1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:57 IST)

चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान म्हणजे उच्च दर्जाची मनोरंजन सेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख

भाजपाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सेन्स ऑफ ह्यूमर अतिशय चांगला असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सिलेंडरचे वाढलेले दर आणि अन्नपदार्थांची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे. ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रवक्ते प्रदीप देशमुख  यांनी लगावला आहे. जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर टिका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जमेना म्हणून पवार साहेब मैदानात उतरले असे विधान केले होते. याबाबत बोलताना प्रदिप देशमुख म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचा  प्रयोग यशस्वी झाला असून कैक प्रयत्नांनंतर देखील आघाडीच्या एकजुटीवर आणि सरकारच्या स्थिरतेवर तसूभरही परिणाम होत नाही. यामुळे भाजपाच्या नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातून सावरण्यासाठी ते बेताल व बेलगाम वक्तव्याचा आधार घेत आहेत.
 
ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन व इतर कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे.याचा अर्थ तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जमेना म्हणून मोदी प्रचारात उतरले असा घ्यायचा का?शरद पवार आमचे सर्वोच्च नेते असून कार्यकर्त्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात.
जनतेशी पवार यांचे असणारे हे बॉण्डींगच भाजपाच्या पोटात धडकी भरवणारे आहे.शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेयांच्या नेतृत्वाखाली पुणे  आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवरराष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.