शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (16:35 IST)

हा तर राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे : संजय राऊत

“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोणीही काही बोलण्यापूर्वी भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही. परंतु महाराष्ट्राचा मुंबईचा अपमान सहन केला जाणार नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचं कृत्य अत्यंत गंभीर आहे,” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं. महाराष्ट्राबद्दल कोणी असं गंभीर वक्तव्य करत असेल तर तो केवळ एखाद्या पक्षाचा विषय राहत नाही. तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय होत असल्याचे ते म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
 
“भाजपाच्या काही नेत्यांच्या भूमिकांबद्दलही वाचन केलं. आशिष शेलारही म्हणाले कंगना राणौत यांनी मुंबईला अक्कल शिकवण्याची गरज नाही. त्यांनी हे अधिक जोरात बोललं पाहिजे. महाराष्ट्र हा त्यांचाही आहे. तेदेखील महाराष्ट्रात राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एकाचे नाही. ते महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे टीपण्णी करत असेल तर तो विषय एखाद्या पक्षाचा शिवसेनेचा राहत नाही. तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे,” असंही राऊत म्हणाले.