1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (10:24 IST)

यवतमाळ : शिकाऊ डॉक्टरच्या हत्येप्रकरणी 3 जणांना अटक

यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरच्या हत्येच्या घटनेप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
 
यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टर अशोल पाल यांच्यावर महाविद्यालय परिसरातील ग्रंथालयातून वसतीगृहकडे जाताना हल्ला करण्यात आला होता. काही तरुणांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
 
या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आक्रमक झाले होते. या विद्यार्थ्यांनी आणि परीक्षाविधीन डॉक्टरांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन सुरू केलं होते.
 
या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी दोन संशयीत आरोपींना अटक केली होती. अधिक तपास केल्यानंतर आज पोलिसांनी ऋषीकेश गुलाबराव सवळे (23), प्रविण संजीव गुंडजवार (24) आणि एक बालक यांना ताब्यात घेतलं आणि सखोल विचारपूस केली. त्यानंतर या तिघांनी खुनाच्या गुन्हयाची कबुली दिली आहे.
 
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे तीन जण मोटार सायकलवरुन जात असताना अशोक पाल यास धक्का लागल्याच्या कारणांवरुन त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं पर्यवसन भांडणात झालं.
 
त्यानंतर या तिघांनी पाल यांच्या छातीवर आणि पोटाच्या खाली चाकूनं वार केले आणि ते घटनास्थळावरुन पळून गेले.
 
या आरोपीतांकडून गुन्हयात वापरलेले हत्यार व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
प्रभारी अधिष्ठातांचा राजीनामा
या घटनेनंतर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता मिलिंद कांबळे राजीनामा दिला आहे. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या हत्येच्या अनुषंगाने राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
 
मात्र, इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं मार्डच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. अशोक पाल यांना न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील, असं संघटनेचे सदस्य डॉ. प्रेमळ नवरंगे म्हणाले होते.
 
त्याचबरोबर विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी डॉक्टरही संपावर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर परवापासून सेंट्रल मार्डचे महाराष्ट्रातील शासकीय डॉक्टर संपावर जातील, असाही इशारा देण्यात आला होता.
 
अद्याप आरोपपत्र नाही
अटक करण्यात आलेले आरोपी संशयीत आहेत. अद्याप त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. त्यामुळं मारेकऱ्यांना अटक करेपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. तसंच या प्रकरणासाठी महाविद्यालय प्रशासन जबाबदार असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
यापूर्वी कॉलेज प्रशासनास तसंच पोलीस प्रशासनाकडेही वारंवार मागण्या आणि तक्रारी केल्या. तरीही त्याकडं दुर्लक्ष करुन दखल घेतली गेली नसल्याचं, आंदोलकांचं म्हणणं आहे.
 
'मार्ड' संघटनेच्या मागण्या
1) अशोक पाल यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि जलदगती न्यायालयामार्फत डॉ. अशोक पाल यांना लवकरात लवकर न्याय मिळावा.
 
2) डॉ. अशोक पाल गरीब आणि होतकरू विद्यार्थी होते. शिवाय घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असल्यानं कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम (Compensation) देण्यात यावी. (राज्य सरकार आणि महाविद्यालय प्रशासनाकडून)
 
3) अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कॉम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईट, सुरक्षा रक्षक, सी. सी. टीव्ही कॅमेरे (नाईट व्हीजन), कॅम्पसमध्ये वाढलेले गवत आणि झाडंझुडपं यांची कापणी या उपाययोजना तत्काळ कराव्या. महाविद्यालय परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून, किमान उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
4) हॉस्पिटल अणि कॉलेज कॅम्पसमधील निवासी भाग वेगळे करणे, कॅम्पसच्या निवासी भागात कोणत्याही बाहेरील अनोळखी व्यक्तींना चौकशी शिवाय प्रवेश देऊ नये.
 
5) सर्व वार्डातील डॉक्टरांच्या रूममध्ये तातडीची दुरूस्ती करणे तसंच अपघातातील सर्व पुरूष आणि महिला डॉक्टरांसाठी स्वतंत्र आणि मुलभूत आणि अद्ययावत सोईसुविधायुक्त रूम असाव्यात.
 
6) वर्ग 1 ते 4 कर्मच्याऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या.
 
7) जुने आणि नवीन पद्युत्तर विद्यार्थ्यांचं तसंच पदविधर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक वसतीगृहामध्ये स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक (म.सु.ब.) यांची नेमणूक करण्यात यावी. तसंच वसतीगृह प्रमुखांकडून साप्ताहिक कामकाजाचा अहवाल मागविण्यात यावा. अहवालानुसार आवश्यक त्यावेळीच कार्यवाही करण्यात यावी.
 
8) महाविद्यालय परीसरामध्ये उपलब्ध असलेल्या मुलींचे, मुलांचे आणि पदयुत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहामध्ये जीवनरक्षक औषधी आणि साहित्य उपकरणे यांची उपलब्धता करून देण्यात यावी.
 
9) क्ष-किरणशास्त्र विभागांतर्गत असलेल्या क्ष-किरण उपकरणे तसंच सोनोग्राफी मशीन आणि सी. टी. स्कॅन सर्व नियमित आण अविरत कार्यरत ठेवण्यात याव्यात.
 
10) डॉ. मिलिंद कांबळे यांना अधिष्ठाता पदावरून बाजुला करावे आणि त्यांना नियुक्ती देण्यात येऊ नये. त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.
 
अशा मागण्या मार्डच्या वतीने करण्यात आल्या असून, अद्याप या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही.