बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (08:54 IST)

सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्याने चमत्कारिक परिवर्तन होईल

जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील :
 
१) ब्रम्हमुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे
सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्राम्हमुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच काहीही न करता शांत बसा. ‘जो सुखाला, दु:खाला, जीवनाला, मृत्यूला जाणणारा आत्मदेव आहे, मी त्या सत-चित-आनंद्स्वरुपाच्या माधुर्यात शांत होत आहे. हे मायाविशिष्ट शरीर माझे नाही परंतु माय आणि मायेचे खेळ मज चैतन्यामुळे प्रकाशित होतात. ते चैतन्य मी आहे. सोsहम, या ब्रम्हभावात एक-दोन मिनिटे बसून रहा. भगवान श्रीकृष्णसुद्धा झोपेतून उठल्यावर काही वेळ शांत बसत असत. मीसुद्धा शांत बसतो. खूप लाभ होतो.
 
दिवसभर काम केल्याने जे मिळेल ते नश्वर मिळेल, सुटणारे, दु:ख देणारे मिळेल किंवा थोडेसे, मिटणारे, तुच्छ, किरकोळ सुख मिळेल; परंतु झोपेतून उठल्यानंतर काही न केल्याने सुख आणि दु:खाला थिटे करून परमात्म्याची भेट घालून देणारे पद (परमात्म-पद) मिळेल.
 
दिवसा केलेल्या पूजा-आरतीने लाभ होतो पण याचा लाभ अनेक पटीने अधिक होतो. काशी आणि मक्केला जाणे सर्वांच्या हातची गोष्ट नाही. सकाळी झोपेतून उठताच काही वेळ शांत व्हा, मग हजारदा काशी वा मक्केला गेल्यानंतरही जो मिळेल कि नाही सांगता येत नाही त्या परमात्म्याला तुम्ही भेटू शकता.
 
२) प्रार्थना
रोज प्रार्थना करा की ‘हे परमेश्वरा ! हे गुरुदेवा ! हे इष्टदेवा ! माझे ह्र्दय पवित्र होवो; पवित्र भाव आणि पवित्र ज्ञानाचा विकास होवो. सर्वामध्ये जी एक सत्ता वसलेली आहे, टी साक्षी, चैतन्य. सतस्वरूप आहे.
आदि सचु जुगादि सचु || है भी सचु नानक होसी भी सचु ||
त्या स्त्स्वरुपात माझी स्थिती व्हावी. असत शरीरात, असत सुख-दु:खात स्थिती झाल्याने माझा कित्येकदा जन्म-मृत्यू झाला. आता मी सतमध्ये स्थित व्हावे.’ ना साबणाने ह्र्दय पवित्र होईल ना पाण्याने. प्रार्थनेनेच ह्र्दय पवित्र होईल.
 
३) प्रणवचा दीर्घ जप
सकाळी गुरुमुर्तीला, इष्टमूर्तीला न्याहाळीत प्रणवचा दीर्घ जप करावा. ॐ कार सिद्धी, जीव आणि ईश्वरामधील एक सुंदर सेतू आहे. प्रणवचा दीर्घ जप एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता शक्तीचा संचय करते. ‘ॐ’ बीजमंत्र भोग, मोक्ष, आरोग्य, आयुष्य आणि साफल्य देणारा आहे. त्याचबरोबर हा शांती, आत्मबळ आणि बुद्धीचाही विकास करतो. आजपासून याचा जप सुरु करा. आजच दिवसभरात तुम्हाला याच्या सुंदरतेचा, याच्या महानतेचा थोडासा अनुभव होईल, उद्या आणखी जास्त होईल. दहा-वीस दिवसांनी तर तुमच्या शरीरातील पेशीमध्ये व मनात बरेच परिवर्तन होईल.
 
४) ध्यान
सकाळी ध्यानात वेळ व्यतीत केला पाहिजे. ध्यानासमान कोणतेही तीर्थ नाही, कोणताही यज्ञ नाही, कोणतेही तप नाही, कोणतेही दान नाही, कोणतेही स्नान नाही. कर्म करताना अधूनमधून एक-दोन मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या कर्माची आणखी शोभा वाढेल आणि तुमच्या चित्तातही कर्म करण्याचा आनंद येईल.
 
५) प्राणायम
दररोज प्राणायाम केले पाहिजेत. प्राणायाम केल्याने पापनाशिनी शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, अनुमान शक्ती, क्षमाशक्ती व शौर्यशक्ती विकसित होते तसेच स्मरणशक्तीसुद्धा वाढते. जे प्राणायामपरायण आहेत. अशा निष्पाप साधकांच्या ह्रदयात आत्मप्रकाश होतो.
श्वास घेवून रोखून ठेवून भगवन्नाम-जप केल्यास त्याचा शतपटीने प्रभाव होतो. भगवान्नामासह केलेले प्राणायाम थोड्याच दिवसांत तुम्हाला प्रसन्नचित्त, मधुमय, मधुर स्वभावी आणि सदभावनेने संपन्न करू शकतात.

६) मौन
मौन राहण्याचा अभ्यास (सराव) करा. मौनामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो, मनोबल व बुद्धीबळ वाढते. बोलल्याने शरीरातील मज्जा, ओज आणि जीवनशक्ती हे तिन्ही खर्च होतात. म्हणून सारगर्भित बोला, दहा शब्दांऐवजी सहातच काम निपटवा. रोज कमीतकमी तीन तास मौन राहण्याचा अभ्यास करा.
 
७) आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करा.
साधन केल्याने सदभाव तसेच बऱ्याच सिद्धी येतात. परंतु आपल्यात काही ना काही दोष असतात म्हणून परम सिद्धी- ब्रम्हज्ञान होत नाही. आपले दोष दूर करण्यासाठी सकाळी दृढ संकल्प करा आणि त्यातच संलग्न रहा. यासाठी जीवनात काही व्रत-नियम असले पाहिजे, दृढता असली पाहिजे.
आपले जीवन उन्नत करण्यासाठी वरील सात महत्त्वाची कार्ये अवश्य केली पाहिजेत. साधकाने या सात गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर थोड्याच दिवसांत त्याच्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन होईल.
 
-सोशल मीडिया