गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:42 IST)

आम्हीही नको ती अंडी उबवली, त्याचं पुढे कायं झालं ते तुम्ही बघत आहात : मुख्यमंत्री

राजकारणात टीकाकार असतात, असलेच पाहिजेत, आम्हीही होतो तुमचे टीकाकार, पवार साहेबांची आणि बाळासाहेबांची मैत्री सर्वशृत आहे, राजकारण असतं पण चांगल्या कामात राजकारण आणू नये, पाठिंबा देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये, असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं, आम्ही सुद्धा उघडलं होतं, 25 - 30 वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली, त्याचं पुढे कायं झालं ते तुम्ही बघत आहात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामती इथल्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. 
 
दिवाळी सुरु झाली आहे, काय काय जण म्हणतायत फटाके फुटणार आहेत, ठिक आहे, फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला. मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला थोडा त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
 
या कार्यक्रमाचं उद्दीष्ट्यचं ते आहे, की तरुणांनी स्वत:च्या पायावर उभं कसं रहायचं, ती दक्षता ही संस्था घेते, म्हटलं मग जायलाच पाहिजे, मुळात पवार साहेबांसारखा एक तरणाबांड नेता, शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितलं की खोटं… सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला… आणि अजूनही थांबायला तयार नाहीत. ही माझी दुसरी खेप आहे बारामतीत येण्याची. याआधी आलेलो तेव्हा शेतीचं प्रदर्शन होतं, आणि आज आधुनिक सगळं
 
पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं करत आहेत. सर्व पवार कुटुंबीय तळमळीने त्यात मनापासून काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, विकासाचा ध्यास, विकास, विकास आणि विकासाच्या पुढे काय तर विकास, अशी स्तुती मुख्यमंत्र्यांनी केली.