गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (09:26 IST)

मतमोजणी काळात एकच चर्चा, नगर अर्बनच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी ; चिठ्ठीतील लिहला असा काही मजकूर

अहमदनगर अर्बनच्या मतपेटीत सापडलेली एक चिठ्ठी मतमोजणी काळात चर्चेचा विषय ठरली.मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीतील मजकूर असा… ‘सहकार पॅनल’ आजपर्यंत सुवालालजी गुंदेचामुळे आपल्या पॅनलला कायम मतदान करत आलो.अर्बन बँकेने आजपर्यंत अनेक जणांना आर्थिक आधार दिला. इतक्या वैभवशाली बँकेवर प्रशासक येण्याची नामुष्की आली ती आपल्या कार्यकाळातच आली. प्रशासक कधी येतो हे न समजण्याइतके सभासद भोळे नाहीत.
नियतीने तुम्हाला आणि बँकेच्या भविष्याला आणखी एक संधी दिली आहे. पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठीच्या संधीचे सोने करुन आपण बँकेला वाचवाल अशी अपेक्षा बाळगतो.यावेळी आपण मागे झालेल्या चुका पुन्हा करणार नाहीत अशी आशा बाळगतो.
राजकारण आणि बँक वेगळी ठेवा. बँक ही आर्थिक संस्था आहे. राजकीय पक्ष नाही. बँक वाचवायची असेल तर अशोकभाऊ कटारियासारख्या माणसाला बँक पुन्हा जागेवर येईपर्यंत चेअरमन करा. तरच बँकेची वसुली शक्य आहे. सुरुवातीपासून बँकेबरोबर असणाऱ्या खातेदार, कर्जदार, ठेवीदार यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बँकेवर संचालक म्हणून निवडून जाणे हा काय फक्त प्रतिष्ठेचा विषय नाही. हा एक जबाबदारीचा विषय आहे. ज्या संचालकांनी सुचविलेली प्रकरणे थकीत असल्यास त्यांनी जबाबदारीने वसुल करुन बँकेला वाचवावे. नियती कायम संधी देत नाही. मी काही राजकारणी नाही. पण अर्बन बँक ही माझी आर्थिक माता आहे. म्हणून तळमळीने आपणास हे सर्व सांगत आहे. फक्त हजेरगिरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर बसवण्यापेक्षा त्या पदाच्या लायक असणाऱ्या व क्वालीटी (गुणवत्ता) असणाऱ्या व्यक्तीलाच महत्त्वाच्या पदांवर बसवा. म्हणजे बँकेवर पुन्हा ही वेळ येणार नाही, अशी चिठ्ठी या अज्ञात मतदाराने मतपेटीत टाकली होती.