शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (11:07 IST)

शिक्षकदिन: नरेंद्र मोदी यांनी केलं सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं स्मरण

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा व्हीडिओ शेअर करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.
 
राधाकृष्णन यांनी आयुष्यात अनेक पदं भूषवली पण त्यांनी आपली ओळख शिक्षक म्हणूनच जपली असं मोदींनी म्हटलं. चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधल्या विद्यार्थी सदैव जीवंत असतो अशी राधाकृष्णन यांची शिकवण होती. असं मोदी म्हणाले.
 
 शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो असं मोदी म्हणाले.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
 
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला.
 
2. तिरुत्तानी गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1093 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता.
 
3. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
 
4. त्यांचा वेदांचा विशेष अभ्यास होता. तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
 
5. 1909 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं. म्हैसूर इथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं.
 
6. 35व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या 'चेअर ऑफ फिलॉसॉफी' या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला.
 
7. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं. ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते.
 
8. राधाकृष्णन यांनी आंध्र तसंच बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलं.
 
9. 1931 ते 1939 या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.
 
10. 1949 ते 1952 या कालावधीत ते रशियात भारताचे राजदूत होते.
 
11. रशियाहून परतल्यानंतर राधाकृष्णन यांनी 1952 ते 19652 या कालावधीत उपराष्ट्रपतीपद भूषवलं. 14 मे 1962 रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले.
 
12. 1954 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
13. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी 16 वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा मानांकन मिळालं होतं.
 
14. माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा असे विचार सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असताना मांडले होते. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
 
15. 17 मे 1975 रोजी त्यांचं निधन झालं.