1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (08:06 IST)

अब्दुल सत्तारांनी राडा करत मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली

abdul sattar
मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत अब्दुल सत्तारांनी राडा करत मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीमुळे सरकारमध्ये नाराजी असताना, आता सत्तार यांच्या या वागणुकीमुळे शिंदे गटाची आणि सरकारच्या प्रतिमेला तडा बसला आहे. याआधीदेखील भाजप नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. सत्तार यांच्या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नाराज झाले आहेत. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ करणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकारानंतर सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठक अर्धवट सोडून निघून गेले.
 
शिंदे – फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले असून, या १०० दिवसांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मंत्री आणि आमदारांवर सोपवण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आज निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांचा पर्याय देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शिंदे गटाकडून आपल्या नावात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही समावेश करण्याची शक्यता आहे.
 
याप्रकरणावर सत्तार म्हणाले…
अखेर या प्रकरणावर सत्तार यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, कालच्या बैठकीत मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नाही. ही फेक न्यूज आहे. मला राजकारणात ४० वर्ष झाली आहेत. मी असे का वागेन असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत मतदार संघातील कामांबाबत आम्ही चर्चा करत होतो. काही कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे पूर्वीच्या कामाला स्थगिती द्या. मात्र आताच्या कामाला स्थगिती देऊ नका, असे मत मी व्यक्त केले. तसेच. या बैठकीतून केवळ मीच नव्हे तर इतरही काही मंत्री निघून गेले. कामा संदर्भात बैठक झाल्यानंतर एका रुग्णाला पाहण्यासाठी जायचे होते. त्यामुळे मी वर्षा बंगल्यामधून बाहेर पडलो, असेही सत्तार यांनी सांगितले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor