मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाबाबत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण दिले.
तसेच जरांगे पाटील यांनी असे म्हटले आहे की, हैदराबाद गॅझेटिअर लागू केल्यानंतरही कुणबी प्रमाणपत्रे थांबली आहे, नवीन नियमावलीमुळे गेल्या ३-४ महिन्यांपासून प्रमाणपत्रे मिळत नाहीत आणि स्थानिक चौकशी अहवाल असतानाही प्रक्रिया थांबवली गेली आहे. त्यांनी याबाबत सरकारवर टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली असून फडणवीस म्हणाले की, "जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळते; ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र मागितले, त्यांना ते मिळाले असून सध्या प्रलंबित प्रकरणे अतिशय कमी आहे," असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. तसेच कोणी कुणबी प्रमाणपत्र मागत आहे आणि सरकार ते देत नाही, अशी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही. असे देखील ते म्हणाले.
तसेच महायुती सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आणि ते कार्यान्वयित केले, तेवढे आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने केलेले नसून जरांगे पाटील यांच्या मनात काही शंका असतील तर सरकार संवादाच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढण्यास पूर्णपणे सकारात्मक आहे असे देखील फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
राज्य सरकारने मराठा-कुणबी नोंदी शोधूनही प्रमाणपत्रे दिली नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून "शेवटचे आणि निर्णायक" आंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. तसेच जर २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली नाहीत, तर २९ ऑगस्टला संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
Edited By- Dhanashri Naik
