1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

कहाणी शिळासप्तमीची

कहाणी शिळासप्तमीची
NDND
एक नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानंएक गाव वसवला. जवळ तळं बांधल. काही केल्या पाणी लागेना. जल देवतेची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या राजा राजा तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हे राजानं ऐकलं. घरी आला मनी विचार केला, फार दु:खी झाला. पुष्कल लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही, पण ही गोष्ट कशी घडेल? सून कशी कबूल होईल?

तशी त्याने तोड काढली. सुनेला माहेरी पाठवून मुलगा ठेवून घ्यावा. सासर्‍याने आज्ञा केली, सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातलं, जेवू खाऊ घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेविला. जळदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊ लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनी बांधलेलं तळं पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली. तो वसा काय? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीचे पान घ्यावे, दहीभात आणि लोणचं वर घालावं, एक ‍िशवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकळं तळ्यात टाकावे आणि जलदेवतांची प्रार्थना करावी, जय देवी! आई माते! आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हार परत मिळोत!

याप्रमाणं तळ्यात उभे राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर, बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला. पाय कोण ओढतं? म्हणून पाहू लागली, तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं कडेला घेतला. आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलालासुद्धा घेऊन येत आहे. राजास आश्चर्य वाटलं. त्याने तिचे पाय धरले. तिला विचारले, अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला. तो परत कसा आला? मी शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढं आलं. तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तिजवर ‍अधिक ममता करू लागला. जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या. तश्या तुम्हा आम्हा होवोत.