1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (07:24 IST)

सावधान! पुढील ४ ते ५ दिवसात राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा इशारा

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळेच अनेक शहरात कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उन्हाची तीव्रता आणि उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात येत्या ४ ते ५ दिवसात गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, राज्याच्या काही भागात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. त्यात मंगळवारी आणि बुधवारी (५ व ६ एप्रिल) सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा आहे. यासंदर्भात हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवावे, असेही सूचित करण्यात आले आहे.