1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (10:29 IST)

मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रामध्येच, अभिजात दर्जाच्या मुद्द्यावरून राऊतांचा भाजपवर हल्ला

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून टीका केली आहे. मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच असल्याचं राऊत यांनी या माध्यमातून म्हटलं आहे.
 
"मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्यावर पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे हे या शत्रूंना मान्य नाही. मुंबई-ठाण्यात मराठी माणसाचा टक्का घसरला. पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडपर्यंत ही घसरण झाली. नागपूरसारखी शहरं हिंदीची शाल पांघरून आहेत. त्यामुळं मराठी भाषेचं भवितव्य काय हा प्रश्न पडतो," असंही राऊत म्हणाले.
 
महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी भेटून मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली. पण मंत्र्यांनी केवळ आश्वासन दिलं, असंही राऊत म्हणाले.
 
या मुद्द्यावरून राऊतांनी भाजपवरही हल्ला चढवला. भाजप मुंबई मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मराठी कट्टा राबवत आहेत. पण त्यांचेच लोक मराठी पाट्यांच्या मुद्द्याला विरोध करतात. शाळांत मराठी सक्तीची नको म्हणून सोमय्यांसारखे लोक न्यायालयात जातात, असं राऊत म्हणाले.
 
बेळगावात मराठी माणसावर अत्याचार होत असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतील. पण भाजप नेते मूग गिळून गप्प बसतील. हा त्यांचा वैचारिक गोंधळ आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.