शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (07:37 IST)

उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या, मार्चचा दुसरा आठवडा पहिल्या आठवड्यापेक्षा उष्ण असणार

राज्यात उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या असून अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
अरबी समुद्रात उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळे आर्द्रतेत वाढ होत आहेत. यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ यासारख्या अनेक शहरात 38 ते 39० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात 39० सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर अकोल्यात आज 39.5० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे विदर्भातील इतर जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ चंद्रपुरात 39.4० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील दिवसा तापमान हे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4-6 डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. तर काही ठिकाणी हे तापमान 40० सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतो. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कोरडे वाऱ्यांमुळे हवेतील आद्रेतेत वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मार्चचा दुसरा आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा उष्ण असणार आहे.