1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीरामविजय - अध्याय २२ वा

अध्याय बावीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


उकलोनी कमलोद्भवाचें पत्र ॥ वाचिता जाहला सौमित्र ॥ सावध ऐके राजीवनेत्र ॥ सूर्यपुत्रादि कपि सर्वही ॥१॥
अनंतकोटीब्रह्मांडनायका ॥ हे दयार्णवा विश्र्वपाळका ॥ वैकुंठपते विश्र्वव्यापका ॥ मम जनका श्रीवल्लभा ॥२॥
हे राम सकळबंधछेदका हे राम साधुप्रतिपाळका ॥ दुष्टरजनीचरसंहारका ॥ जानकीनायका जगद्रुरो ॥३॥
हे राम जगदंकुरमूळकंदा ॥ साधुहृदयारविंदमिलिंदा ॥ निजजनचातकजलदा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥४॥
संसारगजविदारक मृगेंद्रा ॥ दुःखपर्वतभंजन वज्रधरा ॥ निजभक्तचकोर सुधाकरा ॥ अतिउदारा सीताधवा ॥५॥
त्रिभुवनजनका दुःखहरणा ॥ जनकजामाता जनपाळणा ॥ जनकजापते जलजनयना ॥ जलदवर्णा जगत्पते ॥६॥
जय जय राम वेदोद्धारका ॥ कमठरूपासृष्टिपाळका ॥ नमो सकळ दैत्यांतका ॥ वराहवेषा दीनबंधू ॥७॥
नमो हिरण्यकश्यपमर्दना ॥ नमो त्रिविक्रम बलिबंधना ॥ नमो ब्राह्मणकुळपाळणा ॥ भार्गवकुठदिवाकरा ॥८॥
नभो पौलस्तिकुलविपिनदहना ॥ मीनकेतनाहिरहृदयजीवना ॥ नमो चतुर्दशलोकपाळणा ॥ मखरक्षणा रघुवीरा ॥९॥
जय जय विश्र्वपाळणा ॥ विश्र्वव्यापका विश्र्वकारणा ॥ विश्र्वमतिचाळका विश्र्वजीवना ॥ विश्र्वरक्षणा विश्र्वेशा ॥१०॥
नमो मायाचक्रचाळका ॥ नमो अज्ञानतिमिरांतका ॥ नमो वेदरूपा वेदपाळका ॥ वेदस्थापका वेदवंद्या ॥११॥
नमो कमलनाभा कमलजीवना ॥ नमो पापारण्यकुठारतीक्ष्णा ॥ नमो त्रिविधदाहतापशमना ॥ अनंतशयना अनंता ॥१२॥
नमो दशावतारचरित्रचाळका ॥ नमो अनंतब्रह्मांडनायका ॥ नमो अनंतवेषकारका ॥ ताटिकांतका पापहरणा ॥१३॥
नमो जननमरणरोगवैद्या ॥ सच्चिदानंदा स्वसंवेद्या ॥ मायातीता जगवंद्या ॥ भेदाभेदातीत तूं ॥१४॥
नमो सर्गस्थित्यंताकारका ॥ नमो कैवल्यपददायका ॥ अज अजित सर्वात्मका ॥ करुणालया सुखाब्धे ॥१५॥
जय जय षड्विकाररहिता ॥ नमो षड्गुणअलंकृता ॥ अरिषड्वर्गच्छेदप्रतापवंता ॥ शब्दातीता निरंजना ॥१६॥
तूं निर्विकार निरंजन ॥ आम्हांलागीं जाहलासि सगुण ॥ बंदींचे सोडवावे सुरगण ॥ पिशिताशन वधोनियां ॥१७॥
पितृवचनाचें करूनि व्याज ॥ कानना आलासी रघुराज ॥ पंचवटीस राहून सहज ॥ बहुत राक्षस वधियेले ॥१८॥
दशमुखें केलें सीताहरण ॥ त्याचे करावया गवेषण ॥ म्हणोनि किष्किंधेसी आगमन ॥ जाहलें तुझें श्रीरामचंद्रा ॥१९॥
शुद्धीलागीं रुद्रावतार ॥ अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥ जो ब्रह्मांडासी देणार धीर ॥ तरला सागर निमिषार्धें ॥२०॥
अगाध मारुतीचे उड्डाण ॥ बहुतीं वाटेस केलें विघ्न ॥ परी तो अनिवारकिराण ॥ कोणासही नाटोपे ॥२१॥
पडलंकेसी येऊन हनुमंत ॥ राक्षसी संहारिल्या बहुत ॥ प्रवेशला क्रौंचेच्या मुखांत ॥ दांतांस दांत मेळवीं जों ॥२२॥
उदर फोडोनि आला बाहेर ॥ मग शोधिलें निकुंभिलानगर ॥ सुलोचना देखोनि सुंदर ॥ म्हणे हेचि होय जानकी ॥२३॥
तिजवरी घालावया पाषाण ॥ सिद्ध जाहला वायुनंदन ॥ मग तिचे शब्द पसिसतां पूर्ण सीता नव्हे कळलें हें ॥२४॥
मग अणुप्रामाण होऊन ॥ प्रवेशला लंकाभुवन ॥ विटंबिले सकळजन ॥ करूनि नग्न बिदीसी ॥२५॥
पत्र ऐकतां जनकजापती ॥ म्हणे धन्य धन्य वीर मारुती ॥ अद्भुत कर्तव्य अगाध शक्ति ॥ त्रिजगतीं ऐसा नाहीं ॥२६॥
ऐकोनियां विनोदरीती ॥ वानर गदगदां हांसती ॥ एकावरी एक पडती ॥ मुरकुंड्या वळती ऐकतां ॥२७॥
नाना वस्तु उत्तम आणून ॥ वानर टाकिती ओवाळून ॥ एक सप्रेमें हृदयीं धरून ॥ म्हणती धन्य बलाढ्य तूं ॥२८॥
पत्र वाचितां लक्ष्मण ॥ क्षणक्षणां करी हास्यवदन ॥ मागुती तटस्थ झाले हरिगण ॥ पत्र पुढें परिसती ॥२९॥
शोधिलें बिभीषणाचें घर ॥ कीर्तन ऐकोनि झाला निर्भर ॥ मग कुंभकर्णाचें मंदिर ॥ देखोनिया कंटाळला ॥३०॥
रावणस्त्रिया ऐशीं सहस्र ॥ तितुक्या शोधूनि वायुकुमर ॥ राक्षससभा विटंबिली समग्र ॥ तें अगाध चरित्र न वर्णवे ॥३१॥
रावणसेजे मंदोदरी ॥ म्हणे हीच होईल सीता सुंदरी ॥ तंव ते झाले घाबरी ॥ दुष्ट स्वप्न देखोनियां ॥३२॥
दशकंठास सांगे वर्तमान ॥ विषकंठप्रिय रघुनंदन ॥ त्याची सीता द्याहो सोडून ॥ परी रावण न मानी तें ॥३३॥
सीता पहावया पाठविली दूती ॥ तिच्या मागें गेला मारुती ॥ तों अशोकवृक्षातळीं सीता सती ॥ देखोनि कपि नमितसे ॥३४॥
पुढें मुद्रिका ठेवून ॥ वृक्षावरी बैसला एक क्षण ॥ अपार राक्षसी झोडून ॥ पाडिल्या तेथें पराक्रमें ॥३५॥
मुद्रिका देखोनि सीता सती ॥ शोकसमुद्रीं करी वस्ती ॥ मग पुढें येऊन मारुती ॥ प्रत्यक्ष भेटला तेधवां ॥३६॥
सांगितलें सकळ वर्तमान ॥ मग क्षुधेचें मिष करून ॥ विध्वंसिलें अशोकवन ॥ जें विस्तीर्ण तीस योजनें ॥३७॥
रावणे पाठविला दळभार ॥ त्याचा तेक्षणीं केला संहार ॥ मारूनि रावणाचे पुत्र ॥ शक्रजित विटंबिला ॥३८॥
मग म्यां हनुमंतासी प्रार्थून ॥ ब्रह्मपाशीं नेला बांधोन ॥ रावणासी शब्दशस्त्रेंकरून ॥ सभेसी निर्भत्सिलें हनुमंतें ॥३९॥
मारुतीस मारावया सत्वर ॥ पुच्छासी लाविला वैश्र्वानर ॥ स्नेहेंसहित वस्त्रें अपार ॥ गुंडाळोनी साक्षेपें ॥४०॥
पुच्छ पेटतां सत्वर ॥ उडोनि गेला वायुपुत्र ॥ तृतीय भाग लंकानगर ॥ जाळिलें क्षण न लागतां ॥४१॥
परी नवल वर्तलें अद्भुत ॥ लंका सुवर्णमय जाहली समस्त ॥ धन्य तो लोकाप्राणेशसुत ॥ थोर सामर्थ्य दाविलें ॥४२॥
मग सागरीं पुच्छ विझवून ॥ पुन्हां घेतलें जानकीचें दर्शन ॥ जैसें बाळ खेळतां श्रमून ॥ जननीपाशीं येत पैं ॥४३॥
ऐसें वाचतांचि सौमित्र ॥ ऐकतां घनश्यामगात्र ॥ रामें धावूनि वायुपुत्र ॥ हृदयीं धरिला सप्रेमें ॥४४॥
धन्य धन्य ते अंजनी ॥ ऐसें रत्न प्रसवली सद्रुणी ॥ मारुतीचें मुख कुरवाळोनी ॥ निजासनीं राम बैसे ॥४५॥
किष्किंधेहूनी रत्नें आणूनि ॥ ओवाळित मारुतीवरूनि ॥ म्हणे धन्य मारुतात्मज अवतारोनी ॥ ब्रह्मांड भरलें कीर्तीनें ॥४६॥
धन्य धन्य तो दिवस ॥ स्वामी स्वमुखें गौरवी विशेष ॥ तुच्द त्यापुढें सुधारस ॥ स्वर्गभोग सर्वही ॥४७॥
असो यावरी चापपाणी ॥ हृदयीं धरी दिव्यमणी ॥ श्रीरामासी वाटलें ते क्षणीं ॥ कीं जनकजा आणिली हनुमंतें ॥४८॥
म्हणे धन्य मारुती स्नेहाळा ॥ मज भेटविली जनक बाळा ॥ तुझा प्रताप उजळला ॥ निराळमंडपि अवघाचि ॥४९॥
एवढा सागर उल्लंघूनी ॥ जानकी आलासी घेऊनी ॥ तुवां उपकारऋणेंकरूनी ॥ मज बांधिले हनुमंता ॥५०॥

अध्याय बावीसावा - श्लोक ५१ ते १००
हनुमंत विचारी मनीं ॥ म्यां खुण आणिली सीतेचा मणी ॥ यालागीं कोदंडपाणी ॥ आनंदला अत्यंत ॥५१॥
मज थोर चुकी घडली तेथें ॥ जरी सीताचि आणितों येथें ॥ तरी आनंदें श्रावणारिसुतें ॥ भरलें असतें ब्रह्मांड ॥५२॥
मग मनीं विचारी सीताशोकहरण ॥ आतां काय झालें बळ क्षीण ॥ न लोटतां यामार्ध पूर्ण ॥ घेऊन येईन पद्माक्षी ॥५३॥
मग म्हणे जी रघुनाथा ॥ क्षण एक धीर धरीं आतां ॥ घेऊन येतों जनकदुहिता ॥ सकळ राक्षसां निवटोनी ॥५४॥
हनुमंत करी उड्डाण ॥ सावध जाहला सीतारमण ॥ म्हणे हनुमंता न करीं गमन ॥ आहे कारण बहु पुढें ॥५५॥
आवेशें निघाला मारुती ॥ नाटोपेच तो कवणाप्रती ॥ मग स्वयें धांवूनि रघुपती ॥ आवरीत हनुमंता ॥५६॥
उचलोनियां रघुनाथ ॥ निजस्कंधीं वाहे हनुमंत ॥ म्हणे लंकेसी नेतों त्वरित ॥ रावणासी वधावया ॥५७॥
तों उर्मिलापति आणि अर्कसुत ॥ धांविन्नले अंगद जांबुवंत ॥ चौघे हनुमंतासी आवरित ॥ परी तो सर्वथा नाटोपे ॥५८॥
चौघांसही उचलून ॥ उडों पाहे सीताशोकहरण ॥ म्हणे इतुकेची लंकेसी जाऊन ॥ असुर मर्दून येऊं आतां ॥५९॥
वरकड न्यावे जरी वानर ॥ तरी ते कैसे तरतील सागर ॥ यालागीं निवडक थोर थोर ॥ पांचजण नेऊं हे ॥६०॥
पांचजणांसी उचलून ॥ स्कंधीं वाहे वायुनंदन ॥ कीं तो पंचश़ृंगांचा पूर्ण ॥ नगोत्तमचि शोभला ॥६१॥
कीं पंच फळें लागलीं वृक्षासी ॥ तीं जड कदा न होती तयासी ॥ कीं उदयाद्रीवरी तेजोराशी ॥ पंच सूर्य उगवले ॥६२॥
असो घेऊनि पांचजण ॥ हनुमंत करूं पाहे गमन ॥ यावरी मंगळभगिनीचा रमण ॥ हनुमंतासी विनवीतसे ॥६३॥
मारुति ऐकें प्राणसखया ॥ विचाराविणें भलती क्रिया ॥ न करावी हे कदा चर्या ॥ श्रेष्ठांची असे पूर्वीहून ॥६४॥
ऐसें विनवितां रघुनंदन ॥ मग उतरले पांचही जण ॥ जनकजापतीचे चरण ॥ सप्रेमें धरिले हनुमंतें ॥६५॥
सुग्रीव जांबुवंत नळ नीळ ॥ वर्णिती अनिळात्मजाचें बळ ॥ यावरी तो तमालनीळ ॥ सभा करूनी बैसला ॥६६॥
श्रीराम पुसे मारुतीप्रती ॥ कैसी असे लंकेसी गती ॥ राक्षस वर्तती कोणें रीतीं ॥ काय आचरती पुण्यक्रिया ॥६७॥
यावरी चार्तुयरत्नाकर ॥ बोले लोकप्राणेशकुमर ॥ जैसा शक्र आणि अंगिराकुमर ॥ करिती विचार एकांतीं ॥६८॥
तीनशें गांव लांब लंका ॥ रेखोनि दाविली रघुनायका ॥ सकळ सदनांचीं करून संख्या ॥ ठायीं ठायीं दाखविली ॥६९॥
जे कां मर्गज पाषाण ॥ त्यांचीं पांच लक्ष गृहें जाण ॥ सात लक्ष दैदीप्यमान ॥ विटबंदी मंदिरें ॥७०॥
ताम्र आणि कांसें निखिळ ॥ तयांची पांच कोटी सदनें निर्मळ ॥ सुवर्णांची अत्यंत सबळ ॥ सात कोटी राघवेंद्रा ॥७१॥
हेमरत्नीं अलंकृत ॥ नवकोटी शिवालयें तेथ ॥ रुद्राभिषेक नैवेद्य बहुत ॥ त्रिकाळ चालविती राक्षस ॥७२॥
असुरांच्या गृहीं पूर्ण ॥ अग्निहोत्र वेदाध्ययन ॥ रुद्राक्षमाळा भूषण ॥ विभूति चर्चन करिती पैं ॥७३॥
मुख्य रावणें सुबुद्धीपूर्ण ॥ टाकिलीं वेदांचीं खंडें करून ॥ तप आचरती दारुण ॥ ठायीं ठायीं राक्षस ॥७४॥
ऐसें बोलतां वायुनंदन ॥ रघुनाथ झाला उदिग्न ॥ ऐसी लंका पुण्यपरायण ॥ ते मज सर्वथा नाटोपे ॥७५॥
ऐसें जेथें सत्कर्माचरण ॥ तेथें नांदे यश कीर्ति कल्याण ॥ तरी तें होता नये लंकाभुवन ॥ बहु यत्न करितांही ॥७६॥
तेव्हां क्षण एक रघुनाथ ॥ निवांत न बोले चिंताक्रांत ॥ भोंवते वानर तटस्थ ॥ पाहूं लागले ते काळीं ॥७७॥
मग श्रीराम म्हणे मारुती ॥ तुवां सांगितली राक्षसांची स्थिती ॥ परी दया क्षमा उपरती ॥ शांति विरक्ति मुख्य जया ॥७८॥
शौच आणि धर्मदान ॥ असुर करिती कीं अनुदिन ॥ यावरी सीतासंतापहरण ॥ काय वचन बोलिला ॥७९॥
क्षमा दया शुद्ध अंतर ॥ शौच दान धर्म पवित्र ॥ हें लंकेमाजीं अणुमात्र ॥ सर्वथाही नसेचि ॥८०॥
परम अधर्मी निर्दय असुर ॥ कापट्यचर्या तपें क्रूर ॥ अत्यंत खळ दुराचार ॥ मद्यप्राशक उन्मत्त ते ॥८१॥
मारुती वचन ऐकुनी ॥ हास्यमुख होय चापपाणी ॥ तरी लंका घेईन ये क्षणीं ॥ पापखाणी वसती तेथें ॥८२॥
अंतरीं दया क्षमा नाहीं ॥ मग व्रतें तपें जाळिसी काई ॥ तो जरी पढला शास्त्रें साही ॥ व्यर्थ काय ते वटवट ॥८३॥
नटांमाजील कामिन ॥ कीं कोलाटियाचें शूरत्व पूर्ण ॥ कीं भ्रष्टाचें तत्वज्ञान ॥ कीं शांति पूर्ण सर्पाची ॥८४॥
कीं विधवेचें नवयौवन ॥ कीं ग्रामथिल्लरींचें जीवन ॥ कीं अनामिकाचें रम्य सदन ॥ कीं मुखमंडन वेश्येचें ॥८५॥
कीं गर्भांधाचे विशाळ नयन ॥ कीं बधिराचे शोभायमान कर्ण ॥ कीं अजाकंठींचें स्तन ॥ कीं आचरण जाराचें ॥८६॥
कीं सावचोराचे गोड बोल ॥ कीं मैंदाची शांति खोल ॥ वाटपाडे निर्मळ ॥ निरंजनीं बैसले ॥८७॥
कीं दाट लागलें कंटकवन ॥ कीं दंभिकांचें व्यर्थ भजन ॥ तैसें भूतदयेवांचून ॥ ज्ञान ध्यान व्यर्थची ॥८८॥
त्याचा एकांत व्यर्थ देख ॥ जैसे बिळीं बैसले मूषक ॥ शांति त्याची जैसा बक ॥ मत्स्यहरणार्थ बैसला ॥८९॥
भस्म अंगीं चर्चित साचार ॥ जैसा उकिरडां लोळे खर ॥ कीं अरण्यांत वसती निरंतर ॥ वृक व्याघ्र जैसे कां ॥९०॥
तेणें तीर्थीं केला वास ॥ तरी काय थोडे आहे वायस ॥ तीर्थजळीं मंडूक विशेष ॥ वटवटती विशेषें ॥९१॥
तेणें पाहिल्या चौसष्ट कळा ॥ परी तितुक्या जाणाव्या विकळा ॥ दया क्षमेचा नसतां जिव्हाळा ॥
कळा त्या विकळा ॥ दया क्षमेचा नसतां जिव्हाळा ॥ कळा त्या विकळा जाणिजे ॥९२॥
तेणें केलें वेदाध्ययन ॥ जैसा खरावरी वाहिला चंदन ॥ षड्रसपाकीं दर्वीं पूर्ण ॥ व्यर्थ जैसी फिरूनियां ॥९३॥
त्याचे वरिवरि कीर्तन ॥ कीं गोरियाचें गायन ॥ कीं मद्यपियाचें भाषण ॥ शब्दज्ञान तेसें त्याचें ॥९४॥
जैसें वृंदावनफळ ॥ वरिवरि दिसे निर्मळ ॥ कीं धोत्राफळ रसाळ ॥ फणसासम दिसे पैं ॥९५॥
अवघा वेळ चुना मथितां ॥ परी नवनीत नये हाता ॥ सिकताहरळ शिजवतां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥९६॥
तुंबिनीचें अत्यंत कडू फळ ॥ शर्करेंत ठेविल्या सर्वकाळ ॥ परी तें अंतरीं गोड होईल ॥ हें कल्पांतीं घडेना ॥९७॥
चुना माखोनि वायस ॥ बळेंचि जाहला राजहंस ॥ परी जाय विष्ठा शोधावयास ॥ व्यर्थ वेष कासया ॥९८॥
यालागीं ऐक हनुमंता ॥ दया क्षमा हृदयीं नसतां ॥ जप तप ध्यान तत्वतां ॥ व्यर्थ गेलें निर्धारें ॥९९॥
तरी ते लंकावासी असुर ॥ करीन अवघ्यांचा संहार ॥ ऐकतां आनंदले वानर ॥ देती भुभुःकार एकदांचि ॥१००॥

अध्याय बावीसावा - श्लोक १०१ ते १५०
असो ब्रह्मपत्र मागें वाचिलें ॥ तें विरिंचीनें होतें लिहिलें ॥ हनुमंतें लंकादहन केलें ॥ परी नगर झालें सुवर्णाचें ॥१॥
ते ऐकोनियां मात ॥ आश्र्चर्य करी कौसल्यासुत ॥ मग जांबुवंतासी पुसत ॥ हा वृत्तांत कैसा असे ॥२॥
तूं बहुकाळाचा पुरुष ॥ देखिलें ऐकिलें बहुवस ॥ तो ब्रह्मयाचा अंश ॥ अयोध्याधीश म्हणोनि पुसे ॥३॥
वयें गुण तपें बहुत ॥ वडील असे जांबुवंत ॥ सांगे पूर्वीचा वृत्तांत ॥ जैं लंका नगर वसत पैं ॥४॥
जें केलें गजेंद्रोद्धारण ॥ वेगें परतला रमारमण ॥ तों कर जोडूनि सुपर्ण ॥ क्षुधेनें बहु व्यापिला ॥५॥
मग बोले श्रीकरधर ॥ गजेंद्रनक्रांची कलेवरें थोर ॥ तीं भक्षून येई सत्वर ॥ ऐकोनि पक्षींद्र उडाला ॥६॥
नक्रगजेंद्रांचीं कलेवरें दोनी ॥ उरगारि घेऊन उडे गगनीं ॥ तों भृभंग पक्षी येऊनी ॥ विभाग मागे खगेंद्रा ॥७॥
गरुडें न लागतां एक क्षण भृभंगाचा घेतला प्राण ॥ जंबूवृक्षाची शाखा पाहून ॥ वैनतेय बैसला ॥८॥
तों साठिसहस्र वालखिल्यें ॥ तिहीं त्या शाखेसि टांगून घेतलें ॥ अरुणानुजें बळ तुळिलें ॥ तों शाखा विशाळ मोडली ॥९॥
शतयोजनें शाखा थोर ॥ पडतां मृत्यु पावतील विप्र ॥ शाखा हातीं मुखीं गजनक्र ॥ कश्यपसुत उडाला ॥११०॥
मग बोले विष्णुवहन ॥ म्हणे मी कोणास जाऊं शरण ॥ शाखा सोडितां ब्राह्मण ॥ साठ सहस्र मरतील ॥११॥
कश्यप बैसला अनुष्ठानीं ॥ त्यावरी पक्षें छाया धरिली गगनीं ॥ तों वरुतें पाहे विलोकुनी ॥ तंव सुत संकटीं पडियेला ॥१२॥
तेव्हां कश्यप ऋषीनें प्रार्थून ॥ खालीं उतरविले ब्राह्मण ॥ मग कश्यप म्हणे पुत्रालागून ॥ शाखा येथें न ठेवीं ॥१३॥
या शाखेकारणें पूर्ण ॥ मानव घेतील एकमेकांचा प्राण ॥ मग विहंगोत्तमें शाखा उचलून ॥ लंकागिरी वरी आला ॥१४॥
तिवडा पाय त्याचा रुतला ॥ तोच हा त्रिकूटाचल जाहला ॥ गरुडें आहार तेथें घेतला ॥ टाकूनि गेला शाखा तेथें ॥१५॥
त्यावरी मग लंका वसिन्नली ॥ ते सुवर्ण शाखा असे तळीं ॥ हनुमंतें लंका जाळिली ॥ मूस ओतली शाखेसी ॥१६॥
यालागीं सुवर्णाची लंका ॥ जाहली जाण अयोध्यानायका ॥ तों अर्कज म्हणे मुहूर्त निका ॥ ये समयीं असे पैं ॥१७॥
विजयादशमी नक्षत्र श्रवण ॥ ते दिवशीं निघाला रघुनंदन ॥ पूर्वी रघूनें हाचि मुहूर्त पाहून ॥ दिग्विजयासी गेला होता ॥१८॥
सर्व शुभ योग ते क्षणीं ॥ जयातिथि माळ घेऊनि ॥ दशकंठरिपूचे चरणीं ॥ मिठी घाली तेधवां ॥१९॥
साह्य सुग्रीव किष्किंधेश्र्वर ॥ उठले अठरा पद्में वानर ॥ बहात्तर कोटी रीस वीर ॥ त्यांचा नृपवर जांबुवंत ॥१२०॥
छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥ भुभुःकार देती एकचि वेळ ॥ दणाणिलें उर्वीमंडळ ॥ धाकें निराळ कांपतसे ॥२१॥
काद्रवेयकुळभूषण तेव्हां ॥ सरसावित खालतीं ग्रीवा ॥ यज्ञवराहें दंत बरवा ॥ दृढ धरिला उचलोनी ॥२२॥
कूर्म पृष्ठी सरसावित ॥ दिग्गज जाहले भयभीत ॥ मंगळजननी कांपत ॥ भुभुःकार कानीं ऐकतां ॥२३॥
वनचर आणि खेचर ॥ भयभीत जाहले थोर ॥ धडके वाद्यांचा गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥२४॥
रथारूढ जैसा सहस्रकर ॥ कीं सौपर्ण श्रीकरधर ॥ हनुमंतस्कंधीं रघुवीर ॥ तैसा शोभला ते काळीं ॥२५॥
नंदीवरी बैसे कर्पूरगौर ॥ कीं ऐरावतारूढ सहस्रनेत्र ॥ अंगदस्कंधावरी सौमित्र ॥ त्याचपरी शोभला ॥२६॥
किरणचक्रीं विराजे तमारी ॥ कीं कुळाचळांमाजी कनकाद्री ॥ कीं निजगणांमाजी स्मरारी ॥ तैसा वानरीं राम वेष्ठिला ॥२७॥
कीं मंथावया क्षीरसागर ॥ मिळोनि निघाले सुरासुर ॥ तैसेच गर्जत वानर ॥ दक्षिणपंथें चालिले ॥२८॥
विशाळ वृक्ष उपडिती ॥ छत्र रामावरी धरिती ॥ वृक्ष पल्लव घेऊन हातीं ॥ चवरें विराजती रामावरी ॥२९॥
दशयोजन रुंद सेना जातां ॥ मार्गीं वानर म्हणती रघुनाथा ॥ आजी रावणा घालूं पालथा ॥ जनकदुहिता भेटवूं तुम्हां ॥१३०॥
एक बोले वानर वीर ॥ मी जाऊन मारीन दशवक्र ॥ एक वेद न लागतां क्षणमात्र ॥ मोट बांधून आणीन ॥३१॥
एक म्हणे स्वामी रघुनंदना ॥ ऐसें वाटतेंं माझिया मना ॥ रावणाच्या नासिकां कर्णां ॥ छेदून येईन झडकरी ॥३२॥
एक म्हणे एकलाचि जाईन ॥ लंका पालथी घालीन ॥ एकोनि सुखावे रघुनंदन ॥ म्हणे हे सुरगण अवतरले ॥३३॥
दक्षिणपंथे भार जात ॥ मार्गी कपि उचलिती पर्वत ॥ कंदुका ऐसे झेलित ॥ धांवताती आवेशें ॥३४॥
समुद्रतीरास आले भार ॥ भुभुःकार देती वानर ॥ तेणें भयभीत नदीश्र्वर ॥ जाहला परम ते काळीं ॥३५॥
जैसा वेद बोलत गेला अद्भत ॥ स्वरूप देखोनि जाहला तटस्थ ॥ तैसे वानरवीर समस्त ॥ समुद्रतीरीं स्थिरावले ॥३६॥
कीं राजहंसांच्या येऊन हारी ॥ स्थिरावती मानससरोवरीं ॥ तैसे ते समुद्रतीरीं ॥ कपि-केसरी तटस्थ ॥३७॥
दशयोजनें अद्भुत ॥ सेना उतरली ओतप्रोत ॥ असो लंकेमाजी वृत्तांत ॥ वर्तला तोचि परिसावा ॥३८॥
कपिसहित अयोध्याविहारी ॥ पातला सागराचे पैल तीरीं ॥ ऐसी ध्वनी लंकेमाझारी ॥ राक्षसेंद्रें आकर्णिली ॥३९॥
शक्रजितादि सकळ कुमर ॥ प्रहस्तादि प्रधान थोर थोर ॥ त्यांसहित विंशतिनेत्र ॥ बैसे विचार करावया ॥१४०॥
परम सचिंत द्विपंचवदन ॥ म्हणे शत्रु दंदशूक कृशान ॥ हे सर्वथा न म्हणावे लहान ॥ न लागतां क्षण विघ्न करिती ॥४१॥
तरी सहपरिवारें येऊन ॥ परतीरीं उतरला रघुनंदन ॥ हा आकळे ऐसा मंत्र कोण ॥ विचारूनि सांगा आतां ॥४२॥
एकला येऊन वानर ॥ जाळून गेला लंकानगर ॥ शुद्धि सांगोनि रामचंद्र ॥ घेऊन आला वेगेंसी ॥४३॥
ऐसें बोलतां द्विपंचवदन ॥ सकळ कुमर आणि प्रधान ॥ जाहले परम क्रोधायमान ॥ शस्त्रें तुळोनि बोलती ॥४४॥
ते नर वानर आणि ऋक्ष ॥ सहज आले आमुचे भक्ष ॥ कृपाळु आम्हांवरी विरूपाक्ष ॥ तेणेंच धाडोनि दीधले ॥४५॥
तुम्हीं चिंता न करावी साचार ॥ तुमचे शत्रूचा करूं संहार ॥ आम्ही येऊं न लागतां क्षणमात्र ॥ म्हणोनि शस्त्रें झाडिती ॥४६॥
शक्रजित अतिकायादि कुमर ॥ देवांतक नरांतक महोदर ॥ धूमा्रक्ष वज्रदंष्ट्री असुर ॥ म्हणती नर वानर क्षणें जिंकूं ॥४७॥
दूर असतां मृगनायक ॥ मागें निंदा जल्पती जंबुक ॥ कीं मिळोनि बहुत मंडूक ॥ वासुकीसी जिंकूं म्हणती ॥४८॥
तंव ते सभेमाजी बिभीषण ॥ येता झाला सभा देखोन ॥ जैसा वायस सभेंत येऊन ॥ राजहंस बैसला ॥४९॥
जो विवेकरत्नांचा किरीट ॥ कीं सद्रुणगंगेचा लोट ॥ कीं भाववैरागरींचा सुभट ॥ दिव्य हिरा प्रकाशला ॥१५०॥

अध्याय बावीसावा - श्लोक १५१ ते २२०
विवेकभूमीचें निधान ॥ कीं भक्तिसमुद्राचें भरतें पूर्ण ॥ कीं ते परमार्थवनींचें सुमन ॥ अम्लान सुंदर विकासलें ॥५१॥
असो ऐसा बिभीषण थोर ॥ न्यायसिंधु सत्यसमुद्र ॥ सकळ खळांसी प्रत्युत्तर ॥ देता जाहला ते वेळे ॥५२॥
म्हणे वाचाळ तुम्ही परम दुर्जन ॥ महाकपटी अंतरमलिन ॥ दशमुखाभोंवतें मिळोन ॥ नानाकुतर्क करीतसां ॥५३॥
यश धैर्य सकळ सद्रुण ॥ सभाग्याची करणी ऐकोन ॥ परम खेद मानिती दुर्जन ॥ नसतें दूषण लाविती ॥५४॥
परम कुमति जो बळहीन ॥ मागें निंदा जल्पे रात्रंदिन ॥ समरभूमीसी पळे उठोन ॥ हे तों लक्ष्मण श्र्वानाचें ॥५५॥
सकळ दळासमवेत ॥ जिंकू म्हणतां अयोध्यानाथ ॥ तरी येथें एकलाचि हनुमंत ॥ आला होता निजबळें ॥५६॥
जैसें करतळींचें आचमन ॥ कीं गोवत्सपदींचें जीवन ॥ तैसा ज्याचे दृष्टी समुद्र पूर्ण ॥ लंघोनि क्षणें आला तो ॥५७॥
तेणें विध्वंसिलें सकळ नगर ॥ रावणसभा नागविली समग्र ॥ कोट्यानकोटी निशाचर । अशोकवनीं संहारिले ॥५८॥
राजसुत मारिले समस्त ॥ विवरीं कोंडिला शक्रजित ॥ लंका जाळून अद्भुत ॥ पुरुषार्थ तेणें दाविला ॥५९॥
ते वेळे तुमचें बळ ॥ काय जाहले होतें विकळ ॥ आतां रावणाभोंवते सकळ ॥ पुरुषार्थ सांगतां ॥१६०॥
नाना पाखंडी दुर्जन यवन ॥ इहीं वेदांसी ठेविलें दूषण ॥ परी वंदिती कीं विद्वज्जन ॥ ज्ञानसंपन्न धर्मात्मे ॥६१॥
कमळासी निंदिती दर्दुर ॥ परी सहसा न विटेचि भ्रमर ॥ चंद्रासी निंदिती तस्कर ॥ परी ते चकोर आनंदती ॥६२॥
खळ ते निंदती पंडित ॥ परी कुशल वंदिती समस्त ॥ वायस मुक्तें वोसंडित ॥ परी मराळ न वीटती ॥६३॥
मूढासी न कळे कस्तुरी ॥ पंक म्हणोनि टाकिती दूरी ॥ परी श्रीमंत अहोरात्री ॥ हृदयीं शिरी धरिताती ॥६४॥
दिवाभीता नावडे अर्क ॥ परी आनंदती चक्रवाक ॥ अंधें टाकिलें रत्न ॥ सुरेख ॥ परी परिक्षक संरक्षिती ॥६५॥
तैसा जगद्वंद्य रघुवीर ॥ जयासी हृदयीं ध्याय उमावर ॥ कमलोद्भव सहस्रनेत्र ॥ सहस्रवक्र स्तवी जया ॥६६॥
सनकादिक हृदयीं ध्याती ॥ जो वेद उदयाचळींचा गभस्ती ॥ तो हा पुराणपुरुष आला व्यक्ती ॥ मूळप्रकृतीसमवेत ॥६७॥
ब्रह्मांडनगरस्तंभ अद्भुत ॥ मायाचक्रचाळक शाश्र्वत ॥ दशरथाचा पुण्यपर्वत ॥ श्रीरामरूपें प्रगटला ॥६८॥
तैसा वेदवंद्य रघुवीर ॥ त्यासी तुम्ही निंदितां पामर ॥ रावणासी झोंबला कामविखार ॥ भुलला साचार म्हणोनी ॥६९॥
कार्तवीर्याचे बंदी जाऊन ॥ पडिला होता द्विपंचवदन ॥ परम पुरुषार्थी सहस्रार्जुन ॥ भृगुनंदनें वधिलें त्यासी ॥१७०॥
जो क्षत्रियांतक प्रळयरुद्र ॥ त्यास जिंकी हा रामचंद्र ॥ मतिहीन झाला विंशतिनेत्र ॥ नोळखे स्वरूप तयाचें ॥७१॥
वनचर न होती द्रुमपाणी ॥ अवघे अवतरले सुधापानी ॥ अजून तरी हें मनीं जाणोनी ॥ जानकी द्वावी रामचंद्रा ॥७२॥
चंड कोदंड अद्भुत ॥ रावणासी नुचले जड बहुत ॥ तें दुखंड करी रघुनाथ ॥ सकळ रायांदेखतां ॥७३॥
यालागीं सागरपैलापारीं ॥ रामचंद्र जों आहे दूरी ॥ तों मंगळजननीची कुमरी ॥ राघवेंद्रा समर्पावी ॥७४॥
ऊर्मिलाजीवनाची चापरेखा ॥ नुलंघवेचि तुज दशमुखा ॥ यालागीं त्रिभुवननायका ॥ जानकी नेऊन भेटवीं ॥७५॥
जानकीस भेटवी रघुनंदन ॥ बंदींचे सोडवी सुरगण ॥ मग चंद्रार्कवरी कल्याण ॥ पुत्रपौत्रीं नांदसी ॥७६॥
माझीं वचनें वाटती कठीण ॥ परी पुढें गोड अमृताहून ॥ औषध आधीं कटुवट पूर्ण ॥ परी रोगहरण पुढें करी ॥७७॥
गोड अत्यंत नाबदी साखर ॥ मुखीं घालितां कडकड फार ॥ परी गोडी ते अपार ॥ तैसीं साचार वचनें माझीं ॥७८॥
तुरट वाटे आमलक ॥ परी पुढें गोडी दे अधिक ॥ तैसीं माझीं वचनें दुःखमोचक ॥ हृदयीं धरी दशकंधरा ॥७९॥
पिता पढवी पुत्रालागून ॥ त्यास वाटे विषासमान ॥ परी पुढें गोड सुधेहून ॥ महिमा पूर्ण वाढे जेव्हां ॥१८०॥
अशुभ चिन्हें अत्यंत ॥ लंकेमाजी होती बहुत ॥ क्षणक्षणां उल्कापात ॥ नभ थरथरतें वाटतसे ॥८१॥
जलदजाळ नसे किंचित ॥ रुधिरधारा मेघ वर्षत ॥ दुष्ट स्वप्नें अत्यंत ॥ मंदोदरीस जाणविती ॥८२॥
विगतधवा स्त्रिया येऊन ॥ ओटी भरिती मृत्तिका घेऊन ॥ मंगळसूत्र तोडून ॥ कृष्णवस्त्रपुरुष नेतसे ॥८३॥
यालागीं दशवदना तूं सज्ञान ॥ टाकिलीं वेदांचीं खंडें करून ॥ तरी जाणत जाणतां कृशान ॥ पदरीं कैसा बांधिसी ॥८४॥
समजोनिया विष दारुण ॥ कां करावें बळें प्राशन ॥ दंदशूक ओळखून ॥ मग कां उशीं करावा ॥८५॥
खदिरांगार जाणोन ॥ मग कां वरी करावें शयन ॥ उदरीं पाषाण बांधोन ॥ महाडोहीं कां निघावें ॥८६॥
ऐसें बोलतां बिभीषण ॥ तटस्थ जाहले सभाजन ॥ क्रोधें व्याप्त रावण ॥ मौन धरून उगाचि ॥८७॥
बिभीषणासी म्हणे प्रहस्त ॥ उगेच बैसा हो निश्र्चित ॥ सभेंत बोलतां अनुचित ॥ मृत्यु पावाल निर्धारें ॥८८॥
तुम्ही राजबंधु म्हणवितां जाण ॥ परी शतमूर्खाहूनि बुद्धिहीन ॥ तुम्हांस नाहीं चातुर्यज्ञान ॥ तरी उठोन गृहा जावें ॥८९॥
सक्रोधें बोलें इंद्रजित ॥ तूं अनुचित बोललासी सभेंत ॥ तुज आतांचि वधितों यथार्थ ॥ परी पितृव्य म्हणोनि शंकलों ॥१९०॥
शक्रजित म्हणे दशमुखा ॥ हा तुमचा बंधु सखा ॥ परी हा शत्रुचा पक्षपाती देखा ॥ अनर्थकारक दिसतसे ॥९१॥
बिभीषण म्हणे तूं चांडाळ ॥ महाकपटी कृतघ्न खळ ॥ तुमचे संगतीनें भूपाळ ॥ मतिमंद जाहला ॥९२॥
अंकुशें आकर्षिजे वारण ॥ भुजंग आकळिजे मंत्रेंकरून ॥ राजमती आकळिती प्रधान ॥ परम सज्ञान चतुर जे ॥९३॥
माजला अत्यंत कृशान ॥ तो विझविजे जळेंकरून ॥ कीं क्रोधोर्मी अति दारुण ॥ सद्विवेकें आकर्षिजे ॥९४॥
नृपें करितां अनुचित करणी ॥ तत्काळ आवरिजे प्रधानीं ॥ परी तुम्ही अवघे पापखाणी ॥ निर्दय आणि कृतघ्न ॥९५॥
राजा आधींच अत्यंत खळ ॥ प्रधान मिळाला अमंगळ ॥ मग अविवेक वाढे प्रबळ ॥ कुबुद्धिकल्लोळ उठती पैं ॥९६॥
शंख करावयाची हौस गहन ॥ त्यांत पातला मास फाल्गुन ॥ कीं स्त्रीराज्यांतील पारिपत्य पूर्ण ॥ जारासी प्राप्त जाहलें ॥९७॥
आधींच चाहाड तस्कर ॥ त्यावरी पाठिराखा नृपवर ॥ कीं उन्मत्तासी सरोवर ॥ प्राप्त जाहलें मद्याचें ॥९८॥
तैसा कुबुद्धीनें वेष्टिला दशवदन ॥ तैसेंच तुम्ही मिळालां प्रधान ॥ जैसे वृकाचे सदनीं श्र्वान ॥ कारभारी जाहलें ॥९९॥
अरे तुझें मरण आलें जवळी ॥ म्हणोनि आणिली जनकबाळी ॥ अयोध्याप्रभु प्रतापबळी ॥ आला निकट काळ तुझा ॥२००॥
रावणें अनुचित कर्म मांडिलें ॥ म्हणोनि मातेनें मज प्रेरिलें ॥ यालागीं तुम्हांतें बोलिले ॥ मनीं धराल म्हणोनी ॥१॥
परी होणार बळिवंत ॥ तुम्ही नायकाचि उन्मत्त ॥ सीता न द्याल तरी निश्र्चित ॥ कुळक्षय होईल तुमचा ॥२॥
ऐसें ऐकतां रावण ॥ क्रोधें व्यापिला परिपूर्ण ॥ बिभीषणावरी शस्त्र घेऊन ॥ परम आवेशें धांविन्नला ॥३॥
बिभीषण केवळ परम भक्त ॥ तयासी रक्षिता रघुनाथ ॥ तो रावणाचा उपटला हात ॥ शस्त्र पडलें धरेवरी ॥४॥
मागुता धांवे रावण ॥ इंद्रजितें धरिला आवरून ॥ मग झाडिला वाम चरण ॥ तो लागला बिभीषणासी ॥५॥
बिभीषण केवळ शांत ॥ निर्मत्सर भेदरहित ॥ रावणासी मागुती म्हणत ॥ सखा रघुनाथ करीं कां रे ॥६॥
बिभीषण क्षमाशील पूर्ण ॥ वानिती सकळ राक्षसगण ॥ तो माता कैकसी येऊन ॥ सांगें हित बिभीषणा ॥७॥
म्हणे पुत्रासी तूं ऊठ आतां ॥ शरण जाईं रघुनाथा ॥ जो वज्रपंजर शरणागता ॥ भवव्यथा वारील तो ॥८॥
माझे उदरा आलासी साचार ॥ करीं माझा उद्धार ॥ तनुमनधनेंसी सत्वर ॥ शरण जाईं रघुवीरा ॥९॥
सांडोनि सकळ मायाचिंता ॥ शरण जावें जानकीनाथा ॥ रावणें क्षय केला तत्वतां ॥ तूं जाय परता येथूनी ॥२१०॥
जे बळेंचि विष भक्षिती ॥ शहाणे न बैसती त्यांचे पंक्ती ॥ तरी तूं सखा करी रघुपती ॥ नाश कल्पांतीं नव्हे तूंतें ॥११॥
ऐकोनि मातेचें वचन ॥ बिभीषणें केलें साष्टांग नमन ॥ घेऊनि चौघेजण प्रधान ॥ उभा ठाकला ते काळीं ॥१२॥
रावणासी म्हणे बिभीषण ॥ मी श्रीरामासी जातो शरण ॥ तूं ज्येष्ठबंधु म्हणोन ॥ पुसतों तुज मागुती ॥१३॥
ऐसें बोलोनि त्वरित ॥ बिभीषण उडाला अकस्मात ॥ चौघां प्रधानांसमवेत ॥ सर्वांदेखतां ते काळीं ॥१४॥
जैसें कलेवर सांडून ॥ एकदांच निघती पंचप्राण ॥ कीं पांचही दिवाकर मिळोन ॥ अस्ताचळावरी चालिले ॥१५॥
कीं कल्पांतीं पंचमहाभूतें ॥ जाती स्वरूपास मिळावयातें ॥ तैसे शरण जनकजापतीतें ॥ पांचही जाती त्वरेंनें ॥१६॥
श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ हाचि केवळ रामेश्र्वर ॥ आवडीच्या कावडी भरोनि सत्वर ॥ सभक्त नर धांवती ॥१७॥
भाव प्रयागींचें प्रेमोदक ॥ जे या रामेश्र्वरावरी करिती अभिषेक ॥ त्यांचे मनोरथ अयोध्यानायक ॥ सत्य परिपूर्ण करील ॥१८॥
अयोध्याधीशा ब्रह्मानंदा ॥ श्रीधरवरदा वेदवंद्या ॥ छेदोनियां अविद्याभेदा ॥ अभंग पदा देशी कीं ॥१९॥
स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिक नाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२२०॥
ओंव्या ॥२२०॥
॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥