1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (17:38 IST)

माकडांच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू

माकडांच्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. इथे नाकतिया नदीच्या काठावर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या मुलीवर माकडांच्या कळपाने हल्ला केला .माकडांच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीसोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी ग्रामस्थ व कुटुंबीयांना माहिती दिली. लोक घटनास्थळी पोहोचेपर्यंत माकडांनी मुलीला चांगलेच ओरबाडले होते. जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नर्मदा असे या चिमुकलीचे नाव आहे. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. आता गावातील लोकांना  नदीकडे जायलाही भीती वाटू लागली आहे.
 
बिथरी चैनपूरबिचपुरी गावाजवळ नाकतीया नदी आहे. याच गावातील नंदकिशोर हे मजुरीचे काम करून मुलांचा सांभाळ करतात. त्यांची पत्नी लोकांच्या घरी काम करून कुटुंब चालवण्यास मदत करते. नंदकिशोर व त्यांची पत्नी कामावर गेले असता त्यांची मुलगी नदीकाठावर गावातील मुलांसोबत खेळत होती. दरम्यान, माकडांनी तिच्या वर हल्ला केला. तिच्यासोबत खेळणारी मुलं गावाकडे धावत हे सांगायला गेली, पण नर्मदेला माकडांनी पकडलं. मुलांच्या हाकेवर गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेत लाठ्या-काठ्या मारून माकडांना हुसकावून लावले. रक्ताने माखलेली नर्मदा पाहून त्यांचा थरकाप उडाला. गंभीर अवस्थेत मुलीला घेऊन तातडीने ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र काही वेळातच मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, मुलीला माकडांनी खूप मारले, त्यामुळे तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिला वाचवता आले नाही. निष्पाप नर्मदा तिच्या दोन भावांमध्ये एकटीच होती.
 
मुलीच्या मृत्यूनंतरगावात शोकाला पसरली आहे. गावात माकडांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत माकडाला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेकदा विनंती करूनही उपयोग झाला नाही. गावकऱ्यांच्या पिकांचेही माकडांमुळे नुकसान होत आहे. माकडांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी गावकरी रात्रंदिवस पहारा देतात. या घटनेनंतर त्याच्या मनात अशी भीतीही निर्माण झाली आहे की, आपली मुले शाळेत गेली तर? खोडकर माकडत्यांच्या मुलांवर हल्ला करू शकतात.