शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:02 IST)

भाजपशी संबंधित व्यक्तीला एनसीबीनं सोडून दिलं, क्रूझ कारवाई प्रकरणी मलिकांचा आरोप

मुंबईत क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकत अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) केलेल्या कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये वाढ झाली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत एनसीबीवर या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं अटक केलेल्यांपैकी तिघांना सोडून दिलं. त्यात भाजप नेत्याच्या मेहुण्याचा समावेश होता असा आरोप त्यांनी केला आहे.

आर्यन खानला पार्टीसाठी क्रूझवर ज्यांनी आमंत्रित केलं त्यांनाच नंतर सोडण्यात आलं. हा आर्यन खानला अडकवण्याचा डाव होता असा आरोपही त्यांनी केला आहे. या माध्यमातून बॉलिवूडसह, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचही ते म्हणाले.

ही कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले. त्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणीही मलिक यांनी केली
 
दरम्यान, एनसीबीनं ज्यांना सोडलं त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक नीकटवर्तीय होता, असं प्रत्युत्तर नवाब मलिकांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
 
एनसीबीनं ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले त्यांना अटक केली आणि ज्यांच्या विरोधात काहीही पुरावे आढळले नाहीत, त्यांना सोडलं असंही फडणवीस म्हणाले.