गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (21:03 IST)

उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास मातोश्रीवर चर्चेसाठी नक्की जाऊ; ही आहे अट

raut shinde uddhav
सत्तापरिवर्तनानंतर आता एकनाथ शिंदे गटाने ‘मातोश्री’वर सलोख्याची भाषा सुरू केली आहे. त्याची सुरुवात सर्वप्रथम आमदार संजय राठोड यांच्या वक्तव्याने झाली. त्यानंतर सुहास कांदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचाही दृष्टिकोन बदलला आहे. बंडखोरांनी उद्धव ठाकरेंबद्दल आदर व्यक्त केला आहे, पण त्यांना संजय राऊत आवडत नाहीत. शिंदे गटाने तर राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एजंट म्हटले आहे.
 
आमदार संजय राठोड म्हणाले की, ‘मातोश्री’चे दरवाजे आमच्यासाठी पुन्हा उघडले तर आम्ही नक्की ‘घरी परतू’. त्यानंतर आमदार सुहास कांदे आणि दीपक केसरकर यांनी आज तशीच वृत्ती दाखवली आहे. आमदारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या बंडखोरांमध्ये समेट सुरू आहे की काय, अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कोणत्याही चर्चेसाठी उद्धव ठाकरेंसमोर अट ठेवली आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली तर नक्कीच मातोश्रीवर जाऊ, असे केसरकर यांनी म्हटले आहे. मात्र आपण थेट उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. त्यांनी या चर्चेदरम्यान आजूबाजूच्या लोकांना दूर ठेवावे. याशिवाय आता आम्ही भाजपसोबत असल्याने उद्धव ठाकरे यांनाही त्यांच्याशी बोलावे लागेल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
“आम्ही भाजपसोबत सत्तेत आलो आहोत आणि एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. आता या कुटुंबात परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावल्यावर त्यांनाही भाजपशी बोलावे लागेल. हे एखाद्या प्रेम विवाहासारखे आहे. आता या जोडप्याला पुन्हा घरी यायचे असेल तर आधी घरच्या प्रमुखांना एकमेकांशी बोलावे लागेल, असे केसरकर यांनी सांगितले.
 
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास मातोश्रीवर चर्चेसाठी नक्की जाऊ, असे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनीही म्हटले आहे. उद्धव साहेबांनी आम्हाला फोन करून मातोश्रीवर बोलावावे, अशी आमची इच्छा आहे. मला मातोश्रीवरून फोन आला तर मी नक्की जाईन, पण मी एकटा जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केल्यास आम्ही सर्वजण एकत्र मातोश्रीवर जाऊ, असे कांदे म्हणाले.