रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (15:55 IST)

आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही एवढंच सांगावं : मुनगंटीवार

वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? विदर्भ, मराठवाड्यात महाराष्ट्रातील लोकं राहतात हे लक्षात‌ ठेवावे. विदर्भ, मराठवड्याची जनताही महाराष्ट्राचा भाग आहे. जनतेच्या वतीने डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये यासाठी हात जोडून विनंती करतो. या सभागृहात मला कोरोना होणार नाही म्हणून बसायचं आहे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसायचं आहे? हे ठरवावं. अजित पवार यांनी आश्वासन देऊन ७२ दिवस झाले आहेत. आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही एवढंच सांगावं,” अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. “हे तर मुख्यमंत्र्यांचं आजोळ आहे, नातवाने पेटून उठलं पाहिजे. १० दिवसांचं अधिवेशन एकदम १० नंबरी झालं पाहिजे,” असंही ते म्हणाले.
 
“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावलं.