शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 मे 2021 (11:59 IST)

पंढरपूर पोटनिवडणूक मतमोजणी: समाधान आवताडे यांची मुसंडी, 18व्या फेरीअखेर 4100 मतांनी आघाडीवर

पंढरपूर पोटनिवडणुकीचं मतमोजणी सध्या चुरशीने सुरू असून 18व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 4100 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
 
सोळाव्या फेरीअखेर आवताडे यांना 45834 मतं मिळवली असून भालके यांना 40893 मतं मिळाली आहेत.
 
पंढरपूरमध्ये पहिल्या फेरीअखेर भालके आघाडीवर होते. पण नंतर आवताडे यांनी मुसंडी मारली. दोन्ही उमेदवारांच्या मतांमधील अंतर अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीत भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या सहा फेऱ्यांची मतमोजणी होईपर्यंत भालके आवताडे यांच्यापेक्षा पुढे होते. पण भालके यांच्या मतांची आघाडी शंभर-दोनशेच्याच घरात होती.
 
पण, सहाव्या फेरीनंतर समाधान आवताडे यांनी मतमोजणीत मुसंडी घेतली.
 
सहाव्या फेरीपासून आवताडे हेच आघाडीवर असून अद्याप त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
 
दहाव्या-अकराव्या फेरीदरम्यान आवताडे यांची आघाडी अडीच हजारांपर्यंत गेली होती. पण तेराव्या फेरीअखेरीस ते 1035 मतांनी पुढे आहेत.
 
पंढरपूर मतदारसंघात भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यातच थेट लढत होत असून त्यांच्यातील मतांचं अंतरही सुरुवातीपासून अत्यंत कमी आहे.
 
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे पुढील फेऱ्यांकडे सर्वांचं लक्ष असेल.
 
आतापर्यंत झालेली मतमोजणी ही पंढरपूर शहर परिसरातील होती.
 
पुढील फेऱ्यांमध्ये मंगळवेढा शहर तसंच ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे.
 
मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांचा चांगला प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे इथं ते किती मतं घेतात याकडे लक्ष असेल.
 
त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांचा कौल कुणाला मिळतो, त्यानुसार या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.
 
महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
 
संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.
 
या पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्यात आहे.
 
भगीरथ भालके यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला असला, तरी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. भारत भालकेंचा जनसंपर्क भगीरथ यांच्या कामी येण्याचा अंदाज आहे.
 
पण दुसरीकडे समाधान आवताडे यांचा स्वतःचा जनसंपर्क चांगला असल्याचं मानलं जातं. पंढरपुरातल्या सुधारक परिचारक यांच्या गटाने त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. यामुळेच ही लढत अटीतटीची मानली जातेय.