आसारामने भक्तांचे आभार मानले असून १५ मिनिटांची ही क्लिप आहे. निकालाच्या दिवशी शांतता कायम राखल्याबद्दल तसेच जोधपूर न्यायालयाच्या आवारात गर्दी न केल्याबद्दल त्याने समर्थकांचे आभार मानले आहे. काही लोकांनी मला आणि आश्रमाला बदनाम करुन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कट रचला. आश्रमाच्या लेटरहेडवर येणाऱ्या पत्रकांवर विश्वास ठेवू नका, असे आसाराम या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतो.जर कनिष्ठ न्यायालयाने चुक केली असेल तर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट त्या चुका सुधारेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. खरं कधी लपून राहत नाही आणि खोटं फार काळ टिकू शकत नाही, अच्छे दिन नक्की येतील, असे त्याने समर्थकांना उद्देशून सांगितले.जेल प्रशासनाने ऑडिओ क्लिप खरी असू शकते, असे सांगितले. तुरुंगातील प्रत्येक कैद्याला महिन्याला ८० मिनिटे फोनवर बोलण्याची मुभा असते. आसाराम बापूने तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनेच साबरमती आश्रमातील एका साधकाला फोन केला. त्यानेच आसाराम बापूचे बोलणे रेकॉर्ड केले असावे आणि ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली असावी, असे जोधपूर कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी सांगितले.