1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:33 IST)

'..तर आज आपला पंतप्रधान असता' : उद्धव ठाकरे

"बाळासाहेबांनी दाखवलेलं दिल्ली काबिज करण्याचं स्वप्न आपल्याला साकारायचं आहे. शिवसेनेची 25 वर्षं युतीमध्ये सडली. या लोकांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आपण आपल्या विरोधकांनाच म्हणजे भाजपला आपण पोसलं. मात्र आपण आता गप्प बसायचं नाही," असं प्रतिपादन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
 
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आणि दैनिक सामना वृत्तपत्राचा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख 7 मुद्दे..
1. दिल्ली काबीज करू
 
गेल्यावर्षी साधरणत: फेब्रुवारीत आपण वर्षा बंगल्यात भेटलो होतो आणि राज्यभर मोहीम राबवण्याचं ठरलं आणि दुसरी लाट आली.
 
आताही राज्यभर फिरण्याचं ठरवत होतो, सगळ्यांशी संवाद साधायचं, तर मानेच दुखणं उपटलं. त्यातनं बाहेर पडतोय, सगळ्यांच्या आशीर्वादानं हे शक्य झालं, तोच तिसरी लाट आली.
 
लाटामागून लाटा कोरोनाच्या येऊ शकतात, पण शिवसेनेची लाट सुद्धा आपण का आणू शकत नाही. एक विषाणू एक लाट आणत असेल, तर आपल्या मागे एक वारसा आहे.
 
दिल्लीचं काबिज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी दाखवलं, ते आपण करायचंय," असं उद्धव ठाकरे यावेळी
 
ते पुढे म्हणाले, "आज मी तुमच्यासोबत खूप दिवसांनंतर आलोय, दोन महिने मानेच्या शस्त्रक्रियेनंतर उपचारामध्ये गेले, लवकरात लवकर बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. जे माझ्या तब्येतीची काळजी घेतायत, ते काळजीवाहू विरोधक आहेत. काळजीवाहू विरोधक कोणेएकेकाळी आपले मित्र होते, कारण त्यांना आपण पोसलं. पंचवीस वर्षे आपली युतीमध्ये सडली, या भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे."
 
2. एकट्याने लढण्यास शिवसेना तयार
 
आम्ही हिंदुत्वापासून कधीच दूर जाणार नाही, आम्ही भाजपला सोडलं, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. हिंमत असेल तर एकट्यानं लढा असं आव्हान अमित शाह यांनी केलं, आम्ही ते स्वीकारलं आहे, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही षंढ नाही. पण लढत असताना अधिकारांचा गैरवापर करायचं नाही, आम्ही सत्ताधारी म्हणून अधिकार वापरणार नाही, असं ठाकरे पुढे म्हणाले.
 
3. हिंदुत्वापासून कधीच दूर जाणार नाही
 
आपण आता पुढे चाललो आहोत, पुढे जात असताना, ज्या पद्धतीने हे वागवलेत, भाजपची नितीच ही की वापरून फेकून द्यायचं, तेव्हा त्यांनी प्रादेशिक पक्षांशी युती केली, ममता, जयललित, समता.. आपणही त्यांना साथ दिली, आता तो भगवा पुसट झालाय. हे नवहिंदू आहेत, हे हिंदुत्वाचा स्वार्थासाठी वापर करत आहेत, सोयीसाठी बदलणारं हिंदुत्व आमचं नाही.
 
सत्ता पाहिजे म्हणून मेहबूबा मुफ्तीशी युती केली, संघमुक्त भाजप म्हणणाऱ्या नितीश कुमार यांच्याशी युती केली. तुम्ही आमच्यासोबत वचन दिलेलं मोडलंत, आणि गुलामासारखं वागवू पाहत होतात. आम्ही जे केलं ते सूर्य उजाडल्यावर केलं, सूर्य उगवण्याआधी शपथ घेतली नाही. हे आमचं हिंदुत्व आहे.
 
आम्ही जे काही करतो ते उघडपणे करतो. तुम्ही देश सांभाळा मी महाराष्ट्र सांभाळतो, असं आपण म्हणत होतो. पण तिथेच चुकलं आपलं, त्यांनी देश जिंकला, पण इथं आपली फसवणूक केली, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
 
4. नगरपंचायतीत पूर्वीपेक्षा जास्त यश
 
कालपरवा ज्या निवडणुका झाल्या, लोकसभा होत असेल, विधानसभा होत असेल, बँकेच्या निवडणुका असतील, आता ती वेळ आलीय, आता इतर राज्यातही निवडणुका लढवतोय. खरे हिंदुत्व काय आहे, ते घेऊन पुढे जायचे. विजयी झालो म्हणून उन्माद नको आणि पराभवानंतर खचणं नको.
 
या निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर, आपण सर्व जागा लढवल्या नव्हत्या, काही ठिकाणी आघाडी केली होती. आपले नगरसेवक किंवा सदस्य आले, त्यांचा आढावा घेतला, त्यामानाने आम्ही चार नंबरवर आलो, पण जागा किती आल्या, कदाचित मला वाटतंय, आजपर्यंत आपल्या जागा सर्वाधिक जास्त आल्या आहेत.
 
5. सगळ्याच निवडणुका गांभीर्याने लढवा
 
यावरच समाधान मानायला मी तयार नाही, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, असं आपण करतो. लोकसभा आणि विधानसभा लढवतो, तेवढ्या जिद्दीने या लढवत नाही.
 
ज्या पद्धतीने दुसरे पक्ष ज्या पद्धतीने साध्या निवडणुकांवर लक्ष देतात, मोठे नेते रिंगणात उतरतात. हे यापुढे व्हायला नको, गेल्या दोन वर्षात दोन विधानसभा आपणच हरलो, आपल्यातच गटबाजी झाली असं काहीजण म्हणतात.
 
जे शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांच्या मदतीने, मूठभर राहिले तरी चालेल, पण त्यांच्याकडे अभिमानाची तलवार देऊन उतरू.
 
एकहाती सत्ता आणि दोनहाती सत्ता, पण या हातांमध्ये बळ नसेल तर काही उपयोग नाही. ही संधी मिळालीय, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. महाराष्ट्रात लढणारा एकच पक्ष आहे आणि त्यांच्याच शिवसेनेसारखं बळ आहे. पश्चिम बंगालची वाघीण आहे ममता, आपण वाघ आला म्हणून घोषणा देतो, मात्र वाघाचं जीवन आपण जगलं पाहिजे. वाघ वाघासारखी डरकाळी फोडणार नसेल, तर वाघाचं नाव लावू नये.
 
6. तर आपला पंतप्रधान असता
 
सुरुवातीच्या काळात बाबरी पाडली, त्यावेळेला पळाले होते, नव्या हिंदुत्ववाद्यांकडे नवी पिढी आली, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर तिचा अभिमान आहे असं बाळासाहेब म्हणाले आणि देशभर शिवसेनेची लाट होती.
 
बाबरीनंतर शिवसेनेची लाट होती, असं म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, "बाबरीनंतर शिवसेनेनं सीमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता."
 
ते पुढे म्हणाले, "बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले होते. नवहिंदू सगळे भंपक नव्या पिढीला हे माहिती व्हावे म्हणून पुनरूच्चार करतोय. आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो."
 
ही लाट आपण पुन्हा आणून शकतं. तेव्हा जे घडलं ते आता घडू द्यायचे नाही. आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. आणीबाणी सदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसैनिकांनी समोर यायला हवे.
 
7. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढा
 
यापुढे प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या. आशाताईंच्या पुण्यात शिवसेनेने घेतलेल्या कार्यक्रमाची आठवण. निवडणुकीत निष्काळजीपणा नको. फाजील आत्मविश्वास नको. साहेबांच्या जन्मदिनी सांगेल तुम्ही महाराजांना मानता असं समजा आज महाराज रायगडावर आहे ते आपल्याला पाठीवर थाप देतील.
 
आजही साहेब आपल्यातच आहे, आपण अस काय केले तर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील असा रोज विचार करा. शिवसैनिक समर्थ बलवान आहे.
 
आपण अहोरात्र मेहनत करायची भगव्या परंपरा तोच भगवा साहेबांनी आपल्याला दिला असा मौल्यवान आहे. नत्राच्या हातीच शोभतो. दिवसागणिक भगव्याचे तेज वाढवत चला.