1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:43 IST)

आंबा घाटात भीषण अपघात, ४०० फूट खोल दरीत गाडी कोसळली

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील गायमुखजवळ सांगलीवरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला. रस्त्याचा अंदाज न आल्याने कठडा नसल्यामुळे KA 32 Z 0949 क्रमांकाची किया सँल्टोस गाडी खोल दरीत गेली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याचप्रमाणे साखरपा व आंबा येथील स्थानिक तरुण मदतीसाठी पुढे सरसावले. खोल दरी व जंगल असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. मात्र मोठ्या जिगरिने खोल दरीत गाडी कोसळलेल्या ठिकाणी हे तरुण पोहचले. यावेळी शिवांश हरकुडे (२ महिने), सृष्टी संतोष हरकुडे(३२) यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी २ महिनाच्या बाळाचा मृतदेह पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. या अपघातात संतोष हरकुडे, दीप्ती फुलारे, प्रताप तपस्ते, रेयान सुभेदार, आद्या फुळारे, तन्मिना हरकुडे हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
 
घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सुहास थोरात यांनी घटनास्थळी पाहणी केली. अपघातग्रस्त झालेले कुटुंबीय सांगली विश्रामबाग येथील असून देवदर्शनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी निघाले होते. मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडला असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला. काही महिन्यापूर्वी स्विफ्ट गाडीचा अपघात घडला होता यामध्ये एका वृद्धाला यात जीव गमवावा लागला होता. मात्र त्यावेळी पोलीस विभाग यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.