डॉक्टर बदला
माणूस आजारी पडला की, डॉक्टरकडे जातो. दोन-चार दिवसात गुण नाही आला तर दुसर्या डॉक्टरांकडे जातो. गेल्या 35 वर्षापासून जनतेची फसवणूक करणार्या उस्मानाबादच्या डॉक्टरांना या निवडणुकीत बदला, असे आवाहन सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सोमवारी, वैराग येथे महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. त्यावेळी उमेदवार प्रा. रवींद्र गाकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.
कोल्हे पुढे म्हणाले, देशात आज अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामध्ये बेरोजगारी, गरिबी, असुरक्षितता, भ्रष्टाचार आदींचा समावेश आहे. देशाला आज सशक्त नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व नरेंद्र मोदी देऊ शकतात, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
विकासासाठी मत द्या, गुंडगिरी, गुन्हेगारीला हद्दपार करा, असे आवाहन करत प्रा. गाकवाड यांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करा, असेही कोल्हे म्हणाले.