बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (07:45 IST)

Narak Chaturdashi 2022 : नरक चतुर्दशी महत्त्व आणि कथा

नरक चतुर्दशीचे महत्त्व
या दिवशी यमासाठी दीपदान करतात. या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घराच्या पुरुष मंडळींना स्नानाच्या वेळी औक्षण केले जाते. असे म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती अभ्यंग स्नान घेत नाही त्याला नरकासम त्रास भोगावे लागतात. 
 
या दिवशी वाईट लहरींना नाहीसे केले जाते. या दिवशी काही काही भागात कारीट नावाच्या फळाला पायाने ठेचतात. आपल्या इच्छेनुसार ब्राह्मणांना भोजन करवतात, दान देतात, यम दीपदान करतात. 
 
पहाटे अंधारात दिवे लावण्याचं महत्त्व
या दिवसाच्या आदल्या दिवशी वातावरण दूषित होतं. वाईट लहरी उद्भवतात. त्या वाईट शक्तीं याचा लाभ उचलतात. या वाईट शक्तींचा नायनाट करण्यासाठी सकाळी दिवे लावण्याचे महत्त्व आहे, जेणे करून त्या दिव्यांचा तेजामध्ये सर्व असुरी शक्तींचा नायनाट होवो. असुरी शक्तींचा संहार करण्याचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून या दिवसाचे महत्त्व सांगितले आहेत. 
 
या दिवशी अभ्यंग स्नान करत हा मंत्र म्हणावा 
'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये' 
 
सकाळी अंघोळ झाल्यावर देव्हाऱ्यात दिवे लावताना हे मंत्र म्हणावे
 
'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये'
 
संध्याकाळी आपल्या घर, दुकानात, कार्यालयात दिवे लावावे. हे व्रत केल्याने नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म देखील याच दिवशी झाला होता.
 
पूजा विधी
या दिवशी यमाची पूजा केल्यास अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. त्यामुळे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला धान्याचा ढीग ठेवावा. त्यावर मोहरीच्या तेलाचा एकमुखी दिवा लावावा, परंतु दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे वळवावी.
 
या सणाशी निगडित कथा
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडित एक कथा आहे. पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची. नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्या वेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्या बरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली. 
 
विष्णूंनी त्याला प्राग्ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेथ रथ दिले होते. नरकासुर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले असे. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले पण त्याची मैत्री बाणासुराशी होती त्यामुळे त्याचा संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असे श्राप देखील दिले होते. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केळी आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्या कडून मला कोणीही मारू शकणार नाही असे वर मागितले. 
 
वर मिळवून त्याने स्वतःला अजेय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका, मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. सगळे देव, गंधर्व, मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरविले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्यांचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. कृष्णाने गरूडावर बसून नरकासुराचे दोन तुकडे पाडले आणि त्याचा वध केला. 
 
कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार करणार कोण? 
 
असे लक्षात घेत कृष्णाने त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिले. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णावर पडले होते ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हा पासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पाडली गेली. 
 
नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वाना सांगितले की कोणीही त्याच्यांसाठी शोक करू नये. या उलट हा दिवस आनंदानं सण म्हणून साजरा करायचा. त्या वेळी पासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो. 
 
या दिवशी तेल लावून उटण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले गेले जाते.