शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (10:19 IST)

प्रज्ञासिंह ठाकूरांमुळे नवा वाद, त्यांच्या आजवरच्या वादग्रस्त वक्तव्यांचा असा आहे इतिहास

भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी कर्नाटकात ‘भाजी कापायच्या सुरीला धार लावा’ असं वक्तव्य केल्याने एका नवा वाद निर्माण झाला आहे.हिंदू जागरण कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहाद सारखं उत्तर द्या. आपल्या मुलींना सुरक्षित ठेवा.”शिवमोगा येथे हिंदू कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी घरात असलेल्या सुरीला आणखी धार लावावी लागेल.
 
त्या म्हणाल्या, “आपल्या घरात शस्त्रं ठेवा, काही नाही तर भाजी कापण्याच्या सुरीला धार लावा. काय परिस्थिती येईल काही सांगता येत नाही. सगळ्यांना आपल्या सुरक्षेचा अधिकार आहे. आपल्या घरात कोणी आलं आणि हल्ला केला आणि त्याला उत्तर देण्याचा आपल्याला अधिकार आहे.”
 
देशद्रोहाचा खटला दाखल करा- काँग्रेस
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने टीका केली आहे.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की प्रज्ञा ठाकूर जे म्हणाल्या ते देशद्रोही वक्तव्य आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन ते या प्रकरणी कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करणार आहेत.
 
कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे म्हणाले, “एक खासदार अशा प्रकारचं वक्तव्य करतात हे अतिशय दुर्देवी आहे. आधीच त्यांच्यावर कट्टरतावादाचे आरोप आहेत. कर्नाटकात अशा प्रकारचं वातावरण का सहन केलं जात आहे हे समजायला मार्ग नाही. या प्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करू.”
 
मध्य प्रदेश काँग्रेसने ही प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
भाजपाने प्रज्ञा ठाकूर यांची बाजू सावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
भाजप प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले, “आम्ही आमच्या मुलींवर अमानवीय कृत्य होताना पाहिलं आहे. ठाकूर यांचं वक्तव्य कोणत्याही एका धर्माशी निगडीत नव्हतं. सर्व आया-बहिणींना आत्मरक्षणासाठी मानसिक शक्तीबद्दल होतं.”
 
प्रज्ञा ठाकूर यांच्यामुळे भाजप अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
प्रज्ञा ठाकूर आणि मालेगाव स्फोटांमुळे भाजपला कायमच विरोधी पक्षांच्या टीकेला तोंड द्यावं लागतं.
मालेगाव स्फोट आणि प्रज्ञा ठाकूर
29 सप्टेंबर 2008 ला मालेगावातील अंजुमन चौक आणि भीकू चौकाच्या मध्ये शकील गुड्स ट्रान्सपोर्टच्या समोर रात्री 9.35 ला एक स्फोट झाला. त्यात सहा लोकांचा मृत्यू झाला आणि 101 लोक जखमी झाले होते.
 
या स्फोटात एका मोटरसायकलचा वापर करण्यात आला होता. NIA च्या अहवालानुसार ही मोटरसायकल प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती.
 
महाराष्ट्र एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या मोटरसायकलच्या तारा गुजरातच्या सूरत आणि सरतेशेवटी प्रज्ञा ठाकूर यांच्याशी निगडीत होत्या.
 
प्रज्ञा ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्य होत्या.
 
पोलिसांनी पुणे, नाशिक, भोपाळ आणि इंदोर मध्ये तपास केला.
 
लष्कराचे एक अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित आणि सेवानवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक करण्यात आली.
या स्फोटात हिंदुत्ववादी संघटना अभिनव भारत संघटनेचं नाव समोर आलं आणि त्याबरोबर सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडेय यांचं नावही आलं.
 
प्रकरणाची चौकशी आतंकवाद विरोधी पथकाने केली. त्यानंतर NIA कडे चौकशी सोपवण्यात आली. त्या आरोपपत्रात तिचं नाव होतं.
 
मालेगाव स्फोटाची चौकशी आधी 2009 आणि 2011 मध्ये एटीएसने विशेष मकोका कोर्टाने दाखल केलेल्या आरोपात 14 आरोपींचं नाव होतं.
 
NIA ने जेव्हा मे 2016 मध्ये अंतिम अहवाल दिला तेव्हा 10 आरोपींची नावं होती.
 
या आरोपातून त्यांची सुटका करण्यात आली.
 
साध्वी प्रज्ञा यांच्यावर लागलेला मकोका हटवला गेला आणि करकरे यांनी योग्य चौकशी केली नाही असं सांगण्यात आलं.
 
प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती मोटरसायकल
आरोपपत्रात उल्लेख असलेली मोटरसायकल प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. मालेगाव स्फोटाच्या आधी दोन वर्षं आधी कलसांगरा ही बाईक वापरत होते.
 
आरोपपत्रानंतर NIA च्या कोर्टाने प्रज्ञा यांना जामीन मिळाला. मात्र त्यांना दोषमुक्त केलं नाही आणि डिसेंबर 2017 मध्ये दिलेल्या आदेशात त्यांनी सांगितलं की प्रज्ञा आणि पुरोहित यांच्यावर UAPA अंतर्गत खटला दाखल झाला आहे.
 
या आदेशात साध्वी प्रज्ञा आणि पुरोहित यांच्यावरचा मकोका हटवला गेला.
साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासकट सात आरोपींवर UAPA अंतर्गत तयार केलेल्या कायद्याच्या कलम 16 आणि 18, आयपीसीचं कलम 120बी (गुन्हेगारी कट), 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 326 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
 
काही काळाआधी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हायकोर्टात या प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती केली होती.
 
डिसेंबर 2022 महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी त्यांची याचिका परत घेतली
 
प्रज्ञा यांची उमेदवारी, भाजपचा सत्याग्रह
2019 मध्ये भाजपने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं.
 
भोपाळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवर 1989 पासून भाजप जिंकत आलं आहे.
 
ज्यावर्षी भाजपने प्रज्ञा ठाकूर यांना या जागेचं तिकीट दिलं त्यावर्षी काँग्रेसने ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली होती.
 
त्याच्या एक वर्षं आधी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता.
 
जेव्हा मोदी म्हणाले होते,- मनाने माफ करू शकणार नाही
उमेदवारीचा अर्ज भरायच्या आधी पक्षात सामील झाल्यानंतर आक्रमकपणे प्रचार केला, निवडणूक हे एक प्रकारचं धर्मयुद्ध आणि दिग्विजय सिंह कट्टरतावादी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
 
इतकंच नाही या निवडणुकीच्या वेळी नथुराम गोडसे यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
 
‘गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील’ असं ते म्हणाले होतो.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. तरी भाजपने त्यांची उमेदवारी परत घेतली नाही.
 
इतकंच नाही, अमित शाह  यांनी मोदी यांच्याबरोबर घेतलेल्या एकमेव पत्रकार परिषदेत त्यांची पाठराखण केली होती.
 
मात्र पंतप्रधान मोदी यांनी या वक्तव्यावर टीका केली होती. ते म्हणाले, “साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे, ते नक्कीच निषेधार्ह आहे. सभ्य समाजात असं होत नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र मी त्यांना मनाने कधीही माफ करू शकणार नाही.”
 
संसदेतही नथुराम गोडसेंवर केलं होतं वक्तव्य
नथुराम गोडसेंच्या वक्तव्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, आता खासदार झाल्यावरही त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं.
 
2019 च्या नोव्हेंबर मध्ये एसपीजी सुधारणा अधिनियमच्या वेळी डीएमके नेते ए राजा यांनी लोकसभेत नथुराम गोडसेंचा उल्लेख केला.
 
त्यावर प्रज्ञा ठाकूर सदनात उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की, ‘तुम्ही एका देशभक्ताचं उदाहरण देऊ शकत नाही.”
 
त्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
 
भाजपने त्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांना सुरक्षा सल्लागार समितीतून बाहेर केलं होतं.
 
Published By- Priya Dixit