रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)

वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस, उद्यानाची भिंत कोसळल्याने भिंतीखाली दबून दोघांचा मृत्यू

मुंबईतल्या कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरात बुधवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस पडला. यावेळी अनेक ठिकाणी होर्डिंग्ज पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अंबरनाथ शहरात महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरात पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळल्याने भिंतीखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. 
 
संबंधित घटना ही महालक्ष्मी गॅस गोडाऊन परिसरातील उद्यानाजवळ घडली. या दुर्घटनेत 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भिंतीखाली काहीजण अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. यावेळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं.
 
अंबरनाथ शहरात सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबरनाथ पूर्वेतील गॅस गोडाऊन परिसरात असलेल्या उद्यानाच्या संरक्षक भिंतीखालची माती खचली आणि भिंत बाजूलाच असलेल्या बैठ्या घरांवर ही संपूर्ण भिंत कोसळली. या घटनेत पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं. तसंच काही गाड्या देखील भिंतीखाली दबल्याने गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भिंतीचे अवशेष बाजूला करत असतानाच या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण दबले असल्याचं समोर आलं. या दोघांनाही बाहेर काढून तपासलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दुसरीकडे, कल्याणमध्ये जोरदार वाऱ्यामुळे द्वारली गावात दोन झाडे कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका रिक्षासह घराचे नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.