1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (19:32 IST)

देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर टीका : कोण होतास तू… काय झालास तू

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातली वसुली, नक्षलवाद, दंगल या सगळ्या विषयांवर फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.
 
संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात दंगल भाजपमुळे झाली.. आज मला ते गाणं आठवतं आहे, कोण होतास तू? काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल त्यांनी केला.
 
सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग आहे. या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जहरी टीका फडणवीस यांनी केली.
 
अमरावतीमध्ये जवानांच्या सात कंपन्या होत्या. मोर्चा निघाला. तोडफोड झाली. मात्र, पहिल्यांदा त्यांना आदेशच आला नाही. त्यानंतर आदेश दिला त्यावेळी त्या कंपन्यांवर हल्ला. हा पॅटर्न समजून घ्या. जवानांवर अचानक टोकदार गोटे फेकण्यात आले. हे दगड जमा करून ठेवलेले नव्हते, तर ते आले कसे, असा सवाल त्यांनी केला. पोलिस आणि जवानांवर हल्ला केल्यानंतर एका माणसालाही अटक नाही. या पोलिसांवर ठरवून हल्ला केला. हा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. नरेंद्र मोदी यांच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून लोकांमध्ये कन्फ्यूजन तयार करा. आजूबाजूच्या राज्यातल्या लोकांना त्यात ओढा, असा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्री आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच मंत्री नवाब मलिक आणि फडणवीस यांच्यात अंडरवर्ल्ड कनेक्शनवरून एकमेकांवर आरोप केले गेले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कुणाचेही थेट नाव न घेता सूचक शब्दांत महाविकास आघाडीवर तोफ डागली.