1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २८ वा

अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
 
श्रीरामचरित्र अतिसुरस ॥ परिसतां अंतःकरणीं उल्हास ॥ सांडोनि आठव विसरास ॥ राममय जाहलें ॥१॥
रघुवीरमहिमा विशेष ॥ शोधावया धांविन्नले मानस ॥ तंव ते उन्मत्त होऊनि निःशेष ॥ राममय जाहलें ॥२॥
बुद्धि धांवली वेगेंकरून ॥ गणावया जगद्वंद्याचे गुण ॥ तंव ते बौद्धरूप होऊन ॥ राममय जाहली ॥३॥
तो चित्तास आला आवेश ॥ धणी भरी वर्णावया अयोध्याधीश ॥ तें चैतन्यरूप होऊनि विशेष ॥ राममय जाहलें ॥४॥
कास घाली अहंकार ॥ पावेन रामकथाब्धीचा पार ॥ तो ब्रह्मानंदीं बुडाला साचार ॥ निरहंकार होऊनियां ॥५॥
ऐकतां रघुनाथचरित्र ॥ श्रवण होऊनि ठेले चकित ॥ त्वचा आनंदमय होत ॥ इतर स्पर्श टाकूनियां ॥६॥
राम पहावया वेळोवेळीं ॥ चक्षूंनी घेतली आळी ॥ रसना आनंदें नाचों लागली ॥ रामचरित्र वर्णावया ॥७॥
रामचरणकमळींचा आमोद ॥ सेवावया घ्राण झालें मिलिंद ॥ एवं सर्व इंद्रियवृंद ॥ रघुनाथीं लीन जाहला ॥८॥
वक्ता म्हणे दश इंद्रियांतें ॥ जिव्हेसी भाग्य आलें अद्भुतें ॥ रघुपतीचें गुण वर्णीते ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९॥
श्रोते म्हणती आमचे श्रवण ॥ दशइंद्रियांमाजी धन्य ॥ पुढें बोले कथानुसंधान ॥ युद्धकांड सुरस तें ॥१०॥
सत्ताविसावे अध्यायीं कथन ॥ रामें वधिला कुंभकर्ण ॥ उद्विग्न जाहला रावण ॥ तों वीर सहाजण उठिले ॥११॥
महापार्श्व आणि महोदर ॥ देवांतक नरांतक त्रिशिर ॥ अतिकाय राजपुत्र ॥ शक्रजिताचा कनिष्ठ बंधु ॥१२॥
घेऊनि चतुरंग सेना ॥ साही चालिले रणांगणा ॥ रणवाद्यें वाजती नाना ॥ ऐकतां मना भय उपजे ॥१३॥
महाद्वार उल्लंघून ॥ बाहेर निघाले साहीजण ॥ तों साही रथांवरी आणून ॥ शिरें टाकिली गृध्रांनीं ॥१४॥
ऐसा होतां अपशकुन ॥ मनीं विराले साहीजण ॥ परी वीरश्री नावरे पूर्ण ॥ वेगीं रणांगणीं पातले ॥१५॥
देखतां अमित्रांचे भार ॥ स्मरारिमित्रांचे उठिले वीर ॥ घेऊन पर्वत तरुवर ॥ समरांगणीं मिसळले ॥१६॥
राक्षसांचे झाले अस्थिपंजर ॥ क्षण माघारले असुर ॥ तंव तो नरांतक राजपुत्र ॥ तुरंगारूढ धांविन्नला ॥१७॥
अनिवार कपींचा मार ॥ बळें विदारिती वानर ॥ मृत्तिकाघटवत फोडिती शिर ॥ कीं पूगीफल चूर्ण केलें ॥१८॥
तो तुरुंग श्यामकर्ण ॥ क्षीरार्णवाचें हृदयरत्न ॥ कीं मुसेंत आटोनि चंद्रकिरण ॥ तुरंगोत्तम ओतिला ॥१९॥
कीं जान्हवीचे तोये घडिला ॥ कीं उच्चैःश्रव्याचा बंधु आला ॥ सुपर्णाहुन वेगें आगळा ॥ ऐसा प्रवेशला परदळी ॥२०॥
जैसी प्रळयविद्युल्लता ॥ तैसी झळके असिलता ॥ अलातचक्र जेवीं फिरतां ॥ दृष्टीं न दिसे कवणातें ॥२१॥
अश्व खर्ग क्षत्री पाहीं ॥ तिनी मिळाली एके ठायीं ॥ नरांतकें ते समयी ॥ ख्याति केली अद्भुत ॥२२॥
अठरा लक्ष ते क्षणीं ॥ वानर मारिले रणांगणी ॥ किंचित माघारले द्रुमपाणी ॥ तें अंगदें दुरोनि लक्षिलें ॥२३॥
अनिवार नरांतकाचा मार ॥ वानरवीर होतां समोर ॥ सहस्रांचे सहस्र ॥ घायासरिसे पाडितसे ॥२४॥
धांवे जैसा कृतांत ॥ तैसा पेटला वाळिसुत ॥ कीं वृक्षावरी अकस्मात ॥ सौदामिनी पडियेली ॥२५॥
तैसा अंगद अकस्मात आला ॥ कठोर पाणिप्रहार दीधला ॥ नरांतकाचा अंत जाहला ॥ अश्वासहित ते काळीं ॥२६॥
नरांतक पडतां चौघेजण ॥ अंगदावरी धांवले चहूंकडून ॥ महापार्श्व महोदर जाण ॥ देवांतक आणि त्रिशिर ॥२७॥
दोन पर्वत करी घेऊन॥ उभा ठाकला वाळीनंदन ॥ चौघांसी युद्ध करितां पूर्ण ॥ अंगद संकटीं पडियेला ॥२८॥
तंव ते धांवती तिघेजण ॥ वृषभ नळ वायुनंदन ॥ नळें पर्वतघायेंकरून ॥ महोदर रणीं मारिला ॥२९॥
देवांतकासमीप हनुमंत ॥ येऊन तयासी बोलत ॥ तुज देवांतक नाम सत्य ॥ कोण्या मूढें ठेविलें ॥३०॥
निर्नासिकासी नाम रतिकांत ॥ कीं जारासी नाम ब्रह्मचारी म्हणत ॥ कीं ज्याचें नांव आदित्य ॥ तो अंधारीं पडियेला ॥३१॥
जंबूक दृष्टी देखतां पळे ॥ त्यासी केसरी नाम ठेविलें ॥ दोनी नेत्र संकोच जाहले । कमळनेत्र नाम तया ॥३२॥
अमंगळानाम भागीरथी ॥ अनुसूया नाम जारिणीप्रती ॥ कीं बाळविधवेसी निश्चितीं ॥ जन्मसावित्री हे नाम ॥३३॥
कोरान्न मागतां न मिळे कण ॥ तयासी इंद्र नाम ठेविलें पूर्ण ॥ जया क्षीरसिंधु नामाभिधान ॥ परी तक्रही न मिळे प्राशना ॥३४॥
अजारक्षका नाम पंडित ॥ काष्ठवाहका नाम नृपनाथ ॥ की दरिद्रियासी नाम प्राप्त ॥ कुबेर ऐसें जाहलें ॥३५॥
जैसे अजागळींचे स्तन ॥ कीं मुखमंडण बधिरकर्ण ॥ गर्भांधाचे विशाळ नयन । तैसें जाण नाम तुझें ॥३६॥
वृषभासी सिंहासन ॥ श्वानासी अर्गजालेपन पूर्ण ॥ कीं दिव्यांबर परिधान ॥ जैसें उष्ट्रासी करविलें ॥३७॥
कनकवृक्ष धोत्रियासी म्हणती ॥ कीं चर्माचा केला हस्ती ॥ पक्षियासी भरद्वाज म्हणती ॥ देवातक तव नाम तैसें ॥३८॥
ऐसे बोलोनि वायुकुमर ॥ हृदयीं दिधला लत्ताप्रहार ॥ संपला देवांतकाचा संसार ॥ तों त्रिशिरा सत्वर धांविन्नला ॥३९॥
हनुमंतें वृक्ष घेऊन ॥ त्रिशिरा मरिला न लागतां क्षण ॥ ऋषभे पर्वत घेऊन ॥ महापार्श्व मारिला ॥४०॥
ऐसें अतिकाय देखोन ॥ सारथियासी म्हणे प्रेरीं स्यंदन ॥ सर्वांसी अलक्ष करून ॥ रामावरी धांविन्नला ॥४१॥
सहस्र घोडे ज्याचे रथी ॥ एके सूत्रें आंवरी सारथी ॥ अरुणासही न टिके गती ॥ नवल कपी करिती पैं ॥४२॥
अतिकायाचे स्थूळ शरीर ॥ इंद्रजिताऐसा प्रचंड वीर ॥ तया समोर जाहले पांच वानर ॥ पर्वत होती घेऊनियां ॥४३॥
गवय गवाक्ष कुमुद ॥ शरभ आणि पांचवा मैंद ॥ पर्वत टाकिती सुबुद्ध ॥ एकदांच ते काळीं ॥४४॥
अतिकायें सोडूनि बाण ॥ पर्वत टाकिले पिष्ट करून ॥ शरी खिळिले पांचही जण ॥ आरंबळत पडियेले ॥४५॥
बिभीषणासी पुसे रघुनंदन ॥ अहो हा आहे कोणाचा कोण ॥ येरु म्हणे रावणाचा नंदन ॥ नामाभिधान अतिकाय ॥४६॥
हा दिव्यरथ तेजागळा ॥ ब्रह्मदेव यासी दिधला ॥ हा अनिवार असे झाला ॥ पुरुषार्थ याचा अद्भुत ॥४७॥
हा कोणास नाटोपे पूर्ण ॥ तुम्हींच उठावें घेऊन धनुष्यबाण ॥ कीं पाठवावा उर्मिलाजीवन ॥ याचा प्राण घ्यावया ॥४८॥
काढिली चापाची गवसणी ॥ जेवीं निशांतीं प्रकटे तरणी ॥ कीं कुंडांतील महाअग्नि ॥ याज्ञिकें फुंकोनि चेतविला ॥४९॥
तों विनवी सुमित्रानंदन ॥ मी अतिकायासी युद्ध करीन ॥ अवश्य म्हणे सीताजीवन ॥ विजयी होई रणांगणी ॥५०॥
 
अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक ५१ ते १००
चाप चढवूनि सत्वर ॥ पुढें धांवे सुमित्राकुमर ॥ म्हणे रे अतिकाया तुझें स्थूल शरीर ॥ विटंबीन आजि घातें ॥५१॥
तुझे स्थूल सूक्ष्म देह दोन्ही ॥ शरें वेगळे करीन समरांगणी ॥ आतां लंकेत परतोनी ॥ कैसा जाशील माघारा ॥५२॥
कृतांताचियां मुखांत ॥ सांपडला राक्षस समस्त ॥ कुंजर गेला सिंहदरींत ॥ तो कैसा येईल माघारा ॥५३॥
काळें पाश घालूनि ॥ ओढून तुज आणिलें रणीं ॥ भुजंगाचे कवेतूनि ॥ मूषक कैसा जाईल ॥५४॥
अतिकाय म्हणे ते समयीं ॥ तूं वीर म्हणविशी पाहीं ॥ महाव्याघ्राचें सोंग पाही ॥ जंबुकें जैसे धरियेले ॥५५॥
नट नृप जाहला वेष धरून ॥ परी त्या न भीती कोणी जन ॥ वरी वैराग्य दावी पूर्ण ॥ अंतरीं मन तळमळीं ॥५६॥
अयोध्या सांडोनि लवलाहीं ॥ प्रारब्धे आणिलें ये ठायीं ॥ आतां कोणाचे पायीं ॥ जाल तुम्हीं येऊनियां ॥५७॥
स्वर्गी तुमचे पितृगण ॥ काय करिती तेथे बैसोन ॥ त्यांचा समाचार आणावया पाठवीन ॥ तुम्हांस आतां ये काळीं ॥५८॥
ऐसें ऐकोन अतिकायाचें वचन ॥ सौमित्र म्हणे सावधान ॥ आतां सांभाळीं माझे बाण ॥ तुझे प्राणहरते जे ॥५९॥
तों अतिकाय लोटी स्यंदन ॥ जो शतखणीं मंडित पूर्ण ॥ मित्रकरसंख्या वारू जाण ॥ श्वेतवर्ण योजिले ॥६०॥
सौमित्र सोडी पांच बाण ॥ नेणों पंच चपळा निघाल्या मेघांतून ॥ लंकेशपुत्रें देखोन ॥ योजिला बाण ते काळीं ॥६१॥
चापापासून सुटतां बाण ॥ तेणें पांच शर टाकिले खंडून ॥ मग सोडीत सहस्रबाण ॥ सुमित्रानंदन ते काळीं ॥६२॥
परम चपळ अतिकाया ॥ तितुके शर तोडी लवलाह्यां ॥ प्रळयमेघां परी गर्जोनियां ॥ सहस्र बाण सोडिले ॥६३॥
मग लक्षांचे लक्ष बाण ॥ सोडी सुमित्रानंदन ॥ कीं बाणांचाच पर्जन्य ॥ वर्षतसे ते काळीं ॥६४॥
तेथें गजमस्तकें विराजित ॥ मुक्तें त्याचि गारा उसळत ॥ शक्ति विद्युलता अद्भुत ॥ पूर वहात अशुद्धाचे ॥६५॥
तेथें शस्त्रें जाती वोसन ॥ प्रेतें वृक्ष जाती वाहोन ॥ वीरांचे हस्त विरोळे पूर्ण ॥ तळपताती ठायीं ठायीं ॥६६॥
वीरांचे दंत विखुरले बहुत ॥ तेचि वाळू असंख्यात ॥ खेटकें वरी तरत ॥ तेचि कूर्म जाणावे ॥६७॥
गजशुंडा वाहती ॥ तेचि नाडेसावजे तळपती ॥ असो ऐसी सौमित्रें केली ख्याती ॥ मान तुकाविती वानर ॥६८॥
बहुतास्त्रें नाना शस्त्रें ॥ सौमित्रावरी लंकेशपुत्रें ॥ टाकिलीं परी सौमित्रें ॥ छेदोनियां पाडिली ॥६९॥
मग सौमित्रें काढिला दिव्य बाण ॥ मुखीं ब्रह्मास्त्र स्थापून ॥ कल्पांतविजेसमान ॥ चापापासून सोडिला ॥७०॥
निमिष न लागतां साचार ॥ छेदिलें अतिकायाचें शिर ॥ झाला एकचि जयजयकार ॥ सुमनें सुरवर वर्षती ॥७१॥
बहुसाल आटिलें दळ ॥ लंकेत प्रवेशले घायाळ ॥ रावणापुढें सकळ ॥ समाचार सांगती ॥७२॥
सिंहासनारूढ रावण ॥ खालीं पडे मूर्च्छा येऊन ॥ मग इंद्रजितें धांवोन ॥ सांवरून बैसविला ॥७३॥
म्हणे माझीं साही निधानें गेली ॥ पुनः परतोन नाहीं देखिलीं ॥ अतिकायासारिखा बळी ॥ पाठिराखा तुझा गेला ॥७४॥
इंद्रजित म्हणे रायाप्रती ॥ होणार न चुके कल्पांतीं ॥ आतां युद्धासी जातो मी निश्चितीं ॥ शत्रुक्षय करावया ॥७५॥
चतुरंग दळेंसी झडकरी ॥ रणमंडळीं आला शक्रारी ॥ सेनादुर्ग ते अवसरी ॥ आपणाभोंवते रचियेले ॥७६॥
रक्तें करूनियां स्नान ॥ रक्तवर्ण वस्त्रें नेसून ॥ बिभीतकसमिधा आणोन ॥ सर्षपधान्यसंयुक्त ॥७७॥
रणमंडळीं केलें हवन ॥ आंतून निघाला स्यंदन ॥ धनुष्य तूणीर शस्त्रें पूर्ण ॥ सारथि अश्वांसमवेत ॥७८॥
त्या रथी बैसोन झडकरी ॥ मेघाआड गेला शक्रारी ॥ दुर्धर शर ते अवसरी ॥ वर्षता जाहला अपार ॥७९॥
ते बाण नव्हती संपूर्ण ॥ वर्षत विजांचा पर्जन्य ॥ शिरें आणि कर चरण ॥ कपींचीं तुटतीं तटतटां ॥८०॥
कोट्यनकोटी पडिले वानर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥ एकाखालीं एक दडपती वीर ॥ परम दुस्तर ओढवलें ॥८१॥
एक पळावया योजिती ॥ तात्काळ कर चरण खंडिती ॥ रामसौमित्र तटस्थ पाहती ॥ अंगीं आदळती सायक ॥८२॥
धनुष्यें हातींची गळोनी ॥ रामसौमित्र तटस्थ पाहती ॥ अंगीं आदळती सायक ॥८२॥
धनुष्यें हातींची गळोनी ॥ रामसौमित्र पडले धरणीं ॥ लीलावतारी चापपाणी ॥ दाखवी करणी शत्रूची ॥८३॥
शतबाणें इंद्रजितें ॥ खिळिलें रामसौमित्रांतें ॥ पुराणसंख्या बाणीं अर्कजातें ॥ विंधोनि भूमी पाडिलें ॥८४॥
शास्त्रसंख्याबाणी ॥ गंधमादन पाडिला रणीं ॥ रविसंख्येनें धरणीं ॥ ऋषभ मैंद पाडिले ॥८५॥
चंद्रकळासंख्या बाणीं नीळ ॥ सागर संख्यें ऋक्षपाळ ॥ स्कंदमुखसंख्येनें नळ ॥ प्रेतवत पाडिला ॥८६॥
ऋत्ववर्धदिवससंख्याबाणी ॥ अंगद पाडिला समरांगणीं ॥ गवय गवाक्ष शरभ तीनी ॥ संवत्सरसंख्यांनीं खिळिलें पैं ॥८७॥
सोडून कळासंख्याबाण ॥ खिळिला दधिमुख पावकलोचन ॥ विद्यासंख्या सायक पूर्ण ॥ सुषेणावरी घातले ॥८८॥
रुद्रनेत्रसंख्या टाकून शर ॥ खिळिले गज केसरी वानर ॥ हेमकूट गौरमुख वीर ॥ युगसंख्यांनीं खिळियेले ॥८९॥
सुमुख दुर्मुख ज्योतिमुख ॥ यांवरी अवतारसंख्यासायक ॥ वरकड वानर जे असंख्य ॥ ते बाणसंख्यांनीं खिळियेले ॥९०॥
ऐसा करूनियां अनर्थ ॥ खालीं उतरे इंद्रजित ॥ जयवाद्यें वाजवित ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥९१॥
परम हर्षयुक्त रावण ॥ पुत्रासी देत आलिंगन ॥ म्हणे माझा प्रताप वाढविला पूर्ण ॥ तुवां एकें पुत्रराया ॥९२॥
असो वानर पडिले सर्व ॥ परी दोघे उरले चिरंजीव ॥ बिभीषण हनुमंत बलार्णव ॥ प्रियप्राण राघवाचे ॥९३॥
दोघे अत्यंत म्लानवदन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रुदन ॥ म्हणती काळ कैसा कठिण ॥ आतां विचार कोण करावा ॥९४॥
अस्ता गेला वासरमणी ॥ प्रर्वतली घोर रजनी ॥ मग चुडिया पाजळोनि ते क्षणीं ॥ रण शाधूं निघालें ॥९५॥
महावृक्ष उन्मळले ॥ तैसे ठायीं ठायीं वीर पडले ॥ रण घुमत असे ते वेळे ॥ दोघेजण देखती ॥९६॥
तंव तो वीर जांबुवंत ॥ पडलासे आरंबळत ॥ मग तया सांवरूनि हनुमंत ॥ बैसविता जाहला ॥९७॥
जांबुवंत बोले वचन ॥ या चराचराचा निजप्राण ॥ तो सुखी असे की रघुनंदन ॥ अनुजासहित सांग पां ॥९८॥
स्फुंदस्फुंदोनी सांगे बिभीषण ॥ निचेष्टित पडले रामलक्ष्मण ॥ त्याचपरी सकळ सैन्य ॥ प्राणहीन पडलें असे ॥९९॥
मग बोले ऋक्षपाळ ॥ कोणी आणील द्रोणाचळ ॥ तरी त्या वल्लीसुवासें सकळ ॥ वीर आतां उठतील ॥१००॥
 
अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक १०१ ते १५०
उगवला नसतां वासरमणी ॥ औषधी आणाव्या त्वरेंकरूनि ॥ ऐसें ऐकतां तये क्षणीं ॥ मारुतात्मज आवेशला ॥१॥
क्षीराब्धीचे पैलतीरीं ॥ चार कोटी योजने दूरी ॥ मारुती म्हणे तृतीय प्रहरीं ॥ औषधी वेगीं आणितों ॥२॥
बिभीषणासी हनुमंत ॥ बोले होऊन सद्रदित ॥ जतन करावा रघुनाथ ॥ सौमित्रासहित जीवेंसी ॥३॥
ऐसे बोलोनि हनुमंत ॥ वेगें उडाला आकाशपंथ ॥ म्हणे यशस्वी अयोध्यानाथ ॥ शक्तिदाता होईं कीं ॥४॥
चपळ पणिद्वय चरण ॥ घेत उड्डाणावरी उड्डाण ॥ कीं क्षीराब्धीप्रति सुपर्ण ॥ वैकुंठींहून जातसे ॥५॥
लक्षून मानससरोवर ॥ मराळ झेंपावें सत्वर ॥ त्याचपरी अंजनीकुमर ॥ सप्तद्वीपें ओलांडी ॥६॥
सप्तसमुद्र ओलांडून ॥ द्रोणाचळाजवळी येऊन ॥ जनकजाशोकहरण ॥ उभा ठाकला ते वेळीं ॥७॥
अगस्ति सागराचें तीरी ॥ की त्रिविक्रम बळीचे द्वारीं ॥ कीं नृपाचिया भांडारी ॥ तस्कर जैसा संचरें ॥८॥
कीं तरूजवळी येऊनि ॥ उभा ठाकला कुठारपाणी ॥ कीं निधानापासी प्रीतिकरूनि ॥ सावध उभा ठाकला ॥९॥
असो कर जोडूनि हनुमंत ॥ द्रोणाचळातें स्तवित ॥ म्हणे तूं परोपकारी पर्वत ॥ पुण्यरूप नांदसी ॥११०॥
तुझें करितांचि स्मरण ॥ सकळ रोग जाती पळोन ॥ तरी शरजालीं रामलक्ष्मण ॥ इंद्रजितें पाडियेले ॥११॥
तूं जीवनदाता सत्य ॥ त्रिभुवनामाजी यथार्थ ॥ कीर्ति ऐकोनियां धांवत ॥ मी याचक आलों असें ॥१२॥
औषधी देऊनियां निर्मळ ॥ मज बोळवावें तत्काळ ॥ तंव तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शैल ॥ बोलता जाहला कपीसी ॥१३॥
म्हणे मर्कटा आलासी कोठून ॥ कैंचा राम कैंचा लक्ष्मण ॥ देवांस औषधी दुर्लभ जाण ॥ तुज कोठून प्राप्त होती ॥१४॥
धरूनि माझा आश्रय ॥ मर्कटा तूं येथेंचि राहें ॥ त्यावरी तो राघवप्रिय ॥ काय बोलता जाहला ॥१५॥
म्हणे पाषाणहृदयी तूं द्रोण ॥ मंदबुद्धि मूढ मलिन ॥ कार्याकार्य तुजलागोन ॥ निर्दया कैसें समजेना ॥१६॥
वायसा काय मुक्ताहार ॥ मद्यपीयास काय तत्त्वविचार ॥ निर्दयासी धर्मशास्त्र ॥ सारासार समजेना ॥१७॥
मांसभक्षकास नुपजे दया ॥ हिंसकास कैंची माया ॥ उपरति पैशून्यवादिया ॥ कदाकाळें नसेचि ॥१८॥
कृपणासी नावडे धर्म ॥ जारासी नावडे सत्कर्म ॥ निंदकासी नावडे प्रेम ॥ भजनमार्ग कदाही ॥१९॥
कीर्तन नावडे भूतप्रेतां ॥ दुग्ध नावडे नवज्वरिता ॥ टवाळासी पैं तत्वतां ॥ तपानुष्ठान नावडे ॥१२०॥
तैसा तु अत्यंत निष्ठुर ॥ रामभजन नेणसी पामर ॥ तुज न लागतां क्षणमात्र ॥ उचलोनि नेतो लंकेसी ॥२१॥
शेषाकार पुच्छ पसरून ॥ द्रोणाचळ बांधिला आंवळून ॥ तत्काळचि उपडोन ॥ करतळीं घेऊन चालला ॥२२॥
उगवल्या असंख्यात सौदामिनी ॥ तैसा पर्वत दिसे दुरूनि ॥ कीं करी घेऊनियां तरणि ॥ हनुमंत वीर जातसे ॥२३॥
कीं सुधारसघट नेता सुपर्ण ॥ लीलाकमल उचली पूर्ण ॥ कीं सहस्रवदनें उर्वी उचलोन ॥ सर्षप्राय धरिली शिरीं ॥२४॥
कीं कनकताट द्रोणाचळ ॥ वल्ल्य़ा तेचि दीप तेजाळ ॥ पाजळूनियां अंजनीबाळ ॥ ओंवाळू येत रामातें ॥२५॥
चतुर्थ प्रहरीं ब्राह्मी मुहूर्ती ॥ सुवेळेसी आला मारुति ॥ तंव तो नूतनलंकापति ॥ सामोरा धांवे आनंदे ॥२६॥
तो सुटला शीतळ प्रभंजन ॥ चालिला वल्लींचा सुवास घेऊन ॥ त्या वातस्पर्शे रामलक्ष्मण ॥ सेनेसहित ऊठिले ॥२७॥
रजनी संपता तात्काळ ॥ किरणांसहित उगवे रविमंडळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ वानरांसमवेत ऊठला ॥२८॥
कोणाचे तनूवरी साचार ॥ घाय न दिसे अणुमात्र ॥ असो द्रोणाचळासी वायुपुत्र ॥ घेऊन मागुतीं उडाला ॥२९॥
लीलाकंदुक खेळे बाळ ॥ तैसा पर्वत झेली विशाळ ॥ पूर्वस्थळीं ठेवून तत्काळ ॥ सुवेळेसी पातला ॥१३०॥
देवांसहित शक्र बैसत ॥ तैसा कपिवेष्टित रघुनाथ ॥ सद्रद होवोनि हनुमंत ॥ रामचरणीं लागला ॥३१॥
जाहला एकचि जयजयकार ॥ प्रेमें दाटला रघुवीर ॥ हृदयी धरिला वायुकुमर ॥ तो न सोडीच सर्वथा ॥३२॥
स्कंदासी भेटे उमावर ॥ कीं इंद्रा आलिंगी जयंतपुत्र ॥ कीं संजीवनी साधितां पवित्र ॥ गुरु कचासी आलिंगी ॥३३॥
हनुमंताचें निजवदन ॥ क्षणक्षणां कुरवाळित रघुनंदन ॥ धन्य धन्य आजिचा दिन ॥ स्वामीगौरव लाहिजे तुवां ॥३४॥
श्रीराम म्हणे मारुतीसी ॥ सर्वांचा प्राणदाता तूं होसी ॥ सरली नाही जो निशी ॥ पर्वत तुवां आणिला ॥३५॥
बाळक होतां व्यथाभूत ॥ जनक जाऊनि औषधें आणित ॥ बा रे तैसेंच केले निश्चिंत ॥ प्रताप अद्भुत न वर्णवे ॥३६॥
ऐसें बोलता रघुनंदन ॥ सकळ कपी म्हणती धन्य धन्य ॥ स्वामीगौरवापुढें पूर्ण ॥ सुधारसपान तुच्छ पैं ॥३७॥
सुग्रीवादि कपी धांवती ॥ हनुमंतासी दृढ हृदयीं धरिती ॥ वानरांसी म्हणे किष्किंधापति ॥ यावरी काय पाहतां ॥३८॥
आतां लंकेवरी जाऊन ॥ सकळ सदना लावा अग्न ॥ अष्टदशपद्में वानर घेऊन ॥ नळ नीळ मारुति धांविन्नले ॥३९॥
गगनचुंबित तैलकाष्ठें ॥ कपींनी चुडी पाजळिल्या नेटें ॥ कीं ते रामभवानीचे दिवटे ॥ गोंधळ घालिती रणांगणी ॥१४०॥
चुडी घेऊनि समग्र ॥ भुभुःकारें गर्जविले अंबर ॥ जय जय यशस्वी रघुवीर ॥ म्हणोनी धांवती सर्वही ॥४१॥
लंकादुर्ग ओलांडून ॥ आंत प्रवेशले वानरगण ॥ तो अद्भुत सुटला प्रभंजन ॥ चुडिया लाविती एकसरें ॥४२॥
वायूचे अद्भुत कल्लोळ ॥ आकाशपंथें चालिली ज्वाळ ॥ लंकेमाजी हलकल्लोळ ॥ पळती लोक सर्व पैं ॥४३॥
धूर अद्भुत दाटलासे ॥ तेथे कोणा कोणी न दिसे ॥ ज्वाळा धांवती आवेशें ॥ लंका सर्व ग्रासावया ॥४४॥
कोट्यावधि घरें जळती ॥ राक्षस स्त्रियांसह आहाळती ॥ आळोआळीं उभे असती ॥ चुडी घेऊन वानर ॥४५॥
दृष्टीं देखतां रजनीचर ॥ चुडींनी भजिती वानर ॥ तो दशमुखासी समाचार ॥ दूत सत्वर सांगती ॥४६॥
हनुमंतें आणूनि द्रोणाचळ ॥ सजीव केले वैरी सकळ ॥ लंकेंत प्रवेशलें कपिदळ ॥ जाळिली सकळ मंदिरें ॥४७॥
मग जंघ प्रजंघ क्रोधन ॥ विरूपाक्ष शोणिताक्ष राजनंदन ॥ कुंभनिकुंभांप्रति रावण ॥ म्हणे धांवारे सत्वर ॥४८॥
सिद्ध करूनियां दळभार ॥ कुंभ निकुंभ धांवती सत्वर ॥ घालोनियां पर्जन्यास्त्र ॥ अग्नि समग्र विझविला ॥४९॥
जैसें कलेवर सांडोनि जाती प्राण ॥ तैसे लंकेबाहेर आले कपिगण ॥ रणभूमीसी सर्व मिळोन ॥ युद्धालागीं सरसावले ॥१५०॥
 
अध्याय अठ्ठावीसावा - श्लोक १५१ ते २१७
आले देखोनि असुरभार ॥ सेनामुखीं होता वाळिकुमर ॥ तो पर्वत घेऊन सत्वर ॥ क्रोधनावरी धांविन्नला ॥५१॥
बळें पर्वत दिधला टाकून ॥ रथासहित चूर्ण जाहला क्रोधन ॥ तों जंघ प्रजंघ विरूपाक्ष दारुण ॥ आले धांवूनि अंगदावरी ॥५२॥
अंगदें विशाळ वृक्ष उपडोनी ॥ दोघे झोडून पाडिले धरणी ॥ मग विरूपाक्षें निजबाणीं ॥ वानर बहुत खिळियेले ॥५३॥
तों मैंद पर्वत घेऊनि धांविन्नला ॥ अकस्मात विरूपाक्षावरी टाकिला ॥ विरूपाक्ष प्राणासी मुकला ॥ शरभें वधिला शोणिताक्ष ॥५४॥
मग तो कुंभकर्णाचा नंदन ॥ कुंभ पुढें आला धांवोन ॥ धनुष्य ओढोनि आकर्ण ॥ नव बाण सोडिले ॥५५॥
त्या नव शरप्रहारेंकरूनि ॥ मैंद कपी खिळिला समरांगणीं ॥ शरभ विंधिला दोन बाणीं ॥ मूर्च्छित धरणीं पडियेला ॥५६॥
तों धांवे वाळिसुत ॥ घेऊन विशाळ पर्वत ॥ त्याचे कुंभे खिळिले हस्त ॥ अचळासहित रणभूमीं ॥५७॥
संकट पडियेलें बहुत ॥ अंगद राहिला तटस्थ ॥ वानरीं हांक केली त्वरित ॥ राघवापासीं ते काळीं ॥५८॥
ऐकोनि गजकिंकाट देख ॥ आवेशें चपेटे मृगनायक ॥ यापरी किष्किंधापाळक ॥ कुंभहृदयीं आदळला ॥५९॥
कुंभाचें चाप घेतले हिरून ॥ मोडून कुटके केले पूर्ण ॥ मल्लयुद्धास दोघेजण ॥ प्रवर्तले ते काळीं ॥१६०॥
एक मुहूर्तपर्यंत ॥ मल्लयुद्ध दोघांशी अद्भुत ॥ अर्कजे हृदयीं मुष्टिघात ॥ कुंभासी बळें दिधला ॥६१॥
तेणें हृदय शतचूर्ण ॥ कुंभाचा तात्काळ ॥ गेला प्राण ॥ तंव तो निकुंभ आवेशोन ॥ सुग्रीवावरी धांविन्नला ॥६२॥
तों पर्वत सबळ उचलून ॥ वेगें धांवे सीताशोकहरण ॥ अचल दिधला भिरकावून ॥ निंकुंभें तो चूर्ण केला ॥६३॥
तेणें हनुमंत परभ क्षोभला ॥ विशाळ तरु त्यावरी टाकिला ॥ तोही निकुंभें तोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥६४॥
निकुंभें परिघ लवलाही ॥ घेऊन ताडिला मारुतिहृदयीं ॥ पळमात्र मूर्च्छना ते समयीं ॥ आली हनुमंतास ते काळीं ॥६५॥
सवेंचि धांवे अंजनीबाळ ॥ शतश़ृंगाचा उपटिला अचळ ॥ निकुंभावरी टाकिला तात्काळ ॥ चूर्ण जाहला निकुंभ ॥६६॥
घायाळें पळती लंकेत ॥ रावणासी वर्तमान करिती श्रुत ॥ ऐकतांचि तो चिंताक्रांत ॥ दशवक्र जाहला पैं ॥६७॥
मग विंशतिनेत्र तिघे वीर ॥ परम प्रतापी समरधीर ॥ खराक्ष विशालाक्ष असुर ॥ मकराक्ष तो तिसरा ॥६८॥
तिघांसी म्हणे दशवदन ॥ तुम्हीं माजवावें रण ॥ ते तात्काळ रथारूढ होऊन ॥ सेनेसहित निघाले ॥६९॥
रणतुरें गर्जती अपार ॥ रणमंडळीं पातले सत्वर ॥ तों शिळा द्रुम घेऊन वानर ॥ एकदांचि उठावले ॥७०॥
येरयेरां पाचारिती ॥ उसणे घाय सवेंच देती ॥ असुरांची पोटें फाडिती ॥ वानर नखे घालोनियां ॥७१॥
कुंत असिलता परिघ ॥ असुर टाकिती शस्त्रें सवेग ॥ तेणें विदारूनि आंग ॥ कपी पडती समरांगणी ॥७२॥
कपींवीरीं केलें आगळें ॥ असुरभार मागें लोटले ॥ देखोन मकराक्ष ते वेळे ॥ बाण वर्षत धांवला ॥७३॥
जैशा पर्जन्यधारा अपार ॥ तैसा मकराक्ष वर्षे शर ॥ अपार भंगले वानर ॥ पाहे रघुवीर दुरूनी ॥७४॥
मान तुकावी सीतारमण ॥ म्हणे हा वीर प्रवीण ॥ कोदंड चढवोनि आपण ॥ जगद्वंद्य ऊठिला ॥७५॥
कोदंड ओढिता तये क्षणीं ॥ झणत्कारिल्या लघु किंकिणी ॥ एकचि बाण ते क्षणीं ॥ दशकंठरिपूनें सोडिला ॥७६॥
मकराक्षाचें बाणजाळ ॥ एकेचि शरें छेदिलें तत्काळ ॥ जेवीं उगवता सूर्यमंडळ ॥ भगणे सकळ लोपती ॥७७॥
एक उठतां विनायक ॥ असंख्य विघ्नें पळती देख ॥ कीं सुटतां चंडवात सन्मुख ॥ जलदजाल वितुळे पैं ॥७८॥
एक विष्णुनामेंकरून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥ कीं चेततां कृशान ॥ असंख्य वनें दग्ध होती ॥७९॥
कीं मूर्खाचे शब्द बहुुत ॥ एकाच शब्दें खंडी पंडित ॥ कीं सिंहनादें गज समस्त ॥ गतप्राण होती पैं ॥१८०॥
हृदयी प्रकटतां बोध ॥ सहज पळे काम क्रोध ॥ कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद सर्व विरती ॥८१॥
तेवीं रामबाणें एकेंचि सबळ ॥ तोडिलें मकराक्षाचें शरजाळ ॥ मग त्यास मुक्ति द्यावया तत्काळ ॥ दिव्य शर काढिला ॥८२॥
मकराक्षाचा कंठ लक्षून ॥ शर चालिला जैसा सुपूर्ण ॥ क्षणमात्रें कंठ छेदून ॥ आकाशपंथें उडविला ॥८३॥
तों विशालाक्ष आणि खराक्ष ॥ त्यांहीं पाचारिला कमलदलाक्ष ॥ जो सर्वात्मा सर्वसाक्ष ॥ विरूपाक्ष ध्याय जया ॥८४॥
असुर धांवती लवलाहे ॥ म्हणती सर्वदा तुज कैंचा जय ॥ अकस्मात काकतालन्याय ॥ मकराक्ष तुवां मारिला ॥८५॥
ऐसें बोलून दोघेजण ॥ सोडिती रामावरी प्रचंड बाण ॥ जैसें मृगेंद्रापुढें येऊन ॥ मांडिलें ठाण मार्जारे ॥८६॥
कीं सज्ञान पंडितापुढें ॥ बोलावया आलीं मूढें ॥ कीं जंबुक आपुले पवाडे ॥ व्याघ्रापुढें दावितसे ॥८७॥
कीं उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥ तैसें राक्षसी संधान ॥ रामापुढें आरंभिलें ॥८८॥
दोघांही शर सोडिले अपार ॥ तितुके निवारूनि श्रीरघुवीर ॥ प्रळयचपळेऐसे थोर ॥ दोन शर काढिले ॥८९॥
ते धनुष्यावरी योजून ॥ अकस्मात सोडी रघुनंदन ॥ दोघांची कंठनाळे छेदून ॥ निराळमार्गे पैं नेलीं ॥१९०॥
कळला रावणासी समाचार ॥ परत्र पावले त्रय असुर ॥ तत्काळ महावीर ॥ सेनेसहित धांविन्नला ॥९१॥
होम करूनि रणमंडळी ॥ त्यांतून एक कृत्या निघाली ॥ रथीं बैसोन ते वेळीं ॥ अकस्मात उडाली ॥९२॥
त्या कृत्येआड बैसोन ॥ शक्रारि सोडी तेव्हां बाण ॥ म्हणे सर्वांसी खिळिन ॥ वानरगण भयभीत ॥९३॥
मग लोकप्राणेश येउनी ॥ सांगे जगद्वंद्याचे कर्णीं ॥ म्हणे अंगिरास्त्रेंकरूनी ॥ कृत्या छेदोनि टाकिजे ॥९४॥
कृत्येआड बैसोन ॥ इंद्रजित करी संधान ॥ रामें तात्काळ मंत्र जपोन ॥ अंगिरास्त्र सोडिलें ॥९५॥
तेणें कृत्या भस्म झाली झडकरी ॥ जैसा बोध प्रवेशतां अंतरीं ॥ दुर्वासना पळे बाहेरी ॥ तृष्णा कल्पना घेउनियां ॥९६॥
कीं प्रकटतां वासरमणि ॥ तम निरसे मूळींहूनी ॥ तैसा कृत्या छेदितां धरणीं ॥ इंद्रजित उतरला ॥९७॥
रणीं प्रकट उभा राहूनी ॥ अपार शर सोडी रावणी ॥ तो दुरात्मा देखूनि तत्क्षणीं ॥ वानर सर्व क्षोभले ॥९८॥
घेऊनियां महापर्वत ॥ रागें धांवे अंजनीसुत ॥ गदा घेऊनियां त्वरित ॥ बिभीषण चौताळला ॥९९॥
परिघ हातीं घेउनी ॥ मैंद धांवे क्रोधें करूनी ॥ कौमोदकी आकळोनी ॥ धन्वंतरीं पुढं जाहला ॥२००॥
शतघ्नी घेऊन सत्वर ॥ धांवे तो ऋषभ वानर ॥ शरभ धांवे घेऊनि चक्र ॥ गंधमादन शक्ति पैं ॥१॥
जांबुवंत घेऊनि गिरि थोर ॥ अंगदें उपडिला महातरुवर ॥ नीळ घेऊनियां तोमर ॥ शत्रूवरी धांविन्नला ॥२॥
नळें उचलोनि महाशिळा ॥ सुग्रीव पर्वत घेऊन धांविन्नला ॥ कुमुद हांक देऊनि पुढें जाहला ॥ लोहपट्टिश घेऊनियां ॥३॥
सौमित्रें चाप ओढून ॥ टाकिले तेव्हां तीन बाण ॥ शत शत दारुण ॥ रघुत्तमें टाकिले ॥४॥
इतुकी शस्त्रवृष्टि होत ॥ परी ते न गणीच इंद्रजित ॥ शस्त्रें तोडून समस्त ॥ बाण बहुत सोडिले ॥५॥
अष्टादश पद्में वानर ॥ निजबाणीं केले जर्जर ॥ लक्षोनियां रामसौमित्र ॥ दारुण शर सोडिले ॥६॥
रामलक्ष्मणांसहित सकळ ॥ कपिदळ इंद्रजितें केले विकळ ॥ पुरुषार्थ करून तत्काळ ॥ इंद्रजित परतला ॥७॥
जयवाद्यें वाजवित ॥ लंकेत प्रवेशे शक्रजित ॥ पितयास करूनी प्रणिपात ॥ वार्ता समूळ सांगितली ॥८॥
रावण म्हणे शक्रजितासी ॥ तूं क्षणक्षणां शत्रु मारिसी ॥ दिनांती नक्षत्रें आकाशीं ॥ मागुती तैसे ऊठती ॥९॥
वरि वरि जळे तृण ॥ परि अंकुर फुटती भूमीतून ॥ त्यावरी शक्रजित प्रतिवचन ॥ काय बोलता जाहला ॥२१०॥
म्हणे आतां रामलक्ष्मण ॥ सेनेसहित येतों वधून ॥ तरीच तुम्हां दावीन वदन ॥ प्रतिज्ञा पूर्ण माझी हे ॥११॥
हे न घडे जरी गोष्टी ॥ तरी तुमची आमची हेचि भेटी ॥ मम पितयासी नमून उठाउठीं ॥ इंद्रजित चालिला ॥१२॥
सिद्ध करूनि चतुरंग दळ ॥ युद्धासी चालिला उतावीळ ॥ जैसा सरितापूर ॥ तुंबळ ॥ वर्षाकाळीं धांवतसे ॥१३॥
तीन वेळ संग्राम करूनि ॥ इंद्रजित गेला जय घेऊनि ॥ मागुती आला चौथेनि ॥ रणमेदिनी माजवावया ॥१४॥
युद्धकांड परम सुरस ॥ जेथें थोर माजे वीररस ॥ तें चतुर श्रोते सावकाश ॥ अत्यादरें परिसोत ॥१५॥
रणरंगधीरा रामचंद्रा ॥ सुवेळाचळवासी प्रतापरुद्रा ॥ श्रीधरवरदा आनंदसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा जगद्रुरो ॥१६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टविंषतितमाध्याय गोड हा ॥२१७॥
॥अध्याय २८॥ ॥ओंव्या २१७॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥