाबाद (गुजरात)
मुखपृष्ठ:- सारंग क्षीरसागर
पृष्ठसंख्या:- ६१
किंमत:- १५०/-
आस्वादक:- नागेश सू. शेवाळकर (पुणे)
(९४२३१३९०७१)

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

बाजारातून आणलेले पनीर खरे की भेसळयुक्त? ५ सोप्या घरगुती चाचण्यांनी लगेच ओळखा

Mixed vegetable khichdi मुलांसाठी बनवा पौष्टिक अशी मिक्स व्हेजिटेबल खिचडी

सायकलपेक्षाही हळू धावते भारतातील ही रेल्वे, जाणून घ्या तिच्यात असं काय विशेष आहे?

National Handloom Day 2026: राष्ट्रीय हातमाग दिन

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

पुढील लेख
Show comments