शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (16:52 IST)

नवी मुंबई विमानतळाचा नामकरण वाद : दि.बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्र आक्रमक

Navi Mumbai Airport renaming controversy Bhumiputra is aggressive for Patil's name
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.
 
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्या, या मागणीसाठी समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलनासाठी स्पेशल टि शर्ट आणि मास्क बनविण्यात आले आहेत. आजच्या आंदोलनासाठी नागरिकांमध्ये ते वाटण्यातही आले आहेत. आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हातात दि.बा पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी दि.बा पाटलांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी होत आहे. आंदोलनस्थळी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केलीय. एल्गार स्टेजच्या शेजारीच महिलांनी वडाच्या झाडाला फेरे मारले. यावेळी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव देण्याचं महिलांनी साकडं घातलंय.
 
सरकारला ताकद दाखवू, आंदोलनकर्त्यांचा इशारा
नवी मुंबई पाम बीच रोडवर सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढली आहे. मुंबई, पालघर, विरार, ठाणे वसई या ठिकाणच्या गाड्या गणपतराव तांडेल मैदानाच्या दिशेनं येण्यास सुरवात झाली आहे. आग्री कोळी समाजाला पाठिंबा देण्यासाठी गणेश पाटील आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारला आज समाजाची ताकत दिसेल, त्यानुळे येत्या काळात सरकारने सावध राहावं असा इशारा त्यांनी दिला आहे.
राजकारण्यांमुळे घोळ : राजू पाटील
नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव दिलंच पाहिजे, ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून आमची मुख्य मागणी आहे. पण त्यात काही राजकारणी घोळ घालत आहे. पण आम्ही मात्र यावर ठाम आहोत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण सरकार घाबरलं की पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवते, असे राजू पाटील म्हणाले.
 
बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा आग्रह म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालहट्ट – भाजप
नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण अजिबात करत नाही, परंतु आम्ही स्थानिक भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली. अजय चौधरींच्या एका पत्रावर मुख्यमंत्री कॅन्सरग्रस्तांच्या खोल्यांच्या विषयाला स्थगिती देतात, इथे मात्र इतकं मोठं आंदोलन होऊनही लक्ष देत नाहीत. यावरूनच मुख्यमंत्र्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल किती आस्था आहे हे दिसतं. सध्या जे भूमिपुत्र शिवसेनेत आहेत त्यांना या मुद्द्यावरून दाबलं जातंय. पण ज्यावेळी दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं जाईल. त्यावेळी सर्वात पहिला गुलाल उधळणारे भूमीपुत्रांमधले शिवसैनिक असतील, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.