1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २३ वा

अध्याय तेवीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जय जय सुभद्रकारक भवानी ॥ मूळपीठ अयोध्यावासिनी ॥ आदिमायेची कुळस्वामिनी ॥ प्रणवरूपिणी रघुनाथे ॥१॥
नारद व्यास वाल्मीक ॥ विरिंची अमरेंद्र सनकादिक ॥ वेदशास्त्रें सुहस्रमुख ॥ कीर्ति गाती अंबे तुझी ॥२॥
सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ बिभीषण अंगद हनुमंत ॥ तेही दिवटे नाचती समस्त ॥ प्रतापदीपिका घेऊनियां ॥३॥
अठरा पद्में वानरगण ॥ त्या भूतावळिया संगे घेऊन ॥ सुवेळाचळीं येऊन ॥ गोंधळ मांडिला स्वानंदें ॥४॥
रणमंडळ हें होमकुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वळतां प्रचंड ॥ राक्षस बस्त उदंड ॥ आहुतीमाजी पडताती ॥५॥
देवांतक नरांतक महोदर ॥ प्रहस्त अतिकाय घटश्रोत्र ॥ इंद्रजित आणि दशवक्र ॥ आहुति समग्र देती ह्या ॥६॥
निजदास दिवटा बिभीषण ॥ अक्षयी लंकेसी स्थापून ॥ निजभक्ति जानकी घेऊन ॥ मूळपीठ अयोध्येसी जासील ॥७॥
हनुमंता दिवटा तुझा बळी ॥ बळें पुच्छपोत पाजळी ॥ क्षणांत लंका जाळिली ॥ केली होळी बहुसाल ॥८॥
ऐसे तुझे दिवटे अपार ॥ त्यांमाजी दासानुदास श्रीधर ॥ तेणें राजविजयदीपिका परिकर ॥ पाजळिली यथामति ॥९॥
बाळ भोळे भक्त अज्ञान ॥ प्रपंचरजनींत पडिले जाण ॥ त्यांस हे ग्रंथदीपिका पाजळून ॥ मार्ग सुगम दाविला ॥१०॥
असो पूर्वाध्यायीं रामलक्ष्मण ॥ इंद्रजितें नागपाश घालून ॥ आकळिले मग वायुदेवें येऊन ॥ सावध केले सवेंच ॥११॥
यावरी तो रणरंगधीर ॥ प्रतापार्क श्रीरघुवीर ॥ धनुष्य सजोनि सत्वर ॥ वाट पाहे शत्रूची ॥१२॥
तों कोट्यनुकोटी वानरगण ॥ सिंहनादें गर्जती पूर्ण ॥ तेणें लंकेचे पिशिताशन ॥ गजबजिले भयेंचि ॥१३॥
निर्मळ देखोनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळला वानरसमुद्र ॥ भरतें लोटलें अपार ॥ लंकादुर्गपर्यंत पैं ॥१४॥
उचलोनि पाषाण पर्वत ॥ कपि भिरकाविती लंकेत ॥ राक्षसांची मंदिरें मोडित ॥ प्रळय बहुत वर्तला ॥१५॥
रावणासी सांगती समाचार ॥ दुर्गासी झगटले वानर ॥ रणीं उभे रामसौमित्र ॥ शशिमित्र जयापरी ॥१६॥
प्रहस्तासी म्हणे लंकानाथ ॥ पुत्रें शत्रुवन जाळिलें समस्त ॥ पुनरपि अंकुर तेथ ॥ पूर्ववत फुटले पैं ॥१७॥
बीज भाजून दग्ध केले ॥ तें पुनरपि अंकुरलें ॥ मृत्यूनें गिळून उगळिलें ॥ अघटित घडलें प्रहस्ता ॥१८॥
मग तो प्रधान प्रहस्त ॥ तोचि सेनापति प्रतापवंत ॥ रावणासी आज्ञा मागत ॥ शत्रु समस्त आटीन वाणी ॥१९॥
कायसे ते नर वानर ॥ माझे केवीं साहाती शर ॥ ऐसें ऐकतां विंशतिनेत्र ॥ परम संतोष पावला ॥२०॥
उत्तम वस्त्रें भूषणें ॥ प्रहस्तासीं दिधली रावणें ॥ तयासी गौरवून म्हणे ॥ विजयी होईं रणांगणीं ॥२१॥
स्वामी गौरवी स्वमुखेंकरून ॥ धन्य धन्य तोचि दिन ॥ असो वीस अक्षौहिणी दळ घेऊन ॥ प्रहस्त प्रधान निघाला ॥२२॥
चतुरंग सेनासमुद्र ॥ उत्तर द्वारें लोटला समग्र ॥ तंव अद्भुत सुटला समीर ॥ धुळीनें नेत्र दाटले ॥२३॥
प्रहस्तरथींचा ध्वज उन्मळला ॥ शोणितचर्चित भुज खंडला ॥ प्रहस्तापुढें आणूनि टाकिला ॥ निराळपंथे पक्ष्यांनीं ॥२४॥
मनांत दचकला प्रहस्त ॥ परी वीरश्रीनें वेष्टीत ॥ अपशकुनांची खंत ॥ टाकूनियां चालिला ॥२५॥
दृष्टीं देखोनि राक्षसभार ॥ सिंहनादें गर्जती वानर ॥ तेणें स्वर्गींचे हुडे समग्र ॥ येऊं पाहती धरणीये ॥२६॥
दोनी दळें एकवटलीं ॥ संग्रामाची झड लागली ॥ शस्त्रास्त्रें तये काळीं ॥ यामिनीचर वर्षती ॥२७॥
क्षणप्रभा नाभोमंडळीं ॥ तेवीं असिलता झळकती ते काळीं ॥ गदापाशशक्तिशूळीं ॥ खोंचती बळें कपीतें ॥२८॥
साहून वानरांचा मार ॥ कपिसेनेवरी अपार ॥ पिशिताशन अनिवार येऊनियां कोसळती ॥२९॥
तंव ते प्रतापमित्र हरिगण ॥ पर्वत आणि वृक्ष पाषाण ॥ बळें देती भिरकावून ॥ होती चूर्ण रजनीचर ॥३०॥
जैसा अग्नि लागे पर्वतीं ॥ त्यावरी पतंग असंख्य झेंपावती ॥ तैसें राक्षस मिसळती वानरचमूंत येउनी ॥३१॥
वानर चतुर रणपंडित ॥ निशाचर आटिले बहुत ॥ मग तो सेनापति प्रहस्त ॥ रथ लोटी वायुवेगें ॥३२॥
जैसी पर्वतीं वीज पडत ॥ तैसा कपींत आला अकस्मात ॥ बाण सोडिले अद्भुत ॥ नाहीं गणित तयांसी ॥३३॥
तंव तो बिभीषण लंकापती ॥ बोलता झाला रामाप्रति ॥ म्हणें प्रहस्त सेनापती ॥ मुख्य पट्टप्रधान रावणाचा ॥३४॥
तरी यासी सेनापति नीळ ॥ प्रतियोद्धा धाडावा सबळ ॥ तों इकडे प्रहस्तें वानरदळ ॥ बहुत आटिले ते काळीं ॥३५॥
अनिवार प्रहस्ताचा मार ॥ साहों न शकती वानर ॥ महायोद्धे समरधीर ॥ माघारले ते काळीं ॥३६॥
दृष्टीं देखोनि रघुनाथ ॥ प्रहस्तें बळें लोटिला रथ ॥ ऐसें देखोनि जनकजामात ॥ घालीत हस्त चापासी ॥३७॥
क्षण न लागतां चढविला गुण ॥ तों रामापुढें नीळ येऊन ॥ विनवीतसे कर जोडून ॥ वानरगण ऐकती ॥३८॥
म्हणे जगद्वंद्या जगदुःखहरणा ॥ जनकजापते जगन्मोहना ॥ मायाचक्रचाळका निरंजना ॥ मज आज्ञा दईंजे ॥३९॥
न लागतां एक क्षण ॥ प्रहस्ताचा घेईन प्राण ॥ अवश्य म्हणे सीतारमण ॥ विजयी होऊन येईं पां ॥४०॥
घेऊनियां महापर्वत ॥ नीळ धांवे अकस्मात ॥ जैसा पाखंडियासी पंडित ॥ सरसावला बोलावया ॥४१॥
प्रहस्तासी म्हणे नीळवीर ॥ तुम्ही म्हणवितां झुंझार ॥ शस्त्रें जवळी रक्षितां अपार ॥ मिथ्यावेष कासया ॥४२॥
बाह्यवृत्ति व्याघ्राची असे ॥ अंतरीं जंबुका भीतसे ॥ जेवी नट विरक्ताचें सोंग घेतसे ॥ परी अंतरीं त्याग नोहे ॥४३॥
वरी वैराग्य मिथ्या दावित ॥ परी मनीं तृष्णा वाढवित ॥ जैसें वृंदावन भासत ॥ रेखांकित उत्तम वरी ॥४४॥
तैसा तूं सेनापति प्रहस्त ॥ मृत्युनें तुज आणिलें येथ ॥ तुझे पितृगण समस्त ॥ काय करिती यमपुरीं ॥४५॥ 
त्यांचा समाचार घ्यावयासी ॥ तुज पाठवितों यमपुरीसी ॥ आतां परतोन लंकेसी ॥ कैसा जासील पाहें पां ॥४६॥
शतमूर्ख दशमुख तत्वतां ॥ पद्मजातजनकाची कांता ॥ ती आणूनियां वृथा ॥ कुलक्षय केला रे ॥४७॥
प्रहस्त म्हणे मर्कटा नीळा ॥ तुज मुत्युकाळीं फांटा फुटला ॥ ऐसे बोलून लाविला ॥ बाण चापासी प्रहस्तें ॥४८॥
नीळें हस्तींचा पर्वत ॥ प्रहस्तावरी टाकिला अकस्मात ॥ तेणें बाण सोडिले अद्भुत ॥ अचळ फोडिला क्षणार्धें ॥४९॥
सवेंच दुसरा शैल सबळ ॥ प्रहस्तावरी टाकी नीळ ॥ तेणें फोडूनि तत्काळ ॥ पिष्टवत् पै केला ॥५०॥

अध्याय तेवीसावा - श्लोक ५१ ते १००
दुर्धर अहंकार दशानन ॥ अहंदेहबुद्धि लंका गहन ॥ तेथे वास्तव्य अनुदिन ॥ क्रोध कुंभकर्ण बंधु सखा ॥१॥
अनर्थकारक काम इंद्रजित ॥ मद हा मुख्य प्रधान प्रहस्त ॥ मत्सर दंभ ते निश्र्चित ॥ देवांतक नरांतक पैं ॥२॥
शोक मोह आणि अनर्थ ॥ भेदवादी असुर बहुत ॥ खळ कुटिल कुतर्क समस्त ॥ देह लंकेत दुमदुमती ॥३॥
यांचे बळे माजोनि रावण ॥ बंदी घातले सुरगण ॥ आदिदैवत अध्यात्म होऊन ॥ देहलंकेत बंदी पडिले ॥४॥
रमेश तो अंतःकरण ॥ रमाबंधु तोचि मन ॥ बुद्धि विरिंची चित्त नारायण ॥ रावणें बंदी घातली ॥५॥
चक्षुंच्या ठायीं सूर्यनारायण ॥ रसना ते रसनायक वरुण ॥ अश्र्विनौदेव दोघे घ्राण ॥ रावणें बंदी घातले ॥६॥
वाचा केवळ वैश्र्वानर ॥ पाणी ते जाण पुरंदर ॥ असो देव आकळोनि समग्र ॥ सेवक करूनि रक्षिले ॥७॥
मायामृग छेदावया लागून ॥ निरंजनी प्रवेशे रघुनंदन ॥ कापट्यशब्द उठवून ॥ विवेक लक्ष्मण दवडिला ॥८॥
सद्बुद्धि जानकीचे हरण ॥ अहंकारें केले न लागतां क्षण ॥ अहंदेह लंकेत आणून ॥ दुराचारें कोंडिलें ॥९॥
मग धांविन्नला वैराग्य हनुमंत ॥ तेणें देहलंका जाळूनि समस्त कामक्रोधादि राक्षसांसहित ॥ अहं लंकानाथ गांजिला ॥१०॥
सद्बुद्धीचे करूनि समाधान ॥ घेऊन आला रघुनंदन ॥ तो केवळ सद्भाव बिभीषण ॥ रावणें त्रासिला सभास्थानी ॥११॥
आत्माराम सद्रुरु पूर्ण ॥ त्यास शरण चालिला बिभीषण ॥ बाविसावे अध्यायीं जाण ॥ हेंचि कथन सांगितलें ॥१२॥
देखोनि वायसांचा मेळ ॥ त्रासोनि निघे मराळ ॥ कीं देखानि दुष्ट निंदक खळ ॥ साधु उठे तेथोनियां ॥१३॥
तैसा प्रधानांसह बिभीषण ॥ ऊर्ध्वपंथे क्रमीत गगन ॥ भवसिंधु उल्लंघोनि चरण ॥ गुणसिंधूचे पाहूं इच्छी ॥१४॥
हिरण्यकशिपें गांजिला प्रल्हाद ॥ तेणें हृदयी धरिला मुकुंद ॥ तैसाचि जानकीहृदयमिलिंद ॥ बिभीषणें जवळी केला पै ॥१५॥
वानर अंतरिक्ष विलोकिती ॥ तों पाचही असुर उतरले क्षितीं ॥ सेनाप्रदेशीं उभे राहती ॥ हस्त जोडूनि तेधवां ॥१६॥
कित्येक धांवले वानरगण ॥ घेऊनियां वृक्षपाषाण ॥ तो बिभीषण म्हणे मी तुम्हांसी शरण ॥ दावा चरण रघुपतीचे ॥१७॥
रावणबंधू मी बिभीषण ॥ तेणें अपमानिले मजलागून ॥ आलो सीतावल्लभासी शरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥१८॥
जे सेनादिकांची ध्येय मूर्ति ॥ नारदादि गाती ज्याची कीर्ति ॥ तो ब्रह्मानंद अयोध्यापती ॥ त्याचे चरण मज दावा ॥१९॥
जें निगमवल्लीचे पक्व फळ पूर्ण ॥ जो विषकंठमनमांदुसरत्न ॥ जे पद्मोद्भवाचें देवतार्चन ॥ त्याचे चरण दावा मज ॥२०॥
प्रतापमित्र रघुनंदन ॥ जो अरिचक्रवारणपंचानन ॥ जो खरदूषणप्राणहरण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२१॥
वेदांती म्हणती परब्रह्म ॥ अजअजित पूर्णकाम ॥ तोचि हा दशरथात्मज श्रीराम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२२॥
व्याकरणकार शब्द साधिती ॥ त्याचे नामाचे अनेकार्थ्ज्ञ करिती ॥ तोचि हा मंगळभगिनीचा पति ॥ त्याचे चरण दावा मज ॥२३॥
पातंजली योग साधून ॥ योग पावती निरंजन ॥ तोचि हा चंडकिरणकुळभूषण ॥ त्याचे चरण दावा मज ॥२४॥
प्रकृति पुरुष सांगत ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तोचि हा जानकीनाथ ॥ त्याचे चरण दावा मज ॥२५॥
प्रकृति पुरुष सांगत ॥ सांख्यशास्त्र असे गर्जत ॥ तोचि हा जानकीनाथ ॥ त्याचे चरण दावा मज ॥२६॥
नैयायिक म्हणती कर्ता ईश्र्वर ॥ जीवासी न कळे त्याचा पार ॥ तोचि हा अजराजपुत्रकुमर ॥ त्याचे चरण दावा मज मीमांसक स्थापिती कर्म ॥
कर्माचरणें पाविजे परब्रह्म ॥ तो परात्पर विश्रांतिधाम ॥ त्याचे चरण दावा मज ॥२७॥
ऐशीं बिभीषणाचीं शब्दरत्नें ॥ की ती भक्तिनभींचीं उडुगणें ॥ की तीं वैराग्यवल्लीची सुमने ॥ प्रेमसुवासें विकासती ॥२८॥
श्रीरामसुग्रीवांसी जाऊन ॥ कित्येक सांगती वर्तमान ॥ चौघे प्रधानांसह शरण ॥ राक्षस एक आलासे ॥२९॥
आपला ज्येष्ठ बंधु रावण ॥ आपुलें नाम सांगे बिभीषण ॥ ऐसें ऐकतां जानकीजीवन ॥ सुग्रीवाकडे पाहत ॥३०॥
तो अर्कज बोले उत्तर ॥ वरी भाविक दिसतो निशाचर ॥ परी नोळखतां तयाचे अंतर ॥ जवळी सहसा ठेवूं नये ॥३१॥
दिवाभीताची सेवा करून ॥ कागे लाविला जैसा अग्न ॥ तैसा जरी गेला करून ॥ तरी मग काय विचार ॥३२॥
जांबुवंत म्हणे मारूनि वाळी ॥ किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिधली ॥ हे कीर्ति ऐकोनि तात्काळीं ॥ शरण आला तुम्हांतें ॥३३॥
मारूनियां रावणा ॥ लंकाराज्य द्यावे आपणा ॥ हेचि मनी धरूनि वासना ॥ शरण आला तुम्हांते ॥३४॥
सुषेण म्हणे समयी कठीण ॥ देखोन साह्य करिती बंधुजन ॥ हा रावणासी सोडून आला शरण ॥ हेंचि नवल वाटतें ॥३५॥
तर्क वितर्क बहु विचार ॥ करिते झाले तेव्हां वानर ॥ मग तो शेवटी रुद्रावतार ॥ निश्र्चयवचन बोलिला ॥३६॥
लंकेत शोधितां जनककुमारी ॥ मी प्रवेशलों याचे मंदिरीं ॥ महासाधु निष्कपट अंतरीं ॥ तेच समयी ओळखिला ॥३७॥
वरी तुम्हांस दिसतो राक्षस ॥ परी अंतरीं प्रेमळ निर्दोष ॥ कंटकमय दिसतो फणस ॥ परी अंतरीं सुरस जैसा ॥३८॥
शरणागतांसी वज्रपंजर ॥ रामा तुझें ब्रीद साचार ॥ जवळी बोलावून असुर ॥ अभय तयातें देइंजे ॥३९॥
इतर शास्त्रीचें बोल बहुत ॥ एक वचनें दावी वेदांत ॥ तैसें बोलिला हनुमंत ॥ तेंच समस्तां मानलें ॥४०॥
अंगदासी भ्रूसंकेत ॥ दावीत तेव्हां ताराकांत ॥ बिभीषणास आणावया त्वरित ॥ येरू निघाला वायुवेगें ॥४१॥
बिभीषणास म्हणे वाळीपुत्र ॥ उदेला तुझा भाग्यमित्र ॥ तुज पाचारितो स्मरारिमित्र ॥ राजीवनेत्र अजित जो ॥४२॥
बिभीषणाचा धरूनि हस्त ॥ रामाजवळी आला तारासुत ॥ जेंवि साधकासी सद्विवेक दावित ॥ स्वरूपनिर्धार निश्र्चयें ॥४३॥
असो बिभीषणं पाहिला श्रीराम ॥ जो चरचरफलांकित द्रुम ॥ जयजयकार करून परम लोटांगण घातलें ॥४४॥
दृष्टीं पाहूनि श्रीरामचंद्र ॥ उचंबळे बिभीषणभाव समुद्र ॥ प्रेमाचें भरते अपार ॥ दाटतें झालें तेधवां ॥४५॥
श्रीरामचरणारविंदसुगंध ॥ तेथें बिभीषण जाहला मिलिंद ॥ अष्टभावें होऊन सद्रद ॥ आनंदमय जाहला ॥४६॥
रामचरणीं ठेवितां मस्तक ॥ संतोषोनि ब्रह्मांडनायक ॥ शिरी ठेविला वरद हस्त ॥ अक्षय कल्याणदायक जो ॥४७॥
म्हणे जोंवरी शशी आणि तरणी ॥ जोंवरी रामकथा आणि धरणी ॥ तोंवरी राज्य करी लंकाभुवनीं ॥ बळीध्रुवांसारिखें ॥४८॥
जेंवी चिरंजीव वायुनंदन ॥ त्याचपरी राहें तूं बिभीषण ॥ काळीकाळ तोडरीं बांधोन ॥ लंकेत सुखें नांदे कां ॥४९॥
ऐसा आशीर्वाद देऊन ॥ रामें उठविलां बिभीषण ॥ सप्रेमें दिधलें आलिंगन ॥ वानरगण आनंदले ॥५०॥

मग सौमित्र आणि अष्ट दिक्पती ॥ तेही बिभीषणासी भेटती ॥ पुष्पवर्षाव करिती ॥ वृंदारक तेधवां ॥५१॥
मग बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहिला श्रीरामासमोर ॥ म्हणे जयजय राम करुणासमुद्र ॥ जगदोद्धारा दीनबंधो ॥५२॥
जयजय रामकमळपत्राक्षा ॥ हे ताटिकांतका सर्वसाक्षा ॥ मखपाळका निर्विकल्पवृक्षा ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥५३॥
जय राम चंडीशकोदंडभंजना ॥ हे राम दशकंठदर्पहरणा ॥ हे राम विषकंठदाहशमना ॥ भक्तरंजना जगवंद्या ॥५४॥
हे राम पद्मजातजनका ॥ हे राम विबुधबंधच्छेदका ॥ हे राम दुष्टअसुरांतका ॥ सहस्रमुखा न वर्णवेचि ॥५५॥
ऐसी बिभीषणें करितां स्तुति ॥ मग तयासी हाती धरूनि सीतापति ॥ आपणजवळी बैसवी प्रीतीं ॥ बहुत मान देऊनियां ॥५६॥
संतोषोनि बोले रघुनंदन ॥ आमचा पांचवा बंधु बिभीषण ॥ वानर म्हणती धन्य धन्य ॥ भाग्यरावणानुजाचें ॥५७॥
मग चतुःसमुद्रींचीं उदकें आणुनी ॥ बिभीषणासी रामें बैसवूनी ॥ लंकापति हा म्हणूनि ॥ अभिषेक केला यथाविधी ॥५८॥
लंकानगरींचा नृप पूर्ण ॥ येथून अक्षयी बिभीषण ॥ यावरी लोकप्राणेशनंदन ॥ काय करिता जाहला ॥५९॥
वाळूची लंका विशाळ केली ॥ कपींचीं किराणें बाहेर पडली ॥ ते बिभीषणाजवळी गहाण ठेविली ॥ राघवेंद्र तेधवां ॥६०॥
माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ॥ ते लंका सांडीन ओंवाळून ॥ परम प्रीतीं सीताजीवन ॥ लंका विलोकी मारुतीची ॥६१॥
असो यावरी बिभिषणाप्रति ॥ विचारीत जनकजापती ॥ म्हणे सागर तरावया निश्र्चितीं ॥ काय उपाय करावा ॥६२॥
यावरी बोले बिभीषण ॥ सागराची पूजा करून ॥ मागावा मार्ग प्रार्थून ॥ वानरदळ उतरावया ॥६३॥
मग समुद्रतीरीं रघुनंदन ॥ बैसला दर्भासन घालून ॥ पूजा सागरी समर्पून ॥ मित्रकुळभूषण मार्ग मागे ॥६४॥
फळ तोय वर्जून समस्त ॥ निराहार बैसला सीताकांत ॥ हिमाचळीं हिमनगजामात ॥ तप करी जयापरी ॥६५॥
तो तेथे रावणाचा हेर ॥ शार्दूळनामा होता असुर ॥ लंकापतीपुढें जाऊन सत्वर ॥ वार्ता सांगे ते काळीं ॥६६॥
म्हणे कमळिणीप्रियभूषण ॥ अगाध वानरसमुदाय घेऊन ॥ प्रतापसिंधु रघुनंदन ॥ जळसिंधुतीरीं राहिला ॥६७॥
ऐसा समाचार ऐकतां साचार ॥ चिंतेनें व्यापिला दशकंधर ॥ मग शुकनामें असुर ॥ दशकंधर त्यासी सांगे ॥६८॥
तूं आमचा बंधु होसी ॥ जाऊन सांग सुग्रीवासी ॥ तुज काय कारण सीतेसी ॥ परतोन जाईं माघारा ॥६९॥
मग तो शुक रूप जाहला ॥ क्षणें सिंधू उल्लंघूनि आला ॥ अंतरिक्षीं उभा राहिला ॥ बोलों लागला धीटपणें ॥७०॥
म्हणे मज पाठविलें रावणें ॥ वानरेश्र्वरा तूं एक वचनें ॥ तुवां शीघ्र परतोनी जाणें ॥ मर्कटसेना घेऊनियां ॥७१॥
आम्ही जानकी आणिली हिरून ॥ तरी तुम्हांसी यावया काय कारण ॥ व्यर्थ वेंचू नका प्राण ॥ जावें परतोन किष्किंधे ॥७२॥
जरी तुम्ही न जाल परतोन ॥ तरी मी शुक स्वकरेंकरून ॥ तुमची शिरकमळें छेदून ॥ नेईन आतां लंकेसी ॥७३॥
ऐसें बोलतां शुक निशाचर ॥ परम क्रोधावले वानर ॥ बहुत धांविन्नले वीर ॥ आसडून खालीं पाडिला ॥७४॥
बहुत मिळोनी कुंजर ॥ ताडिती जैसें एक मार्जार ॥ पाणिप्रहारें तैसा असुर ॥ वानरवीरीं ताडिला ॥७५
परम कासावीस होऊन म्हणे मज राघवा सोडवीं येथून ॥ कृपासागर रघुनंदन ॥ पाहे विलोकून त्याकडे ॥७६॥
सुमित्रासुत म्हणे सोडा सत्वर ॥ तात्काळ मुक्त करिती वानर ॥ सवेंचि गगनीं उडोनि असुर ॥ मागुतीं बोले निंद्योत्तरें ॥७७॥
म्हणे एथून जाय तूं किष्किंधापति ॥ न धीर रामाची संगती ॥ जैसें देवांचे बुद्धी छळितां उमापती ॥ पुष्पचाप भस्म झाला ॥७८॥
तुम्हांसी मारावया देख ॥ घेऊन आला रघुनायक ॥ तुम्ही वानर शतमूर्ख ॥ नेणा हित आपुलें ॥७९॥
ऋषभ म्हणे रे शुका ॥ दुर्बुद्धि मलिना मशका ॥ जाऊनि सांगे दशमुखा जनकात्मजा सोडी वेगीं ॥८०॥
तूं आमुचा शत्रु साचार ॥ तुज वधावया आला रघुवीर ॥ तुझीं दाही शिरें छेदून सत्वर ॥ बळी देईल दशदिशां ॥८१॥
शुक म्हणे सीता गोरटी ॥ पुन्हां न पडे तुमचे दृष्टीं ॥ मर्कटहो व्यर्थ कष्टी ॥ कासया होतां उगेची ॥८२॥
ऐसें ऐकतां वाळिनंदन ॥ म्हणे धरा धरा मागुतेन ॥ तो तात्काळ वानरीं आसुडोन ॥ केले ताडण ते वेळां ॥८३॥
मग करचरण बांधोन ॥ शुक ठेविला रक्षून ॥ असो इकडे रघुनंदन ॥ समुद्रासी मार्ग मागे ॥८४॥
तीन दिवसपर्यंत ॥ गुणसमुद्र रघुनाथ ॥ समुद्राची वाट पहात ॥ परी तो उन्मत्त सर्वदा ॥८५॥
परम क्षोभला रघुनाथ ॥ म्हणे हा समय नोळखे यथार्थ ॥ यास मी मान दिधला बहुत ॥ सागरनिर्मित म्हणोनिया ॥८६॥
लवणजळविषेंकरून ॥ सर्प हा पसरला लंबायमान ॥ आतां यावरी बाण सुपर्ण ॥ सोडितां भक्षील क्षणार्धे ॥८७॥
माझा बाण वडवानळ ॥ क्षणें शोषील समुद्रजळ ॥ जैसें ज्ञान प्रवेशतां सकळ ॥ अज्ञान जाय निरसोनी ॥८८॥
की माझा बाण कलशोद्भव ॥ क्षणें शोषील जळार्णव । सूर्य उगवतां तम सर्व ॥ जाय जैसें निरसोनी ॥८९॥
मागुती क्षण एक वाट पाहून ॥ उभा ठाकला रघुनंदन ॥ धनुष्यावरी योजिला बाण ॥ अर्ध क्षण न लागतां ॥९०॥
बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र ॥ स्थापिता जाहला राजीवनेत्र ॥ की क्षोभला प्रळयरुद्र ॥ अक्षय सागर देखतां ॥९१॥
आकर्ण चाप ओढितां प्रचंड ॥ भयें तडाडी विरिंचिअंड ॥ जळचर खेचरें उदंड ॥ मूर्च्छना येऊन पडियेलीं ॥९२॥
निशा संपतां समग्र ॥ उदयाद्रीवरी ये मित्रचक्र ॥ तैसा दिव्यरूप समुद्र ॥ सरितांसहित प्रगटला ॥९३॥
यागीं होतां पूर्णाहुती ॥ तात्काळ प्रगटे आराध्यमूर्ति ॥ तैसा प्रगटला सरितापति ॥ परिवारेंसी तेधवां ॥९४॥
वंदूनियां रघुवीरचरणां ॥ म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ स्मरारिमित्रा आनंदसदना ॥ जानकीजीवना रघुपति ॥९५॥
तूं कृपासमुद्र रघुवीर ॥ कां हे लहरी आली क्रूर ॥ माझा अन्याय नसतां शर ॥ धनुष्यावरी घातला ॥९६॥
माझा स्वभाव रघुनंदना ॥ सर्वदाही करावी गर्जना ॥ तुजसीं गर्व गर्वहरणा ॥ सर्वथाही केला नाही ॥९७॥
मग म्हणे रघुनंदन ॥ म्यां शरासनी योजिला बाण ॥ पुन्हा काढितां नये पूर्ण ॥ यासी कारण सांग कांहीं ॥९८॥
यावरी बोले सरितानाथ ॥ पश्र्चिमेस असे मरु दैत्य ॥ तो माझी जळचरें भक्षित ॥ सदा पीडितो गोब्राह्मणां ॥९९॥
त्यावरी टाकूनियां बाण ॥ मरूचा तात्काळ घ्यावा जी प्राण ॥ तों शर गेला न लागतां क्षण ॥ कल्पांतचरपळेसारिखा ॥१००॥

अध्याय तेवीसावा - श्लोक १५१ ते २००
मग नळासी म्हणे हनुमंत ॥ सखया गर्व न धरी किंचित ॥ अवघाकर्ता रघुनाथ ॥ अभिमान तेथें कासया ॥५१॥
स्तंभावीण आकाश धरी ॥ उदकावरी तारी धरित्री ॥ मित्र शशी उडुगणें निर्धारीं ॥ वायुचक्री चालवी जो ॥५२॥
अनंत ब्रह्मांड मोडून ॥ सवेंचि निर्मी न लागतां क्षण ॥ त्या रामापुढें अभिमान ॥ कोठें चालेल जीवांचा ॥५३॥
जैसा उगवतां वासरमणी ॥ मृगांकतेज लोपे ते क्षणीं ॥ तेथें खद्योत स्वेतेजेंकरूनी ॥ उजळील काय नभातें ॥५४॥
यालागीं गर्व सांडोनी ॥ सांगतों ते वर्म धरी मनीं ॥ रकारें एक शिला रेखुनी ॥ काना देऊनि करी गुरु ॥५५॥
दुजे शिळेवरी रेखीं मकार ॥ दोहींस करी एकंकार ॥ तूं म्हणसी रामनाम पवित्र ॥ सेतूवरी केवीं लिहूं ॥५६॥
कपी देतील वर चरण ॥ हा संशय धरी तुझंं मन ॥ बरे मुख्य भेदासी कारण ॥ तो अभिमान सोडी कां ॥५७॥
मुख्य रामनाम पाहीं ॥ हृदयीं अभेद रुळे सदाही ॥ मग ते पाषाण सहसाही ॥ भेदभाव न धरिती ॥५८॥
हनुमंतवचन तीक्ष्ण कुठार ॥ समूळ छेदिला अभिमानतरुवर ॥ मग निरभिमानें नळवीर ॥ तैसेंचि करिता जाहला ॥५९॥
करितांच श्रीरामस्मरण ॥ नळ कपी जोडी पाषाण ॥ तो तेथें सम विषम थोर लहान ॥ भेदाभेद न दिसेचि ॥१६०॥
हनुमंत काव्यांतील हृद्रत ॥ चतुरीं जाणिजे हा भावार्थ सेतुपंथें नाम यथार्थ ॥ नळें नाही रेखिलें तें ॥६१॥
दुजयासी पाषाण जे बुडवित ॥ ते सागरीं तरती तारुवेत ॥ हा नळाचा गुण नव्हे निश्र्चित ॥ अदभुत महिमा रामाचा ॥६२॥
सेतू बांधावया कारण ॥ नळ रामेंचि केला निर्माण ॥ भक्तवत्सल रघुनंदन ॥ महिमा वाढवी दासांचा ॥६३॥
असो बाणसंख्यादिवसांत ॥ सुवेळेपर्यंत बांधिला सेत ॥ शतयोजनें लांब गणित ॥ दशयोजनें रुंद पैं ॥६४॥
गगनीं पाहती सुरवर ॥ सेतू दिसे जैसा भोगेंद्र ॥ रघुपतीतें सांगती वानर ॥ सेतू संपूर्ण केला नळ ॥६५॥
नळास बोलावून रघुनंदनें ॥ हृदयी धरिला परम प्रीतीनें ॥ म्हणे धन्य धन्य तुझें जिणें ॥ भरिलें त्रिभुवन कीर्तीनें ॥६६॥
सखया त्वां अदभुत कार्य केले ॥ अघटित तेंचि घडविलें ॥ असो रघुवीर म्हणे ते वेळे ॥ चल सुवेळे जाऊं आतां ॥६७॥
कुंचा फिरविला वीरें नळे ॥ तत्काळ उठलीं कपिदळें ॥ भुभुःकारनादें ते वेळे ॥ डळमळिला भूगोळ ॥६८॥
सुमुहूर्त वेळा पाहून ॥ उठोनि चालिले रामलक्ष्मण ॥ दशयोजनें रुंद प्रमाण ॥ सेना दाटली चालता ॥६९॥
कडेचे कोसळती वानर ॥ सवेंच उडी घेती चक्राकार ॥ वरी येऊन सत्वर ॥ सेतुपंथें चालती ॥१७०॥
रघुवीर चरणचालीं जात ॥ धांवती सुग्रीव हनुमंत ॥ म्हणती रघूत्तमा विपरीत ॥ होईल ऐसें वाटतें ॥७१॥
तुमचे पद लागतां ये वेळा ॥ उद्धरतील सेतूच्या शिळा ॥ होतील अहल्येऐशा अबळा ॥ पडतील गळां कपींच्या ॥७२॥
कुटिल भाव सोडून ॥ विनोदें हांसे सूर्यनंदन ॥ मग हनुमंतस्कंधी रघुनंदन ॥ आरूढला ते वेळां ॥७३॥
अंगदाच्या स्कंधावरी ॥ सौमित्र बसे ते अवसरीं ॥ बाळसूर्य उदयाद्रीवरी ॥ त्याचपरी शोभतसे ॥७४॥
न भरतां अर्धप्रहर ॥ सूवेळेसी आला रघुवीर ॥ सेना उतरली अपार ॥ लंकानगर गजबजिलें ॥७५॥
शुकास केले होते बंधन ॥ तो राघवें दिधला सोडून ॥ तेणें रघुपतीचे वंदोनि चरण ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥७६॥
मग रावणापुढें अदभुत ॥ राघवप्रताप शुक सांगत ॥ म्हणे जयासी समुद्र सरितांसहित ॥ मूर्तिमंत भेटला ॥७७॥
धन्य प्रतापी रघुनंदन ॥ जळी तारिलें पाषाण ॥ परमशक्तिवानरगण ॥ कळिकाळासी न गणिती ॥७८॥
तुम्ही निरोप जे सांगितले ॥ तितुके मित्रपुत्रासी कथिले ॥ तंव तिही धांवोनि मजला धरिलें ॥ बांधोनि पाडिलें आजिवरी ॥७९॥
करुणासागर रघुनंदन ॥ तेणें आज दिधलें सोडून ॥ आतां राजा जानकी नेऊन ॥ सत्वर रामासी समर्पावी ॥१८०॥
सखा करितां रघुनंदन ॥ तेणें चंद्रार्कवरी कल्याण ॥ ऐकतां क्षोभला रावण ॥ म्हणे केले ताडण तिहीं तुज ॥८१॥
भय घेतलें मानसीं ॥ म्हणोनि भलते वाचाळसी ॥ शत्रुप्रताप मजपुढें वानिसी ॥ तरी मृत्यु पावसी निर्धारें ॥८२॥
मग शुक आणि सारण ॥ दोघां सांगे दशवदन ॥ म्हणे सुवेळेसी जाऊन ॥ सैन्य गणोनि या वेगीं ॥८३॥
मुख्य मुख्य कोण वानर ॥ कोणासवें किती भार ॥ ऐसें पाहूनि सत्वर ॥ परता रक्षूनि आपणां ॥८४॥
आज्ञा वंदूनि दोघांजणीं ॥ कपिसेनेंत आले ते क्षणी ॥ वानरवेष धरूनि ॥ सैरावैरा हिंडती ॥८५॥
सेना धुंडोनि सकळ ॥ मग जेथें असे अयोध्यापाळ ॥ लक्षीत ते सभामंडळ ॥ उभे दूर राहूनियां ॥८६॥
तो बिभीषणाची दृष्टि ते काळी ॥ अकस्मात दोघांवरी पडली ॥ धांवोनि धरिले ते वेळीं ॥ राघवाजवळी आणिले ॥८७॥
म्हणे हे रावणाचे हेर ॥ इही सेना गणिली समग्र ॥ वेष पालटोनी वानर ॥ होऊन हिंडती स्वईच्छा ॥८८॥
चुना मोखानि वायस ॥ जाहले जैसे राजहंस ॥ कीं धरूनि ब्राह्मणांचा वेष ॥ मैंद जैसे हिंडती ॥८९॥
कीं खोटेंनाटे करून ॥ खऱ्यांत मेळविती कुजन ॥ मग परीक्षककाढिती निवडोन ॥ दोघेजण तैसे धरिले ॥१९०॥
मग राजाधिराज रघुनंदन ॥ सुहास्यवदन बोले वचन ॥ म्हणे या दोघांस करी धरून ॥ दाखवा सैन्य समस्तही ॥९१॥
सकळ वृत्तांत आणूनि मना ॥ जाऊनि श्रुत करा दशवदना ॥ तंव ते म्हणती रघुनंदना ॥ मखपाळका विश्र्वेशा ॥९२॥
आम्हीं महिमा एकिली कर्णीं ॥ तो राम आजि देखिला नयनीं ॥ असो श्रीरामाची आज्ञा घेउनी ॥ दोघे परतले लंकेसी ॥९३॥
आले देखोन दोघे हेर ॥ षोडश खणांचे गोपुर ॥ त्यावरी चढला दशकंधर ॥ सेवक अपार भोंवते ॥९४॥
हेरांप्रति पुसे रावण ॥ सांगा येथून कोणाचे कोण ॥ मग ते दाविती दोघेजण ॥ संकेतवर्ण लक्षूनियां ॥९५॥
वानरसेना दशयोजन ॥ सभोंवती उतरली वीस्तीर्ण ॥ एकएक वीर दैदीप्यमान ॥ बळवंत आणि प्रतापी ॥९६॥
वानरसिंधूचें मव्यमंडळ ॥ जुत्पत्ति उभे भोंवते सकळ ॥ त्या मध्यभागीं तमालनीळ ॥ वस्त्राभरणीं मंडित दिसे ॥९७॥
कनकहरिणचर्मी पूर्ण ॥ पहुडलासे रघुनंदन ॥ सुग्रीवाचे मांडीवरी शिर ठेवून ॥ गोष्टी सांगे कौतुकें ॥९८॥
जाळूनि गेला लंकानगर ॥ सवेंच घेऊन आला रघुवीर ॥ तो हनुमंत वायुकुमर ॥ चरण चुरी रामाचे ॥९९॥
तुमचा बंधु बिभीषण ॥ रघुनाथनिकट बैसोन ॥ जे जे झाले वर्तमान ॥ गोष्टी सांगे रामकर्णीं ॥२००॥

अध्याय तेवीसावा - श्लोक २०१ ते २२४
दैदीप्यमान दिनकर ॥ तैसा रामाचे पाठीसी सौमित्र ॥ पैल अंगद महावीर ॥ क्रोधे पाहे आम्हांकडे ॥१॥
पैल सुषेण वैद्य महावीर ॥ हा सूर्यसुतासी होय श्र्वगुर ॥ वीसकोटी वानरभार ॥ त्यासांगातें पुरुषार्थी ॥२॥
पैल जांबुवंत ऋक्षवीर ॥ तयाचा बहात्तरकोटी दळभार ॥ पैल सेनाधिपती नीळ वीर सामर्थ्य अपार पैं त्याचें ॥३॥
जेणें शिळीं बांधिला सागर ॥नळ नाम बळसमुद्र ॥ शरभ ऋृषभ पर्वतकार ॥ युद्धसमय वांछिती ॥४॥
असो आतां वानरगण ॥ त्यांचीं नामें सांगतां पूर्ण ॥ उर्वी न पुरे करितां लेखन ॥ बळार्णव सर्वही ॥५॥
यालागीं दशकंधरा अवधारीं ॥ त्यांसी युद्ध करितां समरीं ॥ काळाचीही न उरे उरी ॥ मग इतर तेथें कायसे ॥६॥
ऐसें बोलतां शुक सारण ॥अत्यंत क्रोधावला रावण ॥ म्हणे तुमचा शिरच्छेद करून ॥ टाकावा ऐसें वाटतसे ॥७॥
येरू म्हणती आम्ही तुमचे हेर ॥ सत्य सांगावा समाचार ॥ असत्य बोलूं तरी साचार ॥ दंड करावा आम्हांतें ॥८॥
असो इकडे बिभीषण ॥ समस्तांसी दावी तर्जनी उचलून ॥ म्हणे पैल पहा रावण ॥ गोपुरावरी चढलासे ॥९॥
दहा शिरांवरी दाहा छत्रें ॥ दाहा विलसती मित्रपत्रें ॥ सेवक करी ढाळिती चामरें ॥ एकीं पिकमात्रें धरियेली ॥२१०॥
जैसा मघे उतरे पर्वतशिखरीं ॥ तैसा रावण भासे गोपुरीं ॥ अलंकारदीप्ति महीवरी ॥ विद्युत्प्राय झळकतसे ॥११॥
ऐसी आपुली संपदा पूर्ण ॥ शत्रूलागीं दाखवी रावण ॥ छत्रछायेविद्युत्प्राय झळकतसे ॥११॥
ऐसी आपुली संपदा पूर्ण ॥ शत्रूलागीं दाखवी रावण ॥ छत्रछायेखालीं रामसैन्य झांकून गेले ते समयीं ॥१२॥
जैसें उठतां मेघडंबर ॥ खालीं आच्छादे जग समग्र ॥ सेनेसहित रामचंद्र ॥ छत्रछायेतळीं तैसा ॥१३॥
ऐसा देखानि लंकापती ॥ कपिवीर क्षोभले चित्तीं ॥ सौमित्रें चाप घेतलें हातीं ॥ निमिषार्ध न लागतां ॥१४॥
लाविला अर्धचंद्रबाण ॥ ओढी ओढिली आकर्ण ॥ कल्पांतचपळेसमान ॥ चापापासूनि सूटला ॥१५॥
मुकुट छत्रे ते अवसरीं ॥ तोडून पाडिली धरणीवरी ॥ रावण घाबरला अंतरीं ॥ खालीं झडकरी उतरला ॥१६॥
म्हणे कोण्या वीरांचे संधान ॥ पाडिली दहाही छत्रें खंडून ॥ अन्न पान शयन ॥ गोड न लागे रावणातें ॥१७॥
कपाळशूळें आरंबळे व्याघ्र ॥ कीं वणव्यांत आहाळे अजगर ॥ तैसा दुःखें दशकंधर ॥ चिंताक्रांत सर्वदा ॥१८॥
रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ क्षीरसागर ॥ साहित्य शेषशयन अरुवार ॥ वरी सर्वेश्र्वर पहुडला ॥१९॥
तेथें सप्रेम कळा लक्ष्मी ॥ सदा विलसे पादपद्मीं ॥ तरी सद्भाविक श्रोते तुम्ही ॥ पार्षदगण हरीचे ॥२२०॥
सुंदरकांड संपले येथोन ॥ पुढे युद्धकांड सुरस पूर्ण ॥ तें रसभरित भक्तजन ॥ करोत श्रवण सर्वदा ॥२१॥
जो अयोध्यापति रघुनंदन ॥ तेणेंच धनुष्यबाण ॥ दोनी कर जधनीं ठेवून ॥ भीमातटीं उभा असे ॥२२॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥ भक्तहृदयारविंदमिलिंदा ॥ अभंग अभेदा जगद्रुरु ॥२३॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥
त्रयोविंशाध्याय गोड हा ॥२२४॥ अध्याय ॥२३॥