गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (09:56 IST)

आम्हाला युद्ध नको शहीद वीरपत्नीने सोशल मीडियावर केली कडाडून टीका

पुलवामा येथील हल्ल्यानंतर आणि एअर स्ट्राईकनंतर सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट करत युद्ध करा असे अनेक संदेशच दिले आहेत. असे करणाऱ्यांना नाशिकमधल्या वीरपत्नीने संदेश दिला आहे. नाशिकचा वैमानिक शहीद निनाद मांडवगणे हा बुधवारी त्याला वीरमरण आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी विजेता निनाद मांडवगणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना विनंती करत जोरदार टीका केली आहे, कृपा करून युद्धाच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नका. तुमच्यात एवढा जोश असेल तर सरळ सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या असं त्यांनी म्हटलं आहे.
 
विजेता म्हणतात की "निनाद हा माझ्या आयुष्याचा, आम्हा सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग होता, मात्र आज तो आमच्या घरातून एक जवान शहीद झाला, उद्या कदाचित दुसऱ्या कोणाच्या तरी घरातून होईल. मात्र आता आम्हाला युद्ध नकोय, युद्धाचे परिणाम किती भीषण होतात हे सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट करणाऱ्यांना काहीच ठाऊक नाही. त्यांनी यासंदर्भातला अनुभव युद्धभूमीवर जाऊन घ्यावा, जोश असेल तर खुशाल सैन्यात सामील व्हा त्यानंतर तुम्हाला कळेल की घरातला माणूस जाण्याचे दुःख काय असते. अशा भावनिक शब्दात निनादच्या पत्नीने तिच्या भावना व्यक्त करत सोशल मिडीयावर अक्कल शिकवणारे यांना चांगलेच झापले आहे. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये २ वैमानिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. श्रीनगरमधील बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या निनाद अनिल मांडवगणे (३३) यांचे पार्थिव गुरुवारी, २८ फेब्रुवारीला रात्री उशिरा ओझर येथील विमानतळावर विशेष विमानाने आणण्यात आले. शुक्रवारी, १ मार्चला सकाळी ९ वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.