बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (20:32 IST)

दीप सिद्धू कोण आहे, जो लाल किल्ल्यावरील घटनेनंतर चर्चेत आहे

सरबजीत सिंह धालीवाल आणि सुनील कटारिया
बीबीसी प्रतिनिधी
26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनातील एक गट शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसाठी नियोजित मार्गावरून न जाता लाल किल्ल्याावर धडकला. लाल किल्ल्यावर त्यांनी निशान साहिब (शिखांचा पारंपरिक केशरी झेंडा) आणि शेतकऱ्यांचा हिरवा-पिवळा ध्वज फडकवला.
 
हे घडत असताना दीप सिद्धू तिथे होते आणि ते व्हीडिओ शूट करत होते. तेव्हापासून दीप सिद्धू चर्चेत आहेत. शेतकरी आंदोलनात दीप सिद्धूंचा सहभाग, राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील लोकांसोबतच्या त्यांच्या संबंधांवर एक दृष्टीक्षेप टाकूया.
 
सप्टेंबर 2020 पासून दीप सिद्धू शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आणि बघता बघता त्यांनी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं. दीप सिद्धू इंग्रजीत पोलिसांशी वाद घालत असल्याचा एक व्हीडिओसुद्धा व्हायरल झाला होता.
 
या व्हीडिओमध्ये ते म्हणत होते, "ही क्रांती आहे. मुद्द्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नसेल तर ही क्रांती हा देश आणि दक्षिण आशियाचं भू-राजकारण बदलून टाकेल."
 
या व्हीडिओनंतर राष्ट्रीय मीडियाने दीप सिद्धूची दखल घेतली. शेतकरी संघटनांनी दीप सिद्धूपासून स्वतःला दूर केलं, त्यावेळीसु्द्धा बरीच चर्चा झाली होती.
 
सामाजिक कार्यकर्त्या आणि व्यवसायाने वकील असणाऱ्या सिरमजीत कौर सिंग यांनी शेतकरी संघटनांच्या या निर्णयाचं समर्थन केलं आणि त्याची कारणंही सांगितली.
 
शेतकरी आंदोलनात दीप सिद्धू आणि नेत्यांचा कल

शेतकरी आंदोलन सुरू झालं त्यावेळी दीप सिद्धूससह सर्वांचं म्हणणं होतं की ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकरी नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली (संघटनांच्या बॅनरखाली) या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
 
मात्र, काही दिवसांनंतर दीप सिद्धू यांनी शेतकरी नेत्यांच्या निर्णयावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि सिंघू बॉर्डरवर स्वतःचा गट तयार केला.
 
मात्र, त्यांची बहुतांश भाषणं ही तीन कृषी कायद्यांपेक्षा भारतीय राज्यघटनेतील बिगर-संघीय रचनेविषयी होती. ते कृषी कायद्यांविरोधात बोलत नसल्याने शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवरच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं भाषण थांबवलं होतं.
 
या शेतकरी संघटनांपैकी उगराहा गटाने सिद्धू शेतकरी आंदोलनाची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट आरोप केले होते. दीप सिद्धू त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जनरैल सिंह भिंद्रनवाले यांच्याविषयी पोस्ट करत असतात. याच कारणामुळे शेतकरी संघटनांनी त्यांच्यापासून फारकत घेतली.
 
शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवर जाण्याचं आवाहन केलं त्यावेळी दीप सिद्धू यांनी लोकांना माघारी येण्याचं आवाहन केलं होतं. शेतकरी संघटना स्वतःच्या हितासाठी त्यांचा वापर करत असल्याचं दीप सिद्धूचं म्हणणं होतं.
 
26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीच्या घोषणेनंतर दीप सिद्धू पुन्हा एकदा सक्रीय झाले आणि या रॅलीसाठी लोकांना एकत्र करायला सुरुवात केली. मात्र, हे लोक दिल्लीच्या आउटर रिंगरोडवरच्या रॅलीसाठी आले होते.
 
दरम्यान, किसान मजदूर संघर्ष समिती आणि डावी भारतीय किसान यूनियन (क्रांतीकारी) यांनी ठरल्याप्रमाणे दिल्लीच्या आउटर रिंगरोडवर रॅली करणार असल्याचं सांगितलं.
 
यामुळे दीप सिद्धू यांना संयुक्त किसान मोर्चाने पोलिसांसोबत चर्चा करून जो मार्ग ठरवला होता त्यापासून वेगळ्या मार्गावर जाण्याची संधी मिळाली.
 
सोमवारी सिंघू सीमेवरच्या मुख्य व्यासपीठावरून आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करताना आपण दिल्लीत जाऊ आणि निश्चित करण्यात आलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने जाऊ, असं दीप सिद्धू आणि लक्खा सिधाना यांनी म्हटलं.
 
यानंतर मंगळवारी आंदोलक शेतकऱ्यांचा एक गट लाल किल्ल्यावर धडकला आणि तिथेच दीप सिद्धू दिसले. आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यात ज्या ठिकाणी स्वतःचे झेंडे फडकावले त्याच ठिकाणी दीप सिद्धू हजर होते आणि तिथेच ते स्वतःचा व्हीडिओ बनवत होते.
 
दीप सिद्धूंचं स्पष्टीकरण

दीप सिद्धू यांनी लाल किल्ल्याच्या घटनेनंतर 26 जानेवारी रोजी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं.
ते म्हणाले, "आम्ही कुठलाच झेंडा उतरवला नाही. आम्ही आमचा 'निशान साहीब' आणि 'किसान मजदूर एकता' यांचे झेंडे तिथे लावले. ही केवळ माझी एकट्याची कारवाई नव्हे तर तिथे उपस्थित सर्वांचाच संताप होता. मी कुणालाच पुढे घेऊन गेलो नाही. सगळं आवेशात घडलं. कुणालाही भडकवलं नव्हतं."
 
कौटुंबिक पार्श्वभूमी


पंजाबमधल्या मुक्तेसर साहिब जिल्ह्यातील उदेकरण हे दीप सिद्धूंचं मूळ गाव. दीप सिद्धू यांचे वडील सरदार सूरजित सिंह वकील होते आणि आम्ही सहा भावंडं होतो, असं दीप यांच्या भटिंडामध्ये राहणाऱ्या काकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"सूरजित सिंह यांना तीन मुलं आहेत. यापैकी नवदीप सिंह कॅनडात आहे. मनदीप कायद्याचं शिक्षण घेतोय आणि दीप दिल्लीत शेतकरी आंदोलनात सहभागी आहे."
 
आमचं कुटुंब शेती करत असल्याचं दीप सिंह यांचे काका बिधी सिंह सांगतात. मात्र, दीप यांचे वडील सूरजित सिंह लुधियानात वकील होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाल्याचंही बिधी सिंह यांनी सांगितलं.
 
दीपविषयी सांगताना बिधी सिंह म्हणाले, "तो कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेला होता. त्यानंतर तो मुंबईत स्थायिक झाला. तिथेच त्याने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं."
 
दीप मुंबईत चांगलाच स्थिरावला होता, असंही बिधी सिंह सांगतात. दीपने सुरुवातीला बालाजी फिल्म्ससाठी वकील म्हणून काम केलं. पुढे हळूहळू तो देओल कुटुंबाच्या जवळ गेला आणि तिथूनच त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाल्याचंही बिधी सिंह सांगतात.
 
दीप यांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगीही आहे.
 
देओल कुटुंबाशी जवळचे संबंध असल्यामुळेच सनी देओलने गुरुदासपूरहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दीपने त्यांना पूर्ण मदत केल्याचं बिधी सिंह यांचं म्हणणं आहे.
 
पण लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेविषयी मीडियातूनच कळल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
दीप सिद्धू यांचा अभियन प्रवास

गीतकार असलेले अमरदीप सिंह 2017 साली फिल्मकार बनले आणि त्यांनी 'जोरा 10 नंबरी' हा सिनेमा काढला. या सिनेमातूनच दीप सिद्धूला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. त्याचवेळी दीप सिद्धूने पंजाबी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.
 
दीप सिद्धू यांनी मुंबईत मॉडल म्हणून बरंच काम केलं होतं. पुढे मॉडलिंग सोडून ते अभियनाकडे वळले. 'विजेता फिल्म्स' या देओल कुटुंबाच्या बॅनरखाली दीप यांनी 2015 साली पहिला पंजाबी सिनेमा 'रमता जोगी'मध्ये काम केलं.
 
सनी देओलच्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करणारे गुड्डू धनोआ यांनीच 'रमता जोगी' सिनेमाचंही दिग्दर्शन केलं होतं. मात्र, या सिनेमाने दीप यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती.
 
यानंतर 2019 साली दीप सिद्धू पंजाबीमधले ज्येष्ठ अभिनेते गुगू गिल यांच्यासोबत 'साडे ओले' या सिनेमात झळकले. 2020 साली अमरदीप सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली जोराचा दुसरा भाग 'जोरा, सेकंड चॅप्टर' रिलीज झाला. पहिल्या सिनेमाप्रमाणेच या सिक्वेलमध्येही धर्मेंद्र होते आणि गुगू गिल यांचीही एन्ट्री या सिक्वेलमध्ये झाली.
 
जोरा नावाच्या या दोन्ही सिनेमांमध्ये दीप सिद्धू यांनी एका गँगस्टरची भूमिका बजावली आहे.
 
दीप सिद्धू आणि देओल कुटुंब

दीप सिद्धू यांचे देओल कुटुंबीयांसोबत असलेल्या संबंधांबाबत सनी देओल आणि दीप सिद्धू यांनी वेगवेगळे दावे केले आहेत.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या दीप सिद्धू यांच्या फोटोच्या आधारावर दीप सिद्धूंवर भाजप आणि संघाचा अजेंडा रेटत असल्याचे आरोप होत आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही दीप सिद्धू यांचा तो फोटो ट्वीट केला आहे.
 
दीप सिद्धू यांनी एका जुन्या फेसबुक लाईव्हच्या व्हीडिओत सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आपण भाजपशी जोडलो गेल्याचं म्हटलं होतं. त्यांनी भाजपच्या 'दिग्गज' नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत.
 
आपल्याला भाजपमध्ये सामील करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, वैचारिक मतभेद असल्याने आपण नकार दिल्याचं दीप सिद्धूंचं म्हणणं आहे. दीप सिद्धू यांच्या फेसबुक प्रोफाईलवर धर्मेद्र, सनी आणि बॉबी देओलसोबतचा त्यांचा फोटोही आहे.
 
 
मात्र, लाल किल्ल्यावरच्या घटनेनंतर सनी देओल यांनी स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूंशी संबंध नसल्याचं ट्वीट केलं आहे.
 
देओल लिहितात, "आज लाल किल्ल्यावर जे घडलं ते बघून मी व्यथित झालो आहे. मी 6 डिसेंबर रोजीच ट्वीटरवर माझा किंवा माझ्या कुटुंबाचा दीप सिद्धुंशी कुठलाच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं."
 
6 डिसेंबर रोजी सनी देओल यांनी ट्वीट करत शेतकरी आंदोलन हे शेतकरी आणि सरकार यांच्यातला परस्पर मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, दीप सिद्धूवरही स्पष्टीकरण दिलं होतं.
 
या ट्वीटमध्ये त्यांनी एका निवदेनाचा फोटोही शेअर केला होता. त्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "निवडणुकीवेळी माझ्या सोबत असलेले दीप सिद्धू बराच काळापासून माझ्या सोबत नाहीत. ते जे करत आहेत ते स्वतःच्या मर्जीने करत आहेत. त्यांच्या कुठल्याही कृतीशी माझा काहीही संबंध नाही."