शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (22:31 IST)

'या' संदर्भातला निर्णय मुख्यमंत्रीच घेणार

देशात करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमानी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर जाण्यासाठी बस, रिक्षा किंवा खासगी वाहने अशा मिळेल त्या मार्गाने मुंबईकरांना कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य मुंबईकरांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबईकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाही.
 
मुंबईतील लोकलमधून लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील यासंदर्भात आपली भूमिका मांडली होती. तसेच, कोविड टास्क फोर्स आणि राज्याच्या आरोग्य विभागाने देखील याला हिरवा कंदील दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. कारण, लसीचे दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांचं नियोजन आणि त्यांनाच प्रवासाची मुभा देणं या गोष्टींच नियोजन हे रेल्वे विभागाला करावं लागणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यावर चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्री मुंबईच्या लोकल प्रवासाविषयी अंतिम निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
“चार महिन्यांपूर्वी लागू केलेल्या निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहेत. आमच्या मंत्र्यांनाही वाटत आहे की ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. रेस्टॉरंटचे तासही वाढवावेत”, अशी भूमिका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मांडली होती.