1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (21:16 IST)

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने पाच एकर कोबीवर फिरविला नांगर फोटो

farmer
नाशिक :  प्रतिनिधी 
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकला केवळ १ रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पिक काढण्यासाठी काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आपल्या ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरच्या सहायाने नांगर फिरविला आहे. 
पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा २.५० लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी  शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे  आहे. आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.
मी एक सुज्ञ युवा शेतकरी असून आपण कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने या शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाग पाडले जाईल. सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा शासनाला पळता भुई थोडी करू...
 – शेतकरी अंबादास खैरे
Edited by : Ratnadeep Ranshoor