मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (15:44 IST)

जो काही बंद आहे तो केवळ भीतीने : चंद्रकांत पाटील

लखीमपुर खीरी येथील आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परंतु महाराष्ट्र बंद हा फसलेला आहे. आज जो काही बंद आहे तो केवळ भीतीने असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लखीमपुर खीरी प्रकरण दुर्दैवी आहे. त्याची चौकशी सुरु आहे. परंतु महाराष्ट्र बंदची हाक देणं हे न कळणारे असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र बंदवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. लखीमपुरमध्ये घडलेल्या घटनेपासून भाजपच्या विरोधकांनी हा विषय प्रचंड लावून धरला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु त्या घटनेची कारवाई होऊ शकते. त्या घटनेचा भाजप, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील सरकारशी काय संबंध आहे. हे माहिती नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी होईल, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. परंतु महाराष्ट्र बंदची हाक देणं हे न कळणारे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आजचा महाराष्ट्र बंद हा पुर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने पाळण्यात आला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
 
कोल्हापुरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की शिवसेना स्टाईलने बंद करा. म्हणजे यांच्यामध्ये काहीच ताकद नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत आहे की, हे तुमच्या जीवावर मोठे होत आहेत. यांच्याकडे लोकं नाहीत बंद करायला तेवढा धाकही नाही. शिवसेनेकडून बंद म्हटल्यावर लोकं घाबरतात असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.