शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 8 जानेवारी 2020 (13:31 IST)

फडणवीस-राज यांची गुप्त भेट; नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?

शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेसराष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने राज्यात नवीन समीकरण निर्माण झालेले असतानाच आता भाजप आणि मनसेची जवळीक वाढू लागल्याने आणखी एक राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाली असून या दोघांनी दीड तास चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार असल्याचे संकेत मिळत असून ही राजकीय भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
 
प्रभादेवीच्या हॉटेल इंडियाबुल्स स्कायमध्ये ही गुप्त भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांसोबत एकही सहकारी आणि सुरक्षा रक्षक नव्हता. हॉटेलच्या मागच्या  दाराने राज यांनी प्रवेश केला. त्यानंतर काही वेळाने फडणवीस यांनी पुढील दरवाजातून प्रवेश केला. या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. यावेळी राज आणि फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हेच उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल, असे सूत्रांनी सांगितले.

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बॅनर्सवर राज ठाकरे यांचे फोटो झळकले होते. आता राज-फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे येत्या  23 जानेवारी रोजी होणार्‍या मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात राज हे भाजपसोबत युती करण्याचे संकेत देण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितले. 
 
शिवसेना आणि भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक युती करून लढवली होती. मात्र विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने काँग्रेसराष्ट्रवादीसोबत महाआघाडी करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज्यात झालेल्या अनेक जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला. जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने साथ सोडल्याने राज्यात भाजपची पीछेहाट सुरू झाल्याने भाजपला सर्वांना अपील
असलेल्या मित्रपक्षाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज-फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व आल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.