1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 28 मे 2016 (13:15 IST)

चित्रपट परीक्षण : वीरप्पनचा रंजक प्रवास

चंदन अन् हस्तीदंत तस्करीत माहिर असलेला कुसे मुन्नीस्वामी वीरप्पन म्हणजे संदीप. त्याचा जन्म दक्षिणेतील जंगलात झाला. तिथल्या जंगलात वावरणारा, गनिमी काव्याने, छुप्या मार्गाने आपला अजेण्डा राबवणारा अन् आपल्या वाटेत येणार्‍याचा काटा काढणारा असा हा कलंदर, तस्करीतला माहिर खिलाडी असणार्‍या वीरप्पनला 18 ऑक्टोबर 2004 साली मोहिमेत यमसदनी धाडण्यात आलं. तोपर्यंत त्याने 900 हत्तींचा बळी घेतला होता. अन् 97 पोलिसांचे प्राण घेतले होते असा तो नराधम होता. एखाद्याच्या आयुष्यावर सिनेमा बेतलेला असतो त्यावेळी मात्र तो डॉक्युड्रामा होण्याची भीती असते, मात्र या सिनेमामध्ये असे अनेक सीन्स आहेत, फिल्म सुरू होते ती सत्यमंगलम जंगलात पोलिसाच्या निर्घृण हत्येने. 
 
मग एसटीएफ ऑफिसर कन्नन म्हणजे सचिन जोशीच्या नरेशनने वीरप्पनच्या त्या प्रवासाची सुरूवात होते. जिथून त्याला कुख्यात तस्कर व्हावं लागलं. अनेकांचा जीव घ्यावासा वाटला. त्याचे धागेदोरे मिळायला सुरूवात होते. रक्त अन् पैशाच्या खेळाने त्याच्या आयुष्याला दशांगुळे व्यापलं अन् सारं काही क्षणार्धात बदलून गेलं. मग त्याने मागे वळून काही पाहिलं नाही. कर्नाटक अन् तमिळनाडूच्या पोलिसांनी एकत्रित मोहीम राबवण्यापासून अनेक प्रयत्न कसे केले अन् त्यावेळी मुथ्थुलक्ष्मी म्हणजे उषा जाधव ही त्याची पत्नी कशी समोर येते अन् त्याचवेळेस कन्नन प्रिया म्हणजे लिसा रे सोबत प्लॅन कसा आखतो. प्रियाच्या नवर्‍याला वीरप्पनने मारलंय, त्यामुळे ती त्याची साथ देण्यासाठी कशाप्रकारे तयार होते. असा हा सारा खेळ आहे. मग ती जमिनीची मालकीण म्हणून येणं, मुथ्थुलक्ष्मीशी जवळीक सांधणं अन् त्यानंतर सार्‍या गोष्टी समोर येणं, मग या सार्‍यानंतर प्रियाने मास्टरप्लॅनचा भाग राहणं, मुथ्थुलक्ष्मी तिच्या नवर्‍याशी एकनिष्ठ राहते का, कन्ननच्या मिशनचं काय होतं. याचा रंजक प्रवास म्हणजे वीरप्पन आहे.