1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाण्यात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने रिकामं केलं धरण

- मॅटी बुबालो
मोबाईल हरवल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी चक्क धरण रिकामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगढमधील खेरकट्टा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरवलेला आपला मोबाईल शोधण्यासाठी येथील पाणी काढून सोडून देण्यास अधिकाऱ्याने सांगितलं होतं.
 
राजेश विश्वास असं संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असून ते छत्तीसगढच्या राज्य प्रशासनात अन्न प्रशासन अधिकारी होते.
 
धरणासंदर्भात त्यांनी केलेलं कृत्य समोर आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
राजेश विश्वास हे धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात सेल्फी घेत असताना त्यांचा मोबाईल पाण्यात खाली पडला. यानंतर त्यांनी मोबाईल शोधण्यासाठीची मोहीम हाती घेतली.
 
यादरम्यान तब्बल तीन दिवस धरणाचा पाणीसाठा रिकामी करण्यात आला. यानंतर विश्वास यांचा मोबाईल सापडला. पण तोपर्यंत पाण्याने त्यांचा मोबाईल निकामी झाला होता.
 
या मोबाईलमध्ये संवेदनशील सरकारी माहिती होती, ती मिळवणं गरजेचं होतं, असा दावा राजेश विश्वास यांनी केला आहे.
 
पण त्यांच्या या कृत्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
 
राजेश विश्वास यांचा सॅमसंग कंपनीला मोबाईल हा तब्बल 1 लाख रुपये किंमतीचा होता. धरण क्षेत्रात फेरफटका मारताना राजेश यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. पण सेल्फी घेत असताना अचानक मोबाईल पाण्यात पडल्याने राजेश विश्वास यांची पंचाईत झाली.
 
यानंतर स्थानिक गोताखोरांना मोबाईल परत मिळवण्याच्या कामात लावण्यात आलं. पण या कामात त्यांना यश आलं नाही. अखेर पाण्याचा उपसा करणारा पंप मागवण्यात आला. अखेरीस धरण रिकामी करूनच राजेश विश्वास यांना त्यांचा मोबाईल परत मिळवता आला.
 
यासंदर्भात राजेश विश्वास यांनी एक व्हीडिओ जारी करून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
 
या व्हीडिओमध्ये ते म्हणतात, "मी संबंधित अधिकाऱ्याकडून यासाठीची तोंडी परवानगी घेतली होती. काही पाणी काढून शेजारच्या कालव्यात सोडण्यात आलं. खरं तर या कामामुळे शेतकऱ्यांना जास्त पाणी मिळून त्यांचा फायदाच होणार आहे."
 
संबंधित उपसा पंप हा काही दिवस चालू होता. यादरम्यान धरणातून सुमारे 20 लाख लिटर (4 लाख 40 हजार गॅलन) पाण्याचा उपसा झाल्याचा अंदाज आहे. या पाण्यामार्फत जवळपास 6 चौरस किमी जमिनीचं पाणीसिंचन होऊ शकतं.
 
राजेश विश्वास यांचं काम सुरू असताना जलसंपदा विभागातील एका अधिकाऱ्याने याविषयीची तक्रार नोंदवल्यानंतरच हे काम थांबलं.
 
राजेश विश्वास यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. पाणी हे महत्त्वाचं संसाधन आहे. पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय केला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कांकेर जिल्ह्यातील जलसंपदा अधिकारी प्रियांका शुक्ला यांनी दिली.
 
आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप राजेश विश्वास यांनी फेटाळून लावला आहे. आपण उपसा करून सोडून दिलेलं पाणी हे अतिरिक्त होतं. कोणत्याही स्थितीत त्याचा वापर करता आला नसता, असं ते म्हणाले.
 
पण राजेश विश्वास यांच्या या कृतीने जिल्ह्यासह राज्याचं राजकारण पेटलं आहे. येथील विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी या प्रकरणावर टीका केली.
 
ते म्हणाले, या कडक उन्हाळ्यात लोक पाणी मिळवण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. अशा स्थितीत एक अधिकारी 41 लाख लिटर पाणी वाया घालवतो, याला काय म्हणावं. हे पाणी 1500 एकर जमिनीसाठी वापरता आलं असतं."