“इथे लोकांचं चालणं कठीण झालंय, तर बुलेट ट्रेन कशाला हवी? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी. जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला.
सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं हे मला अजूनही समजलं नाही, असं म्हणत बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभूंना हटवून गोयल यांना आणल्याची टीका राज यांनी पत्रकार परिषदेत केली. तसंच मोदींइतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिला नाही अशी टीका केली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात येत्या 5 ऑक्टोबरला मुंबईत चर्चगेट स्टेशनच्या मुख्यालयाबाहेर मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरुन या मोर्चाचं नेतृत्त्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होऊन मुंबईकरांनी राग व्यक्त करावा, असं आवाहनही त्यांनी केले आहे.