शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (15:25 IST)

आदि विनायक मंदिरः हे मंदिर गजमुख नसून मानवमुखी आहे,रामाशी संबंधित इतिहास जाणून घ्या

सर्वत्र गणपती बाप्पाच्या गजमुखी रूपाची पूजा केली जाते. घर-घरात आणि मंदिरात देखील गणेशाच्या गजमुखी रूपाचे दर्शन होतात. पण भारतातील एक मंदिर असं देखील आहे जिथे गणेशाचं गजमुखी नाही तर मानवीमुखाचं मंदिर आहे. चला तर मग माहिती जाणून घेऊ या.  
 
भारताची मंदिरे ही इथली ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक मंदिरे आहेत जी विलक्षण, चमत्कारिक आहेत आणि त्यांच्या खास वैशिष्ट्य साठी ओळखली जातात. असेच एक मंदिर तामिळनाडू राज्यात आहे, जिथे गणपतीच्या गजमुख (हत्तीची सोंड) रूपाची पूजा केली जात नाही तर मानवी चेहऱ्याची पूजा केली जाते. हे प्राचीन मंदिर भगवान श्रीरामाशी संबंधित असून येथे दर्शन घेतल्यानेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो.
 
तिलतर्पणपुरी हे तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील कुटनूरपासून सुमारे 3 किमी आहे. येथे भगवान गणेशाचे आदि विनायक मंदिर आहे, जे कदाचित केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एकमेव असे मंदिर आहे, जेथे भगवान गणेशाच्या मानवी चेहऱ्याची पूजा केली जाते, म्हणजेच गणपती गजमुखी नसून मानवमुखी आहे. या मंदिराबद्दल लोकांची धार्मिक श्रद्धा आहे की दरवर्षी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महागुरू अगस्त्य भगवान आदिविनायकाची पूजा करण्यासाठी येथे येतात. याशिवाय येथे गणेशाची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दूरदूरवरून भाविक येथे पूजेसाठी येतात.
 
मंदिराचा इतिहास
एका आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीराम वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पिंड दान करत होते तेव्हा त्यांनी बनवलेल्या तांदळाचे पिंड किड्यात बदलत होते. श्रीरामांनी जितक्या वेळा तांदळाचे पिंड बनवले तेवढ्यावेळा  ते पिंड किड्यात बदलले. शेवटी त्यांनी  भगवान शिवाची प्रार्थना केली, मग महादेवाने त्यांना आदिविनायक मंदिरात जाऊन  पूजा करण्यास सांगितले. यानंतर भगवान राम आदि विनायक मंदिरात आले आणि महाराज दशरथासाठी पूजा केली. त्यांनी बनवलेल्या तांदळाचे चार गोळे नंतर शिवलिंगात रुपांतरित झाले , ते आदिविनायक मंदिराजवळ असलेल्या मुक्तेश्वर महादेव मंदिरात स्थापित केले आहेत.
 
या मंदिरात भगवान रामाने महाराज दशरथ आणि त्यांच्या पूर्वजांना केलेल्या पिंडदाना नंतर  देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी येथे येतात. तिलतर्पणपुरी हा देखील दोन शब्दांपासून बनलेला आहे, तिलतर्पण म्हणजे पूर्वजांच्या मुक्तीशी संबंधित आणि पुरी म्हणजे शहर. त्यामुळे या ठिकाणाला पितरांचे मोक्ष किंवा मुक्ती नगरी म्हटले जाते. पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी, पिंड दान नदीच्या काठावर केले जाते परंतु धार्मिक विधी मंदिरातच होतात
 
या मंदिरात गणेशाच्यासह माता सरस्वतीचेही मंदिर आहे. प्राचीन कवी ओट्टाकुथर यांनी या देवीच्या मंदिराची स्थापना केली. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी माता सरस्वतीचेही दर्शन घेतलेच पाहिजे. तसेच येथे मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे, जिथे पूर्वी वर्णन केलेले तेच चार शिवलिंग स्थापित आहेत.
 
कसे पोहोचायचे?
विमान मार्गे- तिरुवरूर शहराच्या मुख्यालयापासून आदि विनायक मंदिराचे अंतर सुमारे 22 किलोमीटर (किमी) आहे. सर्वात जवळचे विमानतळ तिरुचिरापल्ली येथे आहे, जे सुमारे 110 किमी अंतरावर आहे. याशिवाय चेन्नई विमानतळापासून या ठिकाणाचे अंतर सुमारे 318 किमी आहे.
 
रेल्वे मार्गे- तिरुवरूर रेल्वे स्टेशन मंदिरापासून सुमारे 23 किमी अंतरावर आहे. येथून तंजावर मार्गे तमिळनाडूच्या जवळपास सर्व शहरांपर्यंत रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे. 
 
रस्ते मार्गे- तामिळनाडूच्या सर्व प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेले असल्यामुळे येथे रस्त्याने पोहोचणे देखील सोपे आहे.