1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (07:14 IST)

तब्बल २१ तासानंतर देवळाली-लहवीत रेल्वे मार्ग ‘रुळावर’

railway track
देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर अवघ्या २१ तासांमध्ये रुळ दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरील रेल्वेप्रवास सुरु होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
दरम्यान देवळाली ते लहवीत या मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनिल जयनगर पवन एक्स्प्रेस  चे चार डबे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर पाच प्रवासी जखमी  झाले. रेल्वेतील एलएचबी या जर्मन तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून घसरली तरी डबे एकमेकांवर आदळत नाहीत. ते विलग होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. अधिकचे नुकसान टळते. त्याचाच प्रत्यय नाशिक येथील अपघातात आला.
 
दरम्यान अपघातानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजता रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्याला मिशन २३ असे नाव देण्यात आले. या रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम झाले असून तब्बल ५००कामगारांनी एकत्र येत हे काम फत्ते केले आहे.यासाठी मुंबई, इगतपुरी, कल्याण, नाशिक, भुसावळ येथून या कामगारांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या दिमतीला आठ क्रेन, ५ पोकलॅण्ड, टॉवर वॅगन, गॅस कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन असे साहित्य होते. अपघाताच्या ठिकाणी ३०० मीटर नवा रेल्वे मार्ग टाकण्यात आला. आता या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
 
मात्र, हा अपघात कसा झाला याची चौकशी करण्यासाठी रेल्वे अधिकारी उद्या नाशिकमध्ये येणार असल्याचे समजते. मुंबई सेंट्रल सर्कलचे आयुक्त मनोज अरोरा बुधवारी सकाळी दहा वाजता नाशिकला येतील. ज्या नागरिकांना या अपघाताची माहिती आहे, त्यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.