गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:25 IST)

“सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले,” गुलाबराव पाटलांची सभेत जोरदार फटकेबाजी

शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले अशी टीका करताना यावेळी त्यांनी आक्षेपार्ह भाषाही वापरली. “सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात,” असं वक्तव्य त्यांनी केलं. सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी ईडीच्या कारवाईंवरुनही टीका केली. “आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणूनच ५० हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की ईडीची चौकशी लावली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. “आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे एवढं लक्षात ठेवा. बोकडाला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचं मरण ईडी ठरवणार आहे का?,” असा सवालही यावेळी त्यांनी केला.
 
गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत असताना त्यांना विना लायसन्सचा ड्रायव्हर म्हणलं. “कोणतीही गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागते. किंवा कोणतंही काम कऱण्यासाठी त्यासाठी तुम्ही पात्र असल्याचं प्रमाणपत्र लागतं. मात्र, सरकार चालवण्यासाठी शरद पवारांनी विना परवान्याचा चालक बसवला. उद्धव ठाकरे चालक, अजितदादा कंडक्टर, बाळासाहेब थोरात प्रवासी…ड्रायव्हर अ‌ॅक्सिडंट करेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट बसवलं. मात्र, कितीही संकटं आली तरी दोन वर्षे झालं तरी आमची तीन लोकांची गाडी सुसाट चालली आहे,” असं ते म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त केला.